शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

दुश्मनीच्या वाटेवर ऋणानुबंधाची आठवण !

By सचिन जवळकोटे | Updated: May 2, 2019 16:37 IST

दुश्मनीच्या वाटेवर अकस्मातपणे भेटलेल्या दोन दिग्गज नेत्यांच्या सार्वजनिक सभ्यतेचा पाहिला ऋणानुबंध.

- सचिन जवळकोटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अवघा महाराष्ट्र द्वेषाच्या लाटेवर स्वार झालेला. राजकीय सुडाच्या भाषेपायी थरारलेला. मात्र याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकलूजच्या भूमीनं काल अनुभवला जुन्या आठवणीचा नवा भावबंध. दुश्मनीच्या वाटेवर अकस्मातपणे भेटलेल्या दोन दिग्गज नेत्यांच्या सार्वजनिक सभ्यतेचा पाहिला ऋणानुबंध. शरद पवार अन् विजयसिंह मोहिते-पाटील जेव्हा एकमेकांशी मोठ्या आदरानं बोलले, तेव्हा भीमा-नीरा खो-याला लाभलं महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेचा साक्षीदार बनण्याचं भाग्य.

मंगळवारी शरद पवार सांगोला तालुक्याच्या दौ-यावर होते. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या तयारीला ते लागले होते. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र अकलूजच्या सरदारांनी गड सोडल्यानंतर झालेली पडझड त्यांना दुरुस्त करायची होती. गावोगावी ढासळलेले कैक बुरुज त्यांना पुन्हा बांधायचे होते. 'अकलूजकर गेले तरीही बारामतीकरांना काहीच फरक पडत नाही,' हे दाखविण्यासाठीच त्यांनी सोलापूरवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलेलं. दोन दिवसांचा जिल्हा दौरा त्यांनी तेवढ्यासाठीच आखलेला. मात्र त्याच दिवशी मुंबईहून एक वाईट बातमी थडकली. माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढा देता-देता निधन झालेलं. हे कळताच पवारांनी आपला दौरा जागीच रद्द केला.

   डोळस हे राष्ट्रवादीचे गेल्या दहा वर्षापासूनचे आमदार. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस विजयदादांनी केलेली तर त्यांना मान-बहुमान मिळवून देण्यासाठी पवारांनीही मुंबईत वेगवेगळी संधी उपलब्ध करून दिलेली. बुधवारी डोळस यांच्यावर त्यांच्या जन्मगाव असलेल्या दसूरमध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षाचे नेते आवर्जून उपस्थित राहिलेले. चौथ-यावर अंत्यविधी सुरू असताना सारेच नेते गंभीरपणे समोर बसलेले. एवढ्यात समोरून शरद पवार आले. त्यांना पाहताच सर्वप्रथम विजयदादा अन् रणजितदादा पटकन उठून उभारले. त्यानंतर इतर सहका-यांनी खुर्च्या सोडल्या. त्यानंतर पवार अन् दादा एकाच ठिकाणी जवळ-जवळ बसले. काही क्षण निशब्दच गेले. अखेर त्यांच्यात संवादही झाला. ते दोघे काय बोलतात, हे पाहण्यासाठी लगतचे अजितदादाही वाकून बघू लागले. त्यावेळी दोघांच्या चेह-यावरच्या भावना टिपण्याचा प्रयत्नही काही जणांच्या कॅमे-यानं केला. विजयदादा अन् अजितदादा यांच्यात मात्र संवाद झालाच नाही. अखेर विधी पार पडल्यानंतर सारे नेते परत फिरले.आपापल्या गावी निघाले.

पवार गेले.. विजयदादाही गेले. मात्र या दोघांमध्ये काही काळ झालेल्या संवादाची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली. गेल्या महिन्यातच रणजितसिंहांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी न सोडताच विजयदादाही मोदींच्या जाहीर सभेत व्यासपीठावर उपस्थित राहिले. त्यानंतर अजितदादांनी माळशिरस तालुक्यात जोरदार सभा घेऊन 'अकलूजकरां'वर घणाघाती टीका केली. शरद पवारांनी तर ‘दादांची चड्डी’ या मुद्यावरून 'आरएसएस'लाही चिमटा काढलेला. यावेळी दादांची बाजू घेत देवेंद्रपंतानीही पवारांना ‘पुलोदच्या चड्डी’ची आठवण करून दिलेली. पाठीवरच्या खंजीरापासून ‘हाफ चड्डी'तल्या मांडीपर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर माढा लोकसभेचा प्रचार पोहोचलेला. 'गेल्या अनेक दशकांपासून सुख-दुःखात सोबत राहिलेल्या विजयदादांच्या घराण्यानं आपली साथ सोडून भाजपाच्या गोटात सामील व्हावं,' हे पवारांना अत्यंत जिव्हारी लागल्याचं या सा-या भाषणांमधून स्पष्टपणे जाणवलेलं. त्यात पुन्हा 'कुल अन् हर्षवर्धन' यांच्या भेटीगाठीतून विजयदादांकडून बारामतीतही पवार घराण्याची कोंडी केली जात असल्याची खबर धक्कादायक ठरलेली. म्हणूनच की काय, माढ्याच्या रणांगणात  भाजपापेक्षाही मोहिते-पाटील घराण्यावरच टिकेचे आसूड ओढण्यात पवारांची राष्ट्रवादी रमलेली. एकमेकांना राजकारणातून उठविण्याची भाषाही केली गेली. या सा-या द्वेषाच्या पार्श्वभूमीवर पवार अन् विजयदादा आकस्मितपणे समोरासमोर आले, तेव्हा दोघांनीही एकमेकांचा केलेला आदर उपस्थितांसाठी लक्षणीय ठरला. मराठी मुलखाची सभ्यता पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला.. कारण या दोघांचाही प्रिय साथीदार काळाआड गेल्याचं दुःख सामयिक होतं. याचीच चर्चा दिवसभर अकलूज-बारामती परिसरात रंगलेली. फक्त सर्वांना एकच प्रश्न पडला होता.. तो म्हणजे 'पवार अन् विजयदादा एकमेकांशी नेमकं काय बोलले?' विशेष म्हणजे, या दोघांच्या संवादाची उत्सुकता खुद्द रणजितदादांनाही होती. त्यांनी जेव्हा पिताश्रींना म्हणजे विजयदादांना घरी विचारलं, तेव्हा ते म्हणे एवढंच उत्तरले, 'काही नाही. नेहमीचं आपलं बोलणं.. कधी निघालात अन् कुठून आलात?' आता या संवादावरून ‘अकलूज-बारामती’चं राजकारण कुठं पोहोचणार, याची अटकळ बांधण्याचा प्रयत्न कुणी करु नये, एवढंच. 

जाता-जाता :  रणजितदादांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांची ‘लाईव्ह मुलाखत’ घेण्यासाठी मध्यतंरी आम्ही त्यांच्या अकलूजमधल्या बंगल्यावर पोहचलो, त्यावेळी आतल्या हॉलमध्ये पवारांसोबत विजयदादांचा जुना फोटो अजूनही भिंतीवर दिमाखात झळकलेला दिसला. ‘इथं आता त्यांचा फोटो?' असा प्रश्न उत्सुकतेनं विचारला, तेव्हा रणजितदादा गालातल्या गालात हसत म्हणाले होते, 'फोटो नव्हे.. केवळ आठवण.'

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलHanumant Dolasहनुमंत डोळसPoliticsराजकारण