शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

सावरकरांमुळे कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 07:28 IST

ठाकरेंना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने मैदानात उतरले आहेत.

काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्षे उलटल्यावरही वादांच्या केंद्रस्थानी राहण्याचे दुर्भाग्य काही महापुरुषांना लाभले आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नाव त्या यादीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सावरकर नेहमीच एका वर्गासाठी दैवत अन् दुसऱ्या वर्गासाठी टीकेस पात्र व्यक्तिमत्त्व ठरत आले आहेत; परंतु अलीकडे त्यांच्यावरील टीकेला जरा जास्तच धार चढताना दिसत आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी बरेचदा गरज नसतानाही सावरकरांवर टीकेची झोड उठवताना दिसतात. मग तेवढ्याच हिरिरीने सावरकर प्रशंसक त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरतात आणि नव्या वादाला तोंड फुटते.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांना एका मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाली. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, सावरकरांचा उल्लेख करून माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अडचणीच्या ठरणाऱ्या या विषयाला ठाकरे आजवर पद्धतशीरपणे बगल देत आले आहेत. रविवारी नाशिक येथे जाहीर सभेस संबोधित करताना मात्र, त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा थेट राहुल गांधी यांनाच देऊन टाकला. त्यामुळे आता ते स्वत:च खिंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी संधीच्या शोधातच असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे.

ठाकरेंना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने मैदानात उतरले आहेत. मनसेकडून राहुल देशपांडे आणि भाजपकडून राम कदम यांनीही सोमवारी ठाकरेंवर टीकास्त्रे डागली. ठाकरेंनी राहुल गांधींना दिलेला इशारा केवळ दाखविण्यापुरता आहे, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे ते नेमके काय करणार, प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा राहुल गांधींच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलण्याची त्यांची हिंमत होणार नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत प्रत्यक्ष कृती होणार नाही, असा भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांचा सूर आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन, सावरकरांच्या अपमानासंदर्भात आपण अतिशय गंभीर असल्याचे दाखवून दिले आहे. ठाकरे यांचा इशारा राहुल गांधी गांभीर्याने घेतात की नाही आणि त्यांनी ठाकरेंच्या इशाऱ्याला भीक न घालता सावरकरांवरील टीका यापुढेही सुरूच ठेवली, तर ठाकरे कोणती भूमिका घेणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेमुळे ठाकरेंसोबतच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचीही मोठी गोची झाली आहे, हे मात्र निश्चित! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसेचे नेते भरभरून व्यक्त होत असताना, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मात्र अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले आहे. महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही प्रमुख नेत्याने या विषयावर तोंड उघडले नव्हते. सावरकर या विषयाने राज्य काँग्रेसची नेहमीच गोची केली आहे. सावरकरांचे समर्थन करून गांधी कुटुंबाची नाराजी ओढवून घेता येत नाही अन् टीका केली तर राज्यातील निवडणुकांमध्ये फटका बसण्याची भीती वाटते! त्यामुळे काँग्रेस नेते या मुद्यावर बहिरेपणाचे सोंग घेणेच पसंत करतात.

उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याची घाई झालेल्या भाजपच्या हे चांगलेच पथ्यावर पडले आहे. या मुद्याच्या निमित्ताने ठाकरे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दरी निर्माण करण्याची आयतीच संधी भाजपपुढे चालून आली आहे. तिचा लाभ उपटण्याचे पुरेपूर प्रयत्न तो पक्ष करणारच! दुसरीकडे राहुल गांधी यांचा एकंदर स्वभाव आणि आजवरची राजकीय वाटचाल बघता, ते सावरकरांविषयी यापुढे भाष्य करणार नाहीत, याची शक्यता फार धूसर आहे. ते यापुढे जेव्हा सावरकरांच्या विरोधात बोलतील, त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना त्यांच्या इशाऱ्याची आठवण करवून देण्याचे काम भाजप नेते निश्चितपणे करतील. त्यावेळी ठाकरे यांची भूमिका काय असेल, हे बघणे रंजक ठरणार आहे. तूर्तास सावरकरांमुळे ठाकरे कोंडीत सापडले आहेत, हे मात्र निश्चित!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस