विशेष लेख: माणूस इतका क्रूर का होऊ लागला आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 07:27 AM2023-06-17T07:27:12+5:302023-06-17T07:27:50+5:30

खून समाजाला नवे नाहीत. सध्याच्या घटनांत नवी आहे ती खून केल्यावर क्रूरपणे मृतदेहांची विल्हेवाट लावतानाची निर्ममता! तिची उकल करता येईल?

Special Article on Why has man become so cruel such As Manoj Sane Mira Road Murder Case | विशेष लेख: माणूस इतका क्रूर का होऊ लागला आहे?

विशेष लेख: माणूस इतका क्रूर का होऊ लागला आहे?

googlenewsNext

डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ

मन सुन्न करणाऱ्या घटना हल्ली सातत्याने घडत आहेत. त्यांचे तपशील वाचताना अंगावर काटा येतो. मीरारोड आणि दिल्ली येथील खुनाच्या घटना, त्यानंतर भयानक प्रकारांनी केलेली मृतदेहांची विटंबना याविषयी सर्वत्र हलक्या आवाजात चर्चा घडते आहे. असं का? इतकं का? असे निरुत्तर करणारे प्रश्न आणि एक सुन्न हतबद्धता पसरते आहे. खून समाजाला नवे नाहीत. सध्याच्या घटनांमध्ये नवी आहे ती खून केल्यावर क्रूरपणे त्या मृतदेहांची विल्हेवाट लावतानाची निर्ममता! तिची उकल करता येऊ शकते का? प्रत्यक्ष खून करताना खुन्याची मानसिक अवस्था काय असते, खून करण्याची तीव्र सणक कशी उठते, यावर संशोधन झाले आहे. सणकीत (इम्पल्स) खून करण्यामागे 'इमोशनल हायजॅक' अशी मज्जासंस्थेतील अनास्था कारणीभूत असल्याचं मानलं जातं, म्हणजे भावनांची त्सुनामी मेंदूच्या भावनिक मेंदूमध्ये उसळून येते. तारतम्य, सदसद्विवेक हे सारंच जणू गोठून जातं. अनेकदा सणक उतरल्यावर अशी व्यक्ती स्वतःहून खुनाची कबुली देते,

आणखी काही कारणं आणि पार्श्वभूमी अशी :

१) आत्मकेंद्री व्यक्ती : केवळ स्वार्थाकरिता समाजाकडे किंवा नातेसंबंधांकडे पाहणं. इतरांच्या भावनांची अजिबात कदर न करणं. आपण क्रूरपणे वागत आहोत, हा विचारही मनात न येणं.

२) समाजविरोधी व्यक्तिमत्त्व : समाजानं घालून दिलेल्या नियम, कायदेकानूनचा जराही विचार न करता आपल्या मनाप्रमाणे वागणं, व्यसन, जुगार हे यातलंचा

३) समाजात क्रौर्याचं स्थान : क्रौर्याबद्दल मनात भीती असण्याऐवजी 'क्रौर्य म्हणजे शौर्य' असं समीकरण झाल्यानं चेपलेली भीड, वाढलेला उन्माद.

४) गुणसूत्र : अशा घटनांमधील खुनी व्यक्तीच्या मज्जासंस्थेचा सखोल अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले आहेत. अशा व्यक्तींची गुणसूत्रं दोषमुक्त आहेत का, यावरही संशोधन झालं असलं, तरी अशा संशोधनांना कमालीच्या मर्यादा आहेत.

५) कुटुंब व्यवस्था, संस्कार : आक्रसलेली कुटुंबं मानसिक आधार द्यायला पुरेशी नसतात. अनेकदा जवळच्या माणसातले वर्तनबदल बेदखल होतात. कमालीची अस्वस्थ व्यक्ती अचानक शांत होऊन निश्वानीस्त करू लागली होती. मृत्यूविषयी ती विचार किंवा चर्चा करीत असे, याची जाणीव त्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर नातलगांना होते. खून करणारी व्यक्ती अस्वस्थ, चिडचिडी होते, विशिष्ट व्यक्तीविषयी भयानक तिरस्कार व्यक्त करते, याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.

