शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 09:30 IST

परीक्षेत येणाऱ्या अपयशापेक्षा परीक्षार्थींना सर्वाधिक चिंता असते ती भरती प्रक्रिया किंवा निकाल रखडण्याची. त्यामुळे त्यांचे पुढील परीक्षांचे आणि करिअरचेही नियोजन बिघडते. एमपीएससीचे बहुतांश निकाल कायदेशीर प्रकरणे उद्भवल्याने रखडतात. याला बहुतेककरून सरकारच्या धोरणातील सुस्पष्टतेचा अभाव कारणीभूत असतो.

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या अपेक्षेने या परीक्षेची तयारी करतात. मात्र, परीक्षेत येणाऱ्या अपयशापेक्षा परीक्षार्थींना सर्वाधिक चिंता असते ती भरती प्रक्रिया किंवा निकाल रखडण्याची. त्यामुळे त्यांचे पुढील परीक्षांचे आणि करिअरचेही नियोजन बिघडते. एमपीएससीचे बहुतांश निकाल कायदेशीर प्रकरणे उद्भवल्याने रखडतात. याला बहुतेककरून सरकारच्या धोरणातील सुस्पष्टतेचा अभाव कारणीभूत असतो. काही वर्षांपूर्वी समांतर आरक्षणाविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कित्येक परीक्षांचे निकाल विनाकारण लांबले. निकालानंतर काही बाबी न्यायालयाकडून तातडीने स्पष्ट करून घेणे गरजेचे होते. मात्र, आयोगाकडून वर्षभर पाठपुरावा करूनही राज्य सरकारने तत्परता न दाखवल्याने हजारो उमेदवारांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागले. हे प्रकार टाळण्याकरिता जाहिरातीच्या वेळेसच निवडीची प्रक्रिया, नियम, उभे-आडवे आरक्षण इत्यादी बाबी स्पष्ट कराव्या लागतात. पण, सरकारच्या धोरणातील धरसोडवृत्तीने निवड प्रक्रिया वारंवार विस्कळीत होत राहते.  गेली आठ-दहा वर्षे महाराष्ट्र केवळ नोकरभरतीच नव्हे तर कॉलेज प्रवेशांमध्येही ही विलंबाची ढकलगाडी अनुभवतो आहे. लोकानुनयी राजकारणाला बळी पडून कुठलीही पूर्वतयारी, अभ्यास, सर्वेक्षण, डॉक्युमेंटेशन न करता घाईघाईत निर्णय घेतला जातो. 

या निर्णयामुळे बाधित होणारा समाजातील एक घटक न्यायालयाचे दार ठोठावणारच असतो. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे केवळ लोकाग्रहास्तव निर्णय घेतले जातात. न्यायालयाच्या निकालानंतर त्यात मोडतोड होऊन (२०१८ मध्ये नोकरीतील मराठा आरक्षण १६ वरून १३ टक्क्यांवर आणण्यात आले) तो नव्याने लागू केला जातो. त्यानंतर पुन्हा सर्व दुरुस्त्या कराव्या लागतात. ज्यांची निवड झाली त्यांना साहजिकच सुधारणा नको असते आणि जे प्रतीक्षेत असतात, त्यांना दुरुस्ती करून हवी असते. या सगळ्यात निकाल, निवड प्रक्रिया रखडल्याचे खापर आयोगावर फोडले जाते.

नव्याने लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणामुळे अनेक पदांच्या जाहिराती रखडल्या आहेत. ज्यांच्या जाहिराती आल्या, त्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांची निवड नव्या आरक्षणानुसार करायची का, यावरून निकाल रखडले. ज्यांचे निकाल जाहीर झाले, त्यांची निवड प्रक्रिया रखडली आहे. २०१८ ते २०२२ दरम्यान उद्भवलेली परिस्थिती आता पुन्हा अनुभवायला येते आहे. त्यात हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकते की नाही, याची टांगती तलवार उमेदवारांवर आहे, ती वेगळीच. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी घेतलेले निर्णयही अंगलट येतात. ऑप्टिंग आउटचा निर्णय हा या प्रकारातला. विविध संवर्गांत निवड झालेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी दिलेल्या या सुविधेचा गैरफायदा घेतला जात असल्याची उमेदवारांची तक्रार आहे. त्यावर अजून तरी योग्य तोडगा काढण्यात आयोगाला यश आलेले नाही.

एमपीएससी अशा विविध कारणांमुळे चर्चेत येत असली तरी योग्य निवड आणि पारदर्शकतेमुळे फिरून पुन्हा आयोगाच्याच आश्रयाला यावे लागते. वर्ग १ आणि २ बरोबरच लिपिक टंकलेखक, लघुलेखक, जिल्हा स्तरावर होणारी तलाठी या पदांसाठीची निवडही आयोगामार्फत व्हावी, यासाठी सातत्याने मागणी होत आहे. तलाठी भरतीतील त्रुटी, पेपरफुटीच्या तक्रारी, परीक्षा केंद्रांवरील गोंधळ, गैरप्रकार, गैरव्यवस्थापन यांमुळे राज्यात परीक्षार्थींमध्ये असलेला असंतोष पाहता ती योग्यही आहे. अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन खासगी कंपन्यांमार्फत सुरू असलेली ही भरती मर्यादित संसाधने, अपुरे आणि अप्रशिक्षित मनुष्यबळ यांमुळे उमेदवारांचे समाधान करू शकलेली नाही. अनेक ठिकाणी ही भरती मॅट अथवा न्यायालयाच्या कचाट्यात सापडते आहे. त्यामुळे लिपिक आणि लघुलेखकांप्रमाणे ही पदेही आयोगामार्फत भरण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे. आयोगावरील कामाचा भार वाढला, पण तुलनेत मनुष्यबळ जैसे थेच राहिले. त्यात आयोगातील काही सहायक कक्ष अधिकारी व लिपिकांची पदे कायम रिक्त राहतात. 

ही पदे भरून सध्याच्या मनुष्यबळाला आणखी ताकद देण्यासाठी काही वाढीव पदे देण्याची गरज आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीत नवीन अद्ययावत प्रणालींचा समावेश करण्याचीही गरज आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींना खरोखरीच दिलासा मिळावा, त्यांच्यातील असंतोष दूर व्हावा, असे वाटत असेल तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही. अर्थात, प्रश्न पदवाढीचा असो वा अद्ययावत प्रणालींचा स्वीकार करण्याचा, हे केवळ राजकीय इच्छाशक्तीनेच होऊ शकेल.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाGovernmentसरकारStudentविद्यार्थी