- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली
९ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत असून,त्यात बरेच राजकारण रंगेल. सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध लोकसभेमध्ये मांडलेला अविश्वास ठराव अर्थातच आपटेल; पण त्यावरून विरोधी पक्षांना गेलेले तडे हा बातमीचा विषय आहे. या प्रस्तावामुळे कोण कोठे उभे आहे, हे स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेसने काँग्रेसच्या सुरात सूर मिसळायला नकार दिला. ‘सभापतींना थोडा वेळ द्यायला हवा’ असे तृणमूलचे म्हणणे. खासदारांनी प्रस्तावावर सही केली असली तरी समाजवादी पक्षातही काही वेगळी मते आहेत. आपसुद्धा आपलेच गाणे गात आहे.त्यामुळे अर्थातच आकडे सरकारच्या बाजूने आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे भाजपचे २४० धरून २९३ खासदार आहेत. इंडिया आघाडी आणि तृणमूल काँग्रेस मिळून २३३ होतात. सात खासदार दोन्ही आघाड्यांच्या बाहेर आहेत. त्यात ‘एआयएमआयएम’, ‘बीआरएस’ आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांतले खासदार आहेत. आपल्याच बहुमतावर संपूर्णपणे भिस्त ठेवण्यापेक्षाही सरकार या छोट्या भिडूंना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहे.
अलीकडे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षात बऱ्याच कुरबुरी दिसून आल्या. त्यामुळे उत्साहित होऊन भाजप त्यांच्यातील दुफळी वाढविण्याच्या उद्योगात आहे. समाजवादी पक्ष आणि शिवसेना-उद्धवसेनामधील एखादा गट अनुपस्थित राहिला तर तृणमूल काँग्रेसच्या अनुपस्थितीवर विरोधकांची संख्या २०० च्या खाली जाईल. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रस्तावावर सही केलेली नाही; पण वेळ पडली तर हा गट सभात्याग करील. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सभापतींच्या आसनाला धक्का लागणार नाही. विरोधकांची एकी मात्र आणखी दुर्बल होईल. इंडिया ब्लॉकमधील इतर मित्रपक्षही ठरावाच्या बाजूने मत देण्याच्या विचारात नाहीत.
प्रियांका कामाला लागल्या! प्रियांका गांधी वड्रा या निवडणुकीत उपयोगी पडेल अशी शक्ती म्हणून पुढे येऊ शकतात काय? आसामात लवकरच निवडणुका होत आहेत. उमेदवार निवड समितीच्या अध्यक्ष या नात्याने प्रियांका गांधी यांनी अलीकडेच आसामचा दौरा केला. आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांबरोबर त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना निर्भयपणे व्यक्त होऊ दिले. तिकीट वाटपातील कापाकापी, स्वत:च्या पक्षातले प्रादेशिक सुभेदार, आघाडीची अडलेली बोलणी, तसेच माजी प्रदेशाध्यक्ष भूपेनकुमार बोरा यांचे पक्षाबाहेर जाणे सगळे काही त्यांना पाहायला मिळाले.पंचायती आणि पोटनिवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर एकंदर वातावरण उदास होते. प्रियांका यांनी दिखाऊपणा न करता काम करत राहायचे ठरवलेले दिसते. जिल्हास्तरावरील सल्लामसलती, व्यापक संपर्क, उमेदवार याद्यांची छाननी या सगळ्यातून त्यांना निदान आणि उपाययोजना दोन्ही करावयाची आहे. त्यांनी राजकीय चुणूकही दाखवली. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांना लक्ष्य केले तेव्हा ‘हा आमचा सन्मानच आहे’ असे वर्णन करून त्यांनी माघार घेण्याऐवजी संयम दाखवला. झुबीन गर्ग यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांनी स्थानिक भावनांचा आदरही केला.
प्रियांका पक्षात उत्साह निर्माण करत असल्याने संघटनात्मक दुफळीवर मात मिळेल काय? अंतर्गत कुरबुरीशिवाय काँग्रेस आघाडी करू शकेल? - प्रियांका यांनी निदान सुरुवात तरी करून दिली आहे. आसाममध्ये त्यांना यश मिळते की नाही, हे आघाडीची गणिते आणि एकीवर ठरणार आहे.
हवेत बंदुका, पक्षात धूर ‘दिल्ली गॅस चेंबर झाली आहे’ असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर तो विषय प्रदूषणाचा न राहता राजकारणाचा झाला. दिल्लीत भाजपचे राज्य आहे. देशाच्या राजधानीबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे काही बोलले, त्यामुळे पक्षात धुरळा उडणे स्वाभाविकच होते. पक्षश्रेष्ठींनी जाहीरपणे त्यावर काही बोलण्याचे टाळले. खासगीत मात्र याचे ‘मोजमाप’ झालेच! आदित्यनाथ केवळ टीका करून थांबले नाहीत. त्यांनी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता आणि गोरखपूरमधील समतोल विकासाचे प्रारूप यांची तुलना केली. ‘गोरखपूरमध्ये हवा स्वच्छ आहे. पर्यावरणाची जबाबदारी घेतली जाते, शिवाय दैवी आशीर्वाद तर आहेतच,’ असे ते म्हणाले. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट निघतो. फुप्फुसे शाबूत ठेवून योगींना दमदार कारभार करावयाचा आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे गुजरात मॉडेल देशासमोर ठेवले, तसे काहीसे योगींनाही करावयाचे दिसते. ही केवळ पर्यावरणाची चिंता आहे की अमित शाह सत्तेचे दुसरे केंद्र मानले जात असताना मोदींच्या नंतर आपणही असू शकतो, असे योगींना शांतपणे सुचवायचे आहे?
राघव चढ्ढा कुठे गेले?विशेष न्यायालयाने लीकरगेट प्रकरण मोडीत काढले आणि आम आदमी पक्ष आनंदाने नाचू लागला. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हा विजयाचा दिवस होता; परंतु त्या सगळ्या जल्लोषात एक आवाज संशयास्पदरीत्या गायब होता - राघव चढ्ढा! एकेकाळी ते पक्षाचे बोलघेवडे पोस्टर बॉय होते. मात्र, यावेळी ते गप्प राहिले. पोस्ट नाही, टीव्हीला बाइट नाही, आपच्या गळ्याभोवतीचा फास निघाला यावर काहीच भाष्य नाही. विचारल्यावर मनीष सिसोदिया यांनी ‘आज नको’ एवढे बोलून उत्तर टाळले. त्यामुळे या कोड्यामधले गूढ आणखी वाढले आहे. harish.gupta@lokmat.com
Web Summary : Amidst external conflicts, Indian politics heats up as the budget session resumes. Opposition unity faces challenges with differing opinions on no-confidence motions. Priyanka Gandhi aims to revitalize Congress in Assam. Speculation surrounds Raghav Chadha's absence during AAP's legal victory, adding to the political intrigue.
Web Summary : बाहरी संघर्षों के बीच, बजट सत्र फिर से शुरू होने पर भारतीय राजनीति गरमा गई है। अविश्वास प्रस्तावों पर अलग-अलग राय के साथ विपक्षी एकता को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। प्रियंका गांधी का लक्ष्य असम में कांग्रेस को पुनर्जीवित करना है। आप की कानूनी जीत के दौरान राघव चड्ढा की अनुपस्थिति से अटकलें तेज हो गई हैं, जिससे राजनीतिक षडयंत्र बढ़ गया है।