६) हिंसक दृश्यं आणि बातम्यांचा भडिमार : आक्रमकपणे हल्ला ही गोष्ट अचानक घडत असली, तरी खुनाची किंवा आत्महत्येची विशिष्ट कार्यपद्धती असते. मनोविज्ञानानुसार मनातल्या आक्रमक भावनांना आकार देण्याचं बळ टीव्हीवरील मालिका, चित्रपट अथवा त्याविषयीच्या लेखांतून मिळतं. यामुळे प्रत्यक्ष खुनी प्रवृत्ती वाढते का, हे निश्चित सांगता येत नाही; पण त्या प्रवृत्तीमुळे घडणाऱ्या घटना मात्र अशा संस्कारांमुळे घडतात. अशा दुष्कृत्यांबद्दल मन असंवेदनशील (डिसेन्सिटाइज) होतं. अशा कृत्यांबद्दल घृणा वाटण्यापेक्षा काहीतरी विशेष प्रयत्नांची परिणती करता येते, हा विचार मनात रुजतो. खून, वध, हत्या, बळी देणं या शब्दांचे अर्थ नीट न समजल्यामुळेही गोंधळ होतात.

मनोविकारग्रस्त व्यक्तीच अशी निर्घृण कृत्य करते असाही एक अपसमज आहे. खुनी व्यक्तीमध्ये गुणसूत्रात अनेकदा दोष आढळतो. विशेषत: एक्स क्रोमोझोममध्ये हा दोष आढळतो. पुरुषांमधील या एक्स क्रोमोझोमचे मुख्य कारण अनुवांशिक नसून 'म्युटेशन'- अचानक घडलेला बिघाड, हे असतं.

खुनी आणि आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये जीवरासायनिक बदल घडलेला आढळतो. या जीवरासायनिक बदलामुळे अशी कृत्ये घडतात, की कृत्यं घडल्यानंतर हा बदल होतो, हे निश्चित नाही. यावर अधिक संशोधन नितांत गरजेचं आहे. आत्महत्या, मेंदूतील 'सिरोटोनिन'ची पातळी आणि औदासीन्य यांचा संबंध साधारणपणे मान्य झाला आहे.

७) निर्घुण मानसिकता: खून आणि मृतदेहाची निर्घृण विल्हेवाट यासंबंधांतल्या सध्या चर्चेत असलेल्या घटनांमध्ये खुनी व्यक्तीचे मृत व्यक्तीशी विशेष संबंध (प्रियकर प्रेयसी, जोडीदार इत्यादी) होते, परस्पर संबंधांतील कमालीचं वितुष्ट, स्वार्थी हेतू, आत्मकेंद्रीपणा ही स्वाभाविक कारणं अशा संबंधांमधून निपजतात.

खून केल्यानंतर प्रत्येक खुन्याला आपण खून लपवू शकतो, असा निरर्थक आत्मविश्वास असतो. एकदा खून झाल्यानंतर स्वतःला वाचविण्याकरिता अशी व्यक्ती काहीही करू शकते. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याची सविस्तर वर्णनं अनेक दृश्ये, छापील माध्यमांत आढळतात. त्याचा अवलंब केल्यास आपण सहिसलामत सुटू शकतो, असा भ्रम होतो. सारासार विवेकाचा हात आधीच सुटलेला असतो. निर्ढावलेल्या गुन्हेगारांमध्ये मानसिक चिंतेचं प्रमाण अत्यल्प असल्यानं निरीक्षण → करणाऱ्या व्यक्तीला खुन्याच्या वावरण्यात वेगळेपणा आढळत नाही. खुन्याला अधिक आत्मविश्वास वाटतो आणि इथूनच अनेकदा खुनाला वाचा फुटते.

इथे आपण व्यक्तिगत खून आणि त्यानंतरची निर्घृणता याचा विचार केला; परंतु ज्यूंचा नरसंहार, रशियातल्या छळछावण्या, इदी अमीनची अमानूष कृत्यं, फाळणीच्या वेळच्या आणि नंतरच्याही दंगली यांचाही तितकाच गंभीर विचार व्हायला हवा...

drrajendrabarve@gmail.com

Web Title: Special Article on Why has man become so cruel such As Manoj Sane Mira Road Murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.