शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही भारतासाठी तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 07:23 IST

बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष केवळ त्या देशातील हिंदूंवरच नाही, तर भारतावरही आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे.

बांगलादेश सनातन जागरण मंच या संघटनेचे प्रवक्ते आणि चितगावस्थित पुंडरिक धामचे प्रमुख संत चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या अटकेमुळे, बांगलादेश पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ चटोग्राम येथे २२ नोव्हेंबरला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत कथितरीत्या बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच भगवा ध्वज लावण्यात आल्याचे कारण पुढे करून, दास यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ऑक्टोबरमध्येच करण्यात आला होता. दास यांच्याशिवाय आणखी १९ हिंदू संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधातही अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामुळे बांगलादेशातील वाढत्या इस्लामीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारताच्या सहकार्याने १९७१ मध्ये पाकिस्तानातून फुटून निघत अस्तित्वात आलेल्या बांगलादेशने सर्वधर्मसमभावाचे धोरण स्वीकारले होते; परंतु, १९८८ मध्ये सर्वधर्मसमभावाला तिलांजली देत, त्या देशाने मुस्लीम राष्ट्र म्हणून स्वत:ची ओळख कायम केली. पुढे पुन्हा एकदा धोरण म्हणून सर्वधर्मसमभावाला स्थान देण्यात आले असले तरी, पंधराव्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून इस्लामचे महत्त्व गडद करण्यात आले आहे. मूलतत्त्ववाद्यांच्या वाढत्या प्रभावामुळे बांगलादेशातील परंपरागत सामाजिक वीण विस्कटली आहे. सध्या भारतात आश्रयास आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावण्यात आल्यापासून तर मूलतत्त्ववाद्यांचा उन्माद वाढतच चालला आहे. वस्तुत: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनुस यांना बांगलादेशाच्या अंतरिम सरकारची धुरा सोपविण्यात आल्यामुळे मूलतत्त्ववाद्यांचा लगाम कसला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, एव्हाना ती पुरती फोल ठरली आहे.

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या देशात प्रामुख्याने दोन गट होते. मुक्ती समर्थक आणि मुक्ती विरोधक! मुक्ती विरोधकांचे पाकिस्तानला समर्थन होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेख मुजीबुर रहेमान सरकारने अनेक मुक्ती विरोधकांचे नागरिकत्व काढून घेतले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानची वाट धरली; परंतु, १९७७ नंतर त्यांनी हळूहळू बांगलादेशात परतणे सुरू केले आणि सरकारमधील पदेही बळकावली! त्यानंतर त्यांनी जमात-ए-इस्लामी या कट्टर विचारधारेच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवाय अनेक बांगलादेशी इस्लामी सैनिकांनी १९७० मधील अफगाण युद्धात सहभाग घेतला आणि १९९० च्या दशकात ते मायदेशी परतले तेव्हा, स्वत:सोबत इस्लामिक सत्तेचे तत्त्वज्ञानही घेऊन आले. या पृष्ठभूमीवर १९९२ नंतर बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लागला. त्या काळात सत्तेत असलेल्या बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने युद्ध गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याचे धोरण स्वीकारले. पुढे २०१३ मध्ये दिलावर हुसेन सईद या कट्टर इस्लामी नेत्याला एका लवादाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर, मदरसा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेने त्याचा जोरदार निषेध केला. त्याच संघटनेने २०१३ मध्ये १३ प्रतिगामी मुद्द्यांचा अंतर्भाव असलेली कार्यक्रमपत्रिका सरकारला सादर केली.

वर्षभरात निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याच्या पृष्ठभूमीवर, तत्कालीन अवामी लीग सरकारने त्यापुढे मान तुकवली. त्यानंतर कट्टरतावादाला अधिकच चालना मिळाली आणि अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचारांची मालिकाच सुरू झाली. अल्पसंख्याक समुदायांमध्ये हिंदू सर्वांत मोठा समुदाय असल्याने त्या समुदायालाच सर्वाधिक चटके सोसावे लागले. गत अर्धशतकात बांगलादेशातील हिंदूंची संख्या तब्बल ७५ लाखांनी घटली आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन आदिवासी ओईकोयो परिषद या संघटनेनुसार, बांगलादेशाच्या लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी १९५१ मध्ये २२ टक्के होती. ती २०११ मध्ये केवळ ८.५ टक्के एवढीच उरली होती. त्यानंतर ती आणखी घसरलीच असणार! अल्पसंख्याकांच्या विरोधात  उफाळणारा जातीय हिंसाचार, त्यामुळे भारताच्या दिशेने होणारे पलायन आणि हिंदू धर्मीयांचा कमी जननदर त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष केवळ त्या देशातील हिंदूंवरच नाही, तर भारतावरही आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे; पण, भारतासाठी ही मोठी तारेवरची कसरत आहे. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी वाहतानाच, त्या देशासोबतच्या संबंधांमध्ये कटुता न येऊ देण्याची काळजीही भारत सरकारला घ्यावी लागेल; अन्यथा परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चीन आणि पाकिस्तान टपून बसलेलेच आहेत! पश्चिम आणि उत्तरेसोबत पूर्वेलाही द्वेषभाव बाळगणारा देश भारताला परवडणार नाही!

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशHinduहिंदूPakistanपाकिस्तानchinaचीन