‘भाषायण’ शीर्षकामागील दृष्टिकोन काय?
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही अभिमानाची बाब मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळा झपाट्याने वाढताहेत आणि उरलेल्या मराठी शाळांमध्येही मराठीचा गळा आवळला जात असल्याची खंत वाटते. अभिजात मराठी पुढे न्यायची असेल, तर शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ठोस आणि सर्जनशील प्रयत्न दिसायला हवेत. विद्यार्थीकेंद्री, भाषाकेंद्री आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे भाषेला गती देणे आवश्यक आहे. ‘अयन’ म्हणजे गती. भाषेला नव्या ऊर्जेने, नव्या प्रवाहाने पुढे नेण्याची संकल्पना म्हणून ‘भाषायण’ हे शीर्षक सुचले.
‘भाषा’ ही केवळ संवादाचे साधन की सांस्कृतिक-सामाजिक राजकारणाचाही भाग?
- भाषा ही मानवी अस्तित्वाचा गाभा आहे. भाषा नसतानाही हावभाव, हातवारे, संकेताच्या माध्यमातून संवाद होत होता. पण भाषेच्या आगमनानंतर संवादाला व्यापक स्वरूप मिळाले. विचार प्रक्रियेला गती, सर्जनशीलतेला वाव मिळाला आणि सामाजिक जीवन अधिक संघटित झाले. संस्कृतीचे संवर्धन आणि पिढ्यान्पिढ्यांची विचार परंपरा हे भाषेमुळेच शक्य झाले. भाषा ही सांस्कृतिक, सामाजिक राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. ती ओळख घडवते, समाजाची दिशा ठरवते आणि मूल्यव्यवस्था टिकवते.
पारंपरिक भाषाशिक्षणातील उणीव..
- पारंपरिक भाषाशिक्षण पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित आहे. पाठ्यपुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे हे आपण विसरलो आहोत. प्रश्नोत्तरे आणि गुणांच्या भोवऱ्यात भाषा अडकली आहे. व्याकरण व्यवहाराशी जोडण्याऐवजी कप्प्यात बंद केले गेले आहे. भाषेची गंमत, तिची ताकद, प्रसंगानुरूप बदलणारा बाज, अर्थछटा हे विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळत नाही. उदाहरणार्थ, वाक्प्रचार शिकवताना अर्थ सांगणे आणि वाक्यात उपयोग करून घेणे एवढ्यावर आपण थांबतो. ‘भाषायण’मध्ये मात्र विद्यार्थी स्वतःचे वाक्प्रचार तयार करतात. आमच्या वर्गात एक विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असे. शाळेत न येता तो गावातील तळ्याजवळ फिरत असल्याचे मित्र सांगत. त्यातून विद्यार्थ्यांनी ‘तळ्यावर फिरणे’ हा नवा वाक्प्रचार तयार केला, ज्याचा अर्थ : शाळा बुडवणे.
‘भाषायण’मधील उपक्रमांबद्दल सांगा..
- आपल्याकडे डॉक्टर, इंजिनीअर, वकील घडवण्याची व्यवस्था आहे; पण कवी, लेखक किंवा सक्षम वाचक घडवण्याची व्यवस्था नाही. शालेय जीवनात भाषेच्या दृष्टीने अभिव्यक्तीला वाव नसल्याने अनेक सर्जनशील शक्यता खुंटतात. ‘भाषायण’मधील उपक्रम विद्यार्थ्यांना मुक्त व्यासपीठ देतात. वाचनावर थांबून न राहता कृतीची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांतील सुप्त गुण बाहेर येतात. उदाहरणार्थ, ‘चला लेखक होऊ या’ या उपक्रमात शिक्षक चरित्र पुस्तके उपलब्ध करून देतो. ही चरित्रे कशी लिहिली आहेत, याचा अभ्यास विद्यार्थी करतात. त्यानंतर विद्यार्थी आपल्या परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती गोळा करतात आणि त्यावरून स्वतः चरित्रलेखन करतात. या प्रवासात शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो; कृती विद्यार्थी करतात. यात शिक्षक खऱ्या अर्थाने सहप्रवासी बनतो.
पालकांचा सहभाग कितपत महत्त्वाचा?
- एकदा मातृभाषेची भक्कम पायाभरणी झाली की इतर भाषा सहज आत्मसात करता येतात. परंतु, घरी मराठी आणि शाळेत इंग्रजी माध्यम... यामुळे मुलांवर अनावश्यक ओझे येते. परिणामी ते कोणत्याच भाषेत निपुण होत नाहीत. म्हणून पालकांनी मातृभाषेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. भाषा भक्कम असेल, तर इतर विषयही सुलभ होतात. विद्यार्थ्यांना भाषेशी खेळू देणे आवश्यक आहे. विविध साहित्यप्रकार, भरपूर वाचनसामग्री आणि कृतिशील उपक्रम यामुळे विद्यार्थी डिजिटल माध्यमांपासून पुस्तकांकडे वळू शकतात. सृजनशीलता, अभिव्यक्ती आणि भावनिक विकासासाठी मातृभाषा अपरिहार्य आहे. ‘भाषायण’मधील उपक्रम मातृभाषेला केंद्रस्थानी ठेवतात. ते विद्यार्थ्यांना नैसर्गिकपणे मातृभाषेशी जोडतात आणि भाषेचा निखळ आनंद देतात. विशेष म्हणजे हे उपक्रम केवळ मराठीपुरते मर्यादित नसून कोणत्याही मातृभाषेत राबवता येतील.
मुलाखत व शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, ‘लोकमत’
Web Summary : Marathi needs innovative education beyond textbooks. 'Bhashayan' aims to revitalize Marathi through student-centered activities, fostering creativity and deeper cultural connections. Mother tongue is vital.
Web Summary : मराठी को पाठ्यपुस्तकों से परे नवीन शिक्षा की आवश्यकता है। 'भाषायण' का उद्देश्य छात्र-केंद्रित गतिविधियों के माध्यम से मराठी को पुनर्जीवित करना, रचनात्मकता और गहरे सांस्कृतिक संबंधों को बढ़ावा देना है। मातृभाषा महत्वपूर्ण है।