- सचिन ईटकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे) पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने माझा सबनीस सरांशी जवळून परिचय झाला. तत्पूर्वी माझ्या मराठवाड्यातील लेखक म्हणून मला त्यांच्याविषयी आपुलकीचे अनौपचारिक नाते होतेच!
गेल्या दहा वर्षांत त्यांच्याशी माझा ऋणानुबंध दिवसागणिक घट्ट होत गेला. जमीनदार कुटुंबात जन्मलेले सबनीस सर तरुणपणात वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेऊ लागले. शाहिरी करू लागले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी स्वतःची मानवतावादी भूमिका घासूनपुसून अधिक ठसठशीत केली.
आदिवासी मुलांच्या अनेक कार्यशाळांमध्ये डफावर थाप देऊन त्यांनी केलेल्या आवाहनामुळे मनं पेटून उठत. मराठवाडा ही जन्मभूमी आणि खान्देशातील धुळे ही सबनीसांची कर्मभूमी होती. समीक्षक म्हणून त्यांनी वेगळी वाट चोखाळली.
सन २०१६ पिंपरी-चिंचवड येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस यांची निवड झाली. सातत्याने वैचारिक लिखाण करणाऱ्या एका चळवळ्या समीक्षक व लेखकाला मराठी साहित्यविश्वाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ही खूप समाधानाची बाब आहे. योगायोग असा की मला त्या संमेलनाचा मुख्य समन्वयक म्हणून काम करण्याची संधी डॉ. पी. डी. पाटील यांच्यामुळे मिळाली होती.
ते प्रखर विवेकवादी तसेच संवेदनशील समीक्षक, विचारवंत असून, स्वतंत्रपणे विचार मांडत आले आहेत. महापुरुषांच्या विचारांमध्ये जे जनकल्याणाचे आणि गरजेचे असेल त्याच विचारांना पुढे नेले पाहिजे, यावर ते भर देतात.
कुठल्याही महापुरुषाच्या तत्त्वज्ञानाच्या ते आहारी जात नाहीत. आक्रमक शैलीमुळे त्यांच्याकडून एखादे विधान सुटते. त्याचा त्यांना बऱ्याचदा त्रासही सहन करावा लागला आहे. पण त्यांचे मन निर्मळ असल्यामुळे अशा अनेक बिकट प्रसंगांतून ते बाहेर पडले आहेत.
सबनीसांनी तयार केलेला लेखकांचा आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांचा गोतावळा पाहिल्यावर थक्क व्हायला होते. उपेक्षित किंवा दुर्लक्षित वर्गातून आलेल्या शेकडो लेखकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांची ऊर्जा वाढवली आहे. मी त्यांना प्रेमाने वाहणारा झरा असे म्हणेन.
साहित्य संमेलनाच्या त्यांच्या अध्यक्षपदाला जवळपास दहा वर्षे होत आली, पण ते अजूनही संमेलनाध्यक्षाइतकेच सतत कार्यमग्न आहेत. मध्यंतरी त्यांना जीवघेणा अपघात झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना होती. डॉ. सबनीस त्यातून बाहेर पडले. त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही मनोमन प्रार्थना.