प्राचीन ज्ञान-खाणींचे शास्त्रशुद्ध उत्खनन!

By विजय बाविस्कर | Published: March 22, 2023 09:26 AM2023-03-22T09:26:32+5:302023-03-22T09:27:20+5:30

दुर्मीळ हस्तलिखितांचा शोध, छाननी, लिपीदुरुस्ती, स्कॅनिंग आणि देवनागरी  लिप्यंतर.. पुण्याच्या श्रुतदीप रिसर्च फाउंडेशनच्या बृहद प्रकल्पाबद्दल...

Scientific Excavation of Ancient Knowledge-Mines! | प्राचीन ज्ञान-खाणींचे शास्त्रशुद्ध उत्खनन!

प्राचीन ज्ञान-खाणींचे शास्त्रशुद्ध उत्खनन!

googlenewsNext

- विजय बाविस्कर (समूह संपादक, लोकमत)

आपला देश अनादिकाळापासून केवळ धनवानच नाही, तर ज्ञानवानही होता. धन आणि ज्ञान म्हणजेच लक्ष्मी आणि सरस्वतीचा निवास म्हणजे भारत देश. त्यामुळेच भारत संपूर्ण विश्वाचे आकर्षण राहिले आहे. विश्वातील पर्यटक हजारो वर्षांपासून आपल्या देशाला भेट देत आणि येथील सुबत्तेचे, संस्कृतीचे कौतुक करत. चीन, आखाती देश, पूर्व आशिया या भागातून आलेल्या पर्यटकांनी भारताबद्दल भरभरून प्रवासवर्णने लिहिली आहेत. इथल्या श्रीमंतीबद्दल, तसेच ज्ञानाच्या खजिन्याबद्दल आपल्या ग्रंथांमध्ये लिहिले आहे. शेकडो वर्षांपासून भारतावर अनेक आक्रमणे झाली.  

संपत्ती लुटण्याच्या हेतूने आलेल्या या आक्रमकांनी राजसत्ता काबीज केल्यानंतर येथील ज्ञानसत्ता मोडून काढण्याची मोहीम हाती घेतली आणि धनासोबत ज्ञानाच्या भांडारावरही हल्ले केले. कोट्यवधी हस्तलिखिते नष्ट करण्यात आली. मात्र, आपले पूर्वज दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी हस्तलिखितांच्या अनेक प्रती तयार करून देशाच्या विविध भागांमध्ये सुरक्षित ठेवल्या. त्यातील काही प्रती आक्रमकांच्या हल्ल्यातून बचावल्या. मात्र, कालौघात नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप आदी कारणांमुळे त्यातील अक्षरवाङ्मय पुसट झाले. काहींचा अपभ्रंश झाला, तर त्याच्या पुढील प्रतींमध्ये विशुद्ध रूप हरवत गेले. 

मूळ रूपातील या प्राचीन ज्ञानखजिन्याचा नव्याने शोध घेण्याची आणि तो जनतेसमोर आणण्याची गरज होती. मात्र हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही अवघड काम खरेच...  पुण्याच्या श्रुतदीप रिसर्च फाउंडेशनने हा पुरातन ज्ञानखजिना जनतेसमोर आणण्याचा संकल्प सोडला आणि गेल्या दहा वर्षांमध्ये तब्बल ८० लाख हस्तलिखितांच्या पानांचे स्कॅनिंग आणि ५० हजारांपेक्षा अधिक पानांचे आजच्या देवनागरीमध्ये भाषांतर, लिप्यंतर केले आहे. हस्तलिखितांच्या स्वरूपातील हा प्राचीन ज्ञानवारसा किती असावा, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. प्रा. डॉ. डेव्हिड पिन्ग्री यांच्या मतानुसार, हस्तलिखितांचा हा ज्ञानखजिना किमान तीन कोटी असावा. अमेरिकी इतिहासकार आणि गणितज्ञ प्रा. डेव्हिड हे ब्राऊन विद्यापीठात अध्यापनाचे काम करत. भारतीय पुरातन इतिहासावर त्यांनी बरेच लिहून ठेवले आहे.

एका अभ्यासानुसार, भारतीय उपमहाद्वीपामधील सुमारे २० टक्के हस्तलिखिते, विविध जैन भांडारांमध्ये सापडतात. तेथे ती जपून ठेवण्यात आली आहेत. मात्र, सध्या असलेल्या एकूण हस्तलिखित ऐवजांपैकी अवघी दीड कोटीच उपलब्ध आहेत आणि त्यांची स्थिती जर्जर आहे. व्हिएन्ना विद्यापीठाचे प्रा. डॉ. डॉमनिक वुजास्टिक यांच्या दाव्यानुसार, भारताचा हा अनमोल ठेवा दर आठवड्याला शंभर या गतीने नष्ट होत आहे. शंभर वर्षांपूर्वी भारतात सुमारे एक हजार हस्तलिखित ग्रंथसंवर्धन केंद्रे होती, आज केवळ चारशे केंद्रे अस्तित्वात आहेत. तेथील कपाटांमध्ये अनेक वर्षे बंदिस्त राहिल्याने या हस्तलिखितांना वाळवी लागली आहे.

श्री वैराग्यरति विजयजी महाराज यांनी  पुण्यात २०१० मध्ये श्रुतभवन संशोधन केंद्राची स्थापना केली. श्रीमत् विजय रामचंद्रसूरीश्वरजी महाराज यांचे ते शिष्य. पुण्यातील श्रुतभवन येथे त्यांच्या नेतृत्वाखाली २५ भाषाविदांचा चमू काम करत आहे. महाराजांनी तरुण चिकित्सक निवडून, त्यांना प्राचीन भाषा आणि लिपींचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन, या अभिनव प्रकल्पासाठी प्रशिक्षित केले आहे. याखेरीज, भारतभ्रमण करून हस्तलिखितांचा शोध घेणारी दोन पथके काम करतात. वैराग्यरति विजयजी महाराज यांचा मूळ उद्देश भारतभर हस्तलिखितबद्ध असलेले समग्र जैन तत्त्वज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगासमोर आणणे, हा होता.

प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मात्र त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. जैन तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त इतर सांस्कृतिक ठेव्यावरदेखील काम सुरू झाले. गेल्या दहा वर्षांच्या काळात तब्बल ८० लाख पानांचे स्कॅनिंग आणि भाषा शुद्धीकरणाबरोबरच, भाषांतर तसेच लिप्यंतराचे काम पूर्ण झाले आहे. श्री वैराग्यरति विजयजी महाराज सांगतात, ‘भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या आणि कालौघात लुप्त झालेल्या सर्व लिप्यांची जननी ब्राह्मी लिपी आहे. त्यामुळे आम्ही निवडलेल्या तरुण पंडितांना सर्वांत आधी ब्राह्मी लिपी शिकवतो, त्याचबरोबरच प्राकृत, संस्कृत भाषांचे ज्ञान आणि पांडुलिपीसारख्या समकालीन भारतीय लिपींचेही ज्ञान देतो.

भारताच्या विविध भागांतून आणलेली हस्तलिखितांची छाननी करतो. त्यांचे योग्य संपादन करणे, व्याकरणदृष्ट्या तपासणी करणे, लिपीदुरुस्ती करणे आणि शेवटी त्यांचे संगणकीय स्कॅनिंग करून जतन करणे, याखेरीज सर्व हस्तलिखितांचे देवनागरीमध्ये लिप्यंतर करणे अशी कामे येथे होतात. भारतातील अशा स्वरूपाचे हे एकमेव संशोधन केंद्र आहे.’ प्राचीन काळात भूर्जपत्र किंवा ताडपत्रावर लिखाण केल्याची लाखो उदाहरणे आहेत. श्रुतभवनमध्ये आज पुन्हा ताडपत्रावर लिखाण केले जात आहे. त्यामागचे कारण विस्मयचकित करणारे आहे. श्री वैराग्यरति विजयजी महाराज यांच्या मते, कितीही उच्च दर्जाच्या कागदावर शाईने लिहिले किंवा छपाई केली, तर त्याची आयुर्मर्यादा ५० ते ७० वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. ताडपत्रावर लिहिलेला मजकूर पाचशे ते सातशे वर्षे टिकतो. श्रुतभवनमध्ये केवळ ताडपत्र लिखाणच केले जात नाही, तर त्यावर लेझरच्या साह्याने अक्षरे कोरण्याचे कामही केले जाते.

खजिन्याला लागलेली वाळवी आणि ही श्रीमंती परत मिळविणारे अध्यक्ष किरीटभाई शेठ, वरिष्ठ सदस्य  भरतभाई शहा, श्रुतभवनच्या आरंभापासून कार्यरत असणारे राजेंद्र बाठिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रकल्पाशी जोडले गेल्याचा सार्थ अभिमान आहे.
श्रुतभवनमध्ये गेल्या दशकभरात देशातील चारशे हस्तलिखित ग्रंथभांडारातून आणलेल्या ७ लाख १९ हजार हस्तलिखित ग्रंथांची सूची आहे. ८४ ग्रंथभांडारांचा सुमारे दीड लाख हस्तलिखितांच्या दस्तावेजाचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. त्याची पाने सुमारे ८० लाख एवढी भरतात. यातील ४० भांडारांच्या ६५ हजार हस्तलिखितांचे सूचिपत्र (कॅटलॉग) तयार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राचीन माहितीच्या संग्रह, पुनर्निर्माण आणि विश्लेषणासाठी जी मानके निश्चित करण्यात आली आहेत, त्यांचेही काटेकोरपणे पालन करून या संशोधनकार्यात आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळला जातो. 
 

Web Title: Scientific Excavation of Ancient Knowledge-Mines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.