'द्रष्टा' हे अमेरिकन विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र लिहावे असे का वाटले? या पुस्तकाची सुरुवात एका अनपेक्षित आग्रहातून झाली. वॉल्डन पब्लिकेशनचे प्रकाशक अभिषेक धनगर यांच्याशी गप्पा सुरु होत्या. गप्पांमध्ये त्यांनी थेट डेव्हिड थोरो यांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली.
माझा इंग्रजी साहित्याशी थेट संबंध नाही, वयाच्या या टप्प्यावर नव्या विषयात शिरणे शक्य नाही, संदर्भग्रंथ मिळवणे कठीण... अशी माझी स्पष्ट भूमिका होती; पण तिसऱ्याच दिवशी त्यांनी आठ संदर्भग्रंथ पाठवले. नकळत मी त्या विचारविश्वात अडकत गेले. गेली चाळीस वर्षे मी ज्या चरित्रनायकांचा शोध घेत होते स्वतःची वाट निवडणारे, सत्याशी प्रामाणिक राहणारे, समाजाच्या मतापलीकडे जाऊन मानवजातीसाठी काही तरी वेगळे घडवू पाहणारे - या प्रवृत्तींचे प्रतिबिंब मला थोरोमध्ये दिसले.
निसर्ग, शाश्वत विकास, चंगळवाद अशा ज्या विषयांवर आपण आज बोलतो, ते थोरो १८४० च्या सुमारास मांडत होता. वॉल्डन म्हणजे फक्त पुस्तक नव्हे; तो त्यांच्या आयुष्यातला एक प्रयोग होता -कमीत कमी साधनांत, साधेपणाने जगण्याचा. 'किती कमीमध्ये जगता येते?' हा प्रश्न त्यांनी जगून तपासला. सविनय कायदेभंगाची बीजे, श्रमप्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य या साऱ्यांचे मूळ तिथे सापडते. पृथ्वीची काळजी तुम्ही घ्या, पृथ्वी तुमची काळजी घेईल... माणूस हा समाजाचा घटक असण्याच्या आधी तो निसर्गाचा घटक आहे, निसर्ग आणि माणूस यात द्वैत नाही, हे थोरोंनी मांडलेले शे-दीडशे वर्षापूर्वीचे विचार आज अधिकच लागू पडतात, असे मला प्रकर्षाने वाटले.
थोरो यांचे निसर्गदर्शन केवळ सौंदर्यात्मक नसून नैतिक व राजकीयही आहे. हा बहुआयामी दृष्टिकोन मांडताना कोणती आव्हाने आली?
- निसर्गाशी आपले नाते केवळ कौतुकापुरते न ठेवता त्यातील नैतिकता समजून घेणे, हे आव्हान होते. चंगळवाद कमी केला, तर निसर्गावरचे आक्रमण आपोआप घटते. थोरोची निरीक्षणपद्धती विलक्षण होती. त्यांनी वर्षानुवर्षे निसर्गाच्या सूक्ष्म नोंदी ठेवल्या. फुलोरा, पानांची हिरवळ, पक्ष्यांची हालचाल... तक्त्यांतून पॅटर्न शोधले. या नोंदी कोरड्या नव्हत्या; त्यात लालित्य होते, मानवी जीवनाशी जोड होती. ते शास्त्रज्ञ नव्हते; पण त्यांच्या अभ्यासाची शिस्त शास्त्रीय होती. पुढे या नोंदी हवामानबदलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या ठरल्या. सविनय कायदेभंगाबाबत त्यांची भूमिका व्यक्तिकेंद्रित होती. 'एक व्यक्ती सत्यासाठी उभी राहिली, तरी ती ऐकली गेली पाहिजे.' गुलामगिरीविरोधात त्यांनी चळवळीपेक्षा प्रत्यक्ष मदत निवडली. स्त्रीवादाबाबतही विचार बदलण्याचा मोकळेपणा त्यांनी दाखवला. या साऱ्यांचा समतोल राखत लेखन करणे हेच खरे आव्हान होते
भारतीय सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात थोरो यांचे विचार आपण कसे 'अनुवादित' करता-भाषेच्या पलीकडे जाऊन?
- काही मूल्ये स्थल-कालातीत असतात. झाडे, फळे, पक्षी... स्थळ बदलले तरी अनुभूती तीच राहते. साधेपणा, निसर्गाशी तादात्म्य, उत्पत्ती-स्थिती-लय ही तत्त्वे आपल्या परंपरेतही आहेत. म्हणूनच थोरो आपले वाटतात. व्यापक वाचन असेल, तर या विचारांना आपल्या भाषेत, आपल्या संस्कृतीत उतरवणे कठीण जात नाही.
साधेपणा आणि आत्मनिर्भरता या संकल्पना आजच्या जगात कितपत लागू पडतात? - का नाही?
'कुठे थांबायचे' हे कळले, की मार्ग सापडतो. ज्यांना स्वतःला कुठे थांबायचे हे कळले त्यांना थोरो जास्त जवळचा वाटण्याची शक्यता आहे; पण जे चंगळवादाच्याच मागे लागले आहेत त्यांना तो पटणार नाही. कोरोनाच्या काळात अनेकांनी लिहिले की थोरो उपयोगी पडला, घड्याळाच्या शर्यतीतून बाहेर येऊन स्वतःशी संवाद साधता आला, ठेहराव अनुभवता आला. आज जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल पाहता विकासाची व्याख्या पुन्हा ठरवावी लागेल. पृथ्वी कितीही प्रदूषित झाली तर इथले सगळे फस्त झाले म्हणून माणूस परग्रहावर जाऊन राहू शकतो का? नाही ना...? आपल्या पुढच्या पिढीचे काय? तेव्हा कुठे थांबावे याचा विचार करावाच लागेल. विकास म्हणजे विनाश नव्हे, तर मानवी जीवन सुसह्य करणे म्हणजे विकास. गरजा वाढवायच्या की नाहीत, हे आपल्या हातात आहे. म्हणूनच द्रष्टा कालातीत ठरतो.
चरित्रलेखनात तथ्यनिष्ठता आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा समतोल कसा साधता?
- वाचनाने चांगले-वाईट दोन्ही कळते. मला जसे वाचायला आवडते, तसे मी लिहिते. चरित्रलेखनात मला शोधायचे असते माणूस असा का घडतो? परिस्थितीसमोर न झुकता तो शिखरापर्यंत कसा पोहोचतो? पुस्तक लिहिणे हा माझ्या समजण्याचा शेवटचा टप्पा असतो.
मुलाखत आणि शब्दांकन दुर्गेश सोनार,
सहायक संपादक, लोकमत durgesh.sonar@lokmat.com