संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:56 AM2018-10-08T03:56:31+5:302018-10-08T03:56:41+5:30

शिखांचा पेहराव व जीवनपद्धती वेगळी आहे. पण ते आपले आहेत. तसेच मुसलमानही देशाचेच आहेत. हीच गांधीजींसह साऱ्या थोरामोठ्यांची शिकवण होती. तेच मत स्वामी विवेकानंदांचेही होते. धर्म ही बाब तशी सोपी नाही.

The RSS has not changed; 'Country, inclusive' | संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’

संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’

Next

संघाने गोळवलकरांना व त्यांच्या विचारसूत्राला सोडले असे सांगितले जात असले, तरी त्याची मूळ विचारसरणी तशीच व तेवढीच कर्मठ राहिली आहे. शब्द वा वाक्ये बदलणे आणि आशय बदलणे यात अंतर आहे. मोहन भागवतांनी टरफलेच तेवढी बदलली आहेत. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘तशीही गोळवलकरांची विचारसरणी आता कालबाह्य झाली आहे,’ असे म्हणून भागवतांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे. भागवतांना ‘अल्पसंख्य’ हा शब्द मान्य नाही. मुसलमानांनी या देशावर आक्रमण केले, हा इतिहास त्यांनी घट्ट धरून ठेवला आहे. आताच्या मुसलमानांनी गोहत्या थांबवून गोमांस भक्षण बंद करावे, अशी त्यांची मागणी आहे. शिवाय येथे साºयांनी, त्यात मुसलमानही आले, स्वत:ला हिंदू म्हणावे, कारण हे हिंदू राष्ट्र आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एखाद्या कर्मठ संस्थेने आपल्या व्यवहारात थोडा काही बदल केला की, तो बातमीचा विषय होतो. हाफपॅन्ट सोडून संघ फुलपॅन्टवर आला, त्याची अशीच चर्चा झाली. त्यामुळे भागवतांनी गोळवलकरांचे नाव न घेणे, हाही तेवढ्याच चर्चेचा विषय झाला. प्रत्यक्षात बदलले काय? खानपानावरची बंदी आग्रहाने मांडली गेली. त्यामुळे खानस्वातंत्र्याची कोंडी केली गेली. आमचा पूज्य पशू तुम्हीही पूज्य माना, असे म्हटल्याने श्रद्धास्वातंत्र्याची गळचेपी झाली. तुमचा इतिहास आम्ही विसरलो नाही, तुम्ही मात्र तो विसरला पाहिजे, असे सांगितल्याने धर्मातले वैर कायम राखले गेले. इतिहास ही विसरण्याची बाब नव्हे, शिवाय इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर सात शतके राज्य केले. ते सारेच परदेशातून भारतात आले नाहीत. येथेच जन्मले व इथेच त्यांच्या कबरी आहेत. समाजातले अनेक वर्ग आर्यांनाही बाहेरचे मानतात. वास्तविक, आर्य येथे कधी आले आणि केव्हा इथलेच झाले, याची नोंद कुणाजवळ नाही. शक व हुणांबाबतही असेच म्हटले जाते, पण तेही इथलेच झाले. मुसलमानांचा धर्म, पेहराव व जीवनपद्धती यांच्या अंतरामुळे त्यांना येथेच पिढ्यान्पिढ्या राहूनही वेगळे मानण्याचा अट्टाहास संघाने धरला. मुसलमानांमधील एका मोठ्या वर्गाने आम्ही इथे राज्यकर्ते होतो, म्हणूनही तो जोपासला. यातला खरा मार्ग सर्वधर्मसमभावाचा व हा देश सर्वांचा आहे, असे समजण्याचा आहे. आपले नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’. खरे तर गेल्या ८० वर्षांत देशाने सर्वधर्मसमभावाकडून सर्वधर्मसमभावाकडे जायचे, पण धर्माच्या व जातींच्या अहंतांनी त्याला तसे जाऊ दिले नाही. जगातल्या मानववंश शास्त्रज्ञांनी २०१७ पर्यंत जगातील ४३०० धर्मांचा शोध लावला. यातला प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांसाठीच केवळ जन्माला आला नाही, तो साºया जगाच्या कल्याणासाठी उदयाला आला. ‘वसुधैव कुटुंबकम’ याचा अर्थ याहून वेगळा नाही. या सगळ्या धर्मांची शिकवण त्यांच्या अनुयायांपुरती मर्यादित नाही. ही साºया जगाच्या कल्याणाची आहे. सर्वधर्मसमभाव किंवा सेक्युलॅरिझम हा तो विचार आहे. विविधतेत एकता आणि विचार व श्रद्धा वेगळ्या असल्या, तरी हे राष्ट्र एक आहे हा विचार ही ती बाब आहे. आज जगातील ९३ देशांनी सेक्युलॅरिझमचा स्वीकार केला आहे. हे देश धर्मांच्या पलीकडे गेलेले व कायदे करताना त्यात धर्म येणार नाही याची काळजी घेणारे आहे. या धर्मांच्या पल्याड असलेला नीतिधर्म वा मनुष्यधर्म हा यापुढचा जगाचा तारणहर्ता आहे. ज्या मूल्यांमुळे मनुष्यजातीचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते, त्या मूल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम असे जॉन होलिओ म्हणाला. आपल्या घटनेनेही याच विचाराला मान्यता दिली आहे. दु:ख याचे की संघाला ही घटनाच मान्य नाही. त्याला एका धर्माची, एका भाषेची (संस्कृत), घटना बनविता आली, तर ती हवीच आहे. त्यामुळे भागवतांचे वक्तव्य फारशा गंभीरपणे घेण्याची गरज नाही. काळ बदलतो, तशा समाजाच्या गरजा बदलतात. समाजही काळानुरूप बदलत जातो. मात्र, काळ बदलला, तरी कर्मठांचे वर्ग आपल्या जुन्या निष्ठांनाच चिकटून राहतात व तसे करताना ते कालविसंगतच नव्हे, तर कालबाह्य होतात, याची नोंद या संदर्भात घेणे आवश्यक आहे.

Web Title: The RSS has not changed; 'Country, inclusive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.