शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पुणे, तेथे आता हे उणे...

By admin | Updated: June 6, 2014 08:51 IST

पुण्यात काल जे घडले, ते त्या शहराच्या पुण्याईसह सार्‍या महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे.

पुण्यात काल जे घडले, ते त्या शहराच्या पुण्याईसह सार्‍या महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. स्वत:ला हिंदू राष्ट्रसेनेचे म्हणवून घेणार्‍या १० जणांच्या टोळीने एका तरुण व निरपराध मुस्लिम अभियंत्याचा केवळ धार्मिक कारणाखातर केलेला निर्घृण खून ही देशात येऊ घातलेल्या तशा त-हेच्या आपत्तींची नांदी ठरू नये, अशी सार्‍यांनी प्रार्थना करावी व धार्मिक सलोख्यासाठी मनोमन झटावे, असे सांगणारी ही घटना आहे. कोणाएका पुढार्‍याविषयी कोणाएका अज्ञात माणसाने टिष्ट्वटरवर काही मजकूर टाकला. तो टाकणारा कोण याचा पत्ता नाही, तो मजकूर कोणता याची माहिती नाही आणि त्यामुळे खरोखरीच धार्मिक भावनांना धक्का लागतो की नाही, याची शहानिशा नाही. मात्र, तेवढ्या एका कारणाखातर एका तरुणाचा बळी घ्यायला १० जणांनी सज्ज व्हावे, ही धार्मिक असहिष्णुतेची व येऊ घातलेल्या अमानुष आपत्तीची सूचना देणारी बाब आहे. स्वत:ला जातिपंथाचे वा धर्मविचाराचे प्रतीक म्हणवून घेणारे अनेक संत, महंत, महात्मे व गुरू सध्या समाजात वावरत आहेत. राजकारणात राहिलेल्या व अजून असलेल्या काही पुढार्‍यांनीही स्वत:ला धर्मपंथाचा पेहराव चढविला आहे. त्यांच्या अंधश्रद्ध अनुयायांना आपल्या त्या पुढारी बाबाचा अवमान वा त्याच्यावरील टीका ही थेट धर्मावरील टीका वाटते. १९९१पासून देशात धर्मांधतेचे वातावरण गडद करण्याचे राजकारणच एका राजकीय परिवाराने केले. त्याची प्रतिक्रियाही सार्‍या देशात तशीच उमटली. तीत केवळ बाबरी मशीदच उद्ध्वस्त झाली नाही, ओडिशातील १,२००हून अधिक प्रार्थनास्थळे जाळली गेली आणि काही धर्मपंथांचे प्रमुखही मारले गेले. एवढा उन्माद ही आग शमवायला व संबंधितांना अंतर्मुख करायला पुरेसा होता; पण तसे झाले नाही. पाकिस्तान या शेजारी देशाने आपल्या हस्तकांकरवी या आगीत जास्तीचे तेल टाकण्याचा अपराध केला. त्याच्याही मग प्रतिक्रिया उमटल्या. मुंबई, भिवंडी, मालेगाव, बंगळुरू, हैदराबाद, पंजाब अशी सगळी क्षेत्रेच पेटून उठलेली दिसली. धार्मिक ठिणगी केवढीही लहान असली वा ती कुठेही पडली, तरी ती सारा समाज आगीच्या कवेत आणू शकते, याचेच ते चित्र होते. अशा वेळी समाजाला संयम, सामंजस्य व विवेक शिकवणारी वजनदार व आदरणीय माणसे एके काळी देशात होती. संतप्त समाजाला सामोरे जाण्याचे धाडस नेहरूंमध्ये होते, पटेलांमध्ये होते आणि एसेम जोशींमध्ये होते. अगदी अलीकडे सोलापुरात झालेल्या दंगलीच्या वेळी घरातले वडिलांचे श्राद्ध टाकून उघड्या अंगाने जमावाला सामोरे जाणार्‍या विलासराव देशमुखांनी ते दाखविले; पण ही माणसे आताशा कमी झाली आहेत. शांततेहून भडका हाच जास्तीचा राजकीय फायदा मिळवून ,देतो हे समजलेली माणसे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. ती अशाच गोष्टींचा लाभ घेतात व ठिणगीचे रूपांतर आगीत करतात. तशी पुण्यातली घटनाही सामान्य नाही. मोहसीन शेख हा सोलापूरचा २८ वर्षांचा तरुण इंजिनिअर तिथल्या हडपसर भागात एका भाड्याच्या खोलीत आपले तीन मित्र व धाकट्या भावासोबत राहणारा. पुणे हे सभ्य व संयमी शहर म्हणून तेथे कायमचे वस्तीला जायचे मोहसीनच्या आई-वडिलांच्या मनात. प्रत्यक्षात परवा मोहसीन जेवण आणायला आपल्या मित्रासोबत मोटारसायकलने खोलीबाहेर पडला आणि परतताना त्याला त्याचे मारेकरी आडवे आले. हॉकीस्टिक, काठ्या आणि तशाच इतर हत्यारांनी त्यांनी मोहसीनला बेदम मारले. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी पुण्यात बसवर दगडफेक करण्याचा व त्यांची जाळपोळ करण्याचा एक ‘पोग्रॅम’ या मारेकर्‍यांच्या साथीदारांनी केलाही होता. हे मारेकरी कधी एकटे नसतात. त्यांच्या मागे टोळ्या असतात आणि त्या टोळ्यांच्या मागे त्यांचे समर्थन करणार्‍या संघटनाही असतात. महाराष्ट्राचे पोलीस खाते दुबळे आहे. गृहमंत्री घोषणांवर थांबणारे आहेत आणि टोळीबाजांचे समर्थक शक्यतो तपासाच्या कक्षेबाहेर राहतील, याची काळजी घेणार्‍या यंत्रणा गृहमंत्रालयात कार्यरत आहेत. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी ज्या यंत्रणेला सापडत नाहीत, तिला ठरवून केलेल्या धार्मिक हत्याकांडामागचे खरे सूत्रधार कधी सापडतील, यावर विश्वास तरी कोणी व कसा ठेवायचा? मोहसीनचे मारेकरी हे पुण्याचे वा महाराष्ट्राचे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यांच्या अपराधाचे ओझे त्यांच्यावर ठेवण्याचे कारणही नाही. मात्र, अशा घटनांचा सार्वत्रिक निषेध होत नसेल, तर तो मात्र सार्‍या समाजाच्या अपराधीपणाचा वा अपराधप्रसंगी मूक राहण्याच्या दुबळ्या मानसिकतेचा परिणाम म्हणावा लागेल व तो टाळणे, हे आपले कर्तव्य आहे.