शेरडीच्या शेपटाची वळवळ

By admin | Published: February 16, 2017 11:59 PM2017-02-16T23:59:17+5:302017-02-16T23:59:17+5:30

अहो, प्रदेशाध्यक्ष म्हणजे शेरडीचं शेपूट. त्याने माशा मारता येत नाही आणि लाजही झाकता येत नाही.’ असे नामी वाक्य एका मराठी चित्रपटात आले

Shardi's tail curve | शेरडीच्या शेपटाची वळवळ

शेरडीच्या शेपटाची वळवळ

Next

अहो, प्रदेशाध्यक्ष म्हणजे शेरडीचं शेपूट. त्याने माशा मारता येत नाही आणि लाजही झाकता येत नाही.’ असे नामी वाक्य एका मराठी चित्रपटात आले आहे आणि कोणत्याही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे त्यात आलेले वर्णन चपखल म्हणावे असे आहे. हे शेपूट केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी कधीकधी वळवळत असते एवढेच. जो कोणताही इसम या पदावर असतो तो त्या पक्षाचे बौद्धिक ठेंगणेपण आणि वैचारिक दारिद्र्य या दोहोंचेही चांगले प्रतिनिधित्व करीत असतो. (आपल्याला ठाऊक असलेल्या कोणत्याही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे चित्र डोळ्यासमोर आणून याविषयीची खात्री त्या भल्या माणसाचा अपमान न करता पटवून घेण्याजोगी) प. बंगालच्या भाजपाचे असे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या या दोन्ही बाजू, अमर्त्य सेन यांच्यावर अभद्र टीका करून देशासमोर उघड केल्या आहेत. अमर्त्य सेन यांनी प. बंगालसाठी काय केले, त्यांनी देशाला काय दिले, त्यांच्यात अशी कोणती बुद्धिमत्ता दडली आहे, यासारखे प्रश्न तर या घोषाने विचारलेच, वर सेन यांनी जी पुस्तके लिहिली ती त्यांना तरी समजली आहेत काय, असा निर्बुद्ध प्रश्नही त्यांनी विचारला. ज्ञानाचे दारिद्र्य आणि राजकीय सामर्थ्याचा अहंभाव असणारी माणसे नुसती बेभानच नसतात, त्यांच्या बेभानपणाला स्वत:च्या अधिकाराची आंधळी घमेंडही चिकटलेली असते. काही वर्षांपूर्वी तेव्हाच्या मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी (आता त्यांची पदावनती होऊन त्या वस्त्रोद्योग मंत्री झाल्या आहेत.) यांनी अमर्त्य सेन यांच्याकडे असलेले नालंदा विद्यापीठाचे कुलगुरुपद काढून घेताना त्यांच्यावर अशीच अभद्र टीका केली होती. भाजपाचे खासदार असलेले एक बोलभांड पत्रकार चंदन मित्रा यांनीही अमर्त्य सेन यांना अमंगळ शिवीगाळ करण्याचा वाचाळपणा केला होता. भाजपातील आताची नेतेमंडळी ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान व तसल्याच गंभीर विषयांच्या अधिकारी माणसांबद्दल केवढी उथळ विधाने करतात याचे हे नमुने आहेत. वास्तव हे की अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळाले ते त्यांच्या अर्थशास्त्राविषयीच्या मानवी दृष्टिकोनाबाबत. समाजातील सामान्य माणसांच्या जीवनातले कोणते बदल त्यांची प्रगती व विकास यांचे निदर्शक असतात याविषयीचे सेन यांचे निष्कर्ष संयुक्त राष्ट्र संघासह साऱ्या जगाने आता स्वीकारले आहेत. विकासाचे असे निर्देशांक जगाला सांगणारे व जगभरच्या सरकारांना सामाजिक विकासाबाबतचे कार्यक्रम आखण्याचे त्यांचे आवाहन त्यांच्या या अध्ययनातून आले आहे. सेन यांच्या ज्ञानाने त्यांना दिलेले विनम्रपण हे की असे अध्ययन करणारे जगातील अनेकजण माझ्या नोबेल पारितोषिकावर हक्क सांगू शकणारे आहेत, असे उद््गार तो पुरस्कार स्वीकारतानाच त्यांनी काढले. या पुरस्काराची निम्मी रक्कम त्यांनी प. बंगाल सरकारला व निम्मी आताच्या बांगला देश सरकारला दिली व तिचा विनियोग प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी करावा असे म्हटले. ज्याच्या दृष्टीत देशांचे वेगळेपण न येता मानवी विकासाच्या ध्येयाचे एकात्मपण अधिक मोठे असते त्याचे मोजमाप एखाद्या प्रदेशाध्यक्षाला करता आले नाही तर तो त्याचा दोष नव्हे. दोष असलाच तर हा की अशी माणसे तसा अधिकार नसतानाही नको तसे बरळताना राजकारणात दिसतात. अमर्त्य सेन यांचा जन्म आताच्या बांगला देशातला. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचे पहिले स्वागत ढाक्याच्या विद्यापीठाने केले. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानपदावर असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वातील हार्द आणि अडवाणींची अध्ययनक्षमता याविषयी नंतरच्या काळात सेन यांनीही कमालीच्या आस्थेने लिहिले आहे. एक गोष्ट मात्र खरी, सेन हे गरीब व सामान्य माणसांच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणारे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या वर्गाच्या हितावर आघात करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करण्याची क्षमता, बुद्धी व सामर्थ्य त्यांच्यात आहे. स्वाभाविकच या वर्गाविषयी व त्याच्या आर्थिक दुरवस्थेविषयी अनभिज्ञ असणाऱ्या अनेकांना त्यांची बौद्धिक उंची आणि मानवी दृष्टी समजणारीही नाही. भाजपाचे आजचे अर्थकारण व त्याला त्या पक्षाने दिलेली हिंदुत्वाची डूब हा फसवा प्रकार आहे आणि तो गरिबांना आणखी गरीब करणारा आहे, असे सेन यांना वाटते. सध्याच्या सरकारचे अंबानी आणि अदानीप्रिय अर्थकारण हे देशातील विषमता वाढवणारे व समाजाला धनवंतांच्या तोंडी देणारे आहे, असेही त्यांचे मत आहे. हे धोरण गरीब व मध्यमवर्गाच्या हिताचे असणे आणि त्याने समाजातील अखेरच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ते करीत असतात. नेमकी हीच गोष्ट ज्यांना चर्चेत येणे अडचणीचे वाटते ती सत्ताधारी माणसे व त्यांचे वाचाळ हस्तक मग सेन यांच्या गुणवत्तेविषयी व अधिकाराविषयी त्या दिलीप घोषांसारखी शंका घेताना दिसतात. अशा माणसांचे शेपूट असणे आणि तेही आखूड असणे आपणच समजून घ्यायचे असते. अशी माणसे सेन यांच्या ज्ञानाधिकारावर प्रकाश टाकत नाहीत, आपल्या अज्ञानाचे अमर्यादपणच ती उघड करीत असतात.

Web Title: Shardi's tail curve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.