शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे दिवाळे; एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 07:18 IST

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी ...

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता. त्याचे वेळेवर विभाजन केले नाही. केल्यानंतर त्या महावितरण कंपनीला ताकद दिली नाही. आलटून पालटून सत्तेवर येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारने कधी शेतकरी हिताचा, तर कधी घरगुती ग्राहक हिताचा पुळका घेऊन महावितरण कंपनीलाच अडचणीत आणण्याचे राजकारण केले.

विधानसभेत परवा पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सारे जण महावितरणवर तोंडसुख घेत होते. सर्व नाटके करता येतील, पण पैशाचे नाटक कसे करणार? काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवरून गेले तेव्हा महावितरणची थकबाकी १४ हजार कोटी रुपये होती. भाजपचे सरकार आले आणि नव्या ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे विजेची थकबाकी असली तरी कनेक्शन तोडणार नाही, अशी घोषणा केली. महावितरणची वसुली थांबली. भाजप सरकार सत्तेवरून पायउतार होत असताना १४ हजार कोटी रुपयांची थकबाकी ५४ हजार कोटींवर गेली. चाळीस हजार कोटींची भर घालून पुन्हा थकबाकी असू द्या, पण शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असे ओरडून भाजपचे नेते सांगत होते.

शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, पण विजेचे पैसे कोणी भरायचे? थकबाकी असताना महावितरण चालवायचे कसे, याचे उत्तर महाराष्ट्रात तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेला द्यावे. अशा प्रकारच्या व्यवहाराने महावितरण कंपनी चालणार आहे का? महावितरणची थकबाकी ६४ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून दाेन वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. शेतकऱ्यांनी विजेचे पैसे दिले नाही तरी वीजपुरवठा खंडित करायचा नसेल, तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून ही थकबाकी भागवावी. स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती ते महापालिकांपर्यंत) पथदिवे आणि पाणीपुरवठ्यासाठी विजेचा वापर करते, ती थकबाकी नऊ हजार अकरा कोटी रुपयांवर गेली आहे. या सर्व संस्थांवर सरकारचे नियंत्रण असते.

सरकारी अधिकारी तेथे प्रशासक असतात. या संस्था जो महसूल गोळा करतात, त्यातून विजेचे बिल आधी बाजूला काढून महावितरणला द्यावे, असा आदेश देण्याचा आग्रह आमदार का धरीत नाहीत? सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांच्या मागणीच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलानंतरही पुढील तीन महिने वीजतोडणी करायची नाही, ज्यांची वीजतोडणी केली आहे, ती पण पूर्ववत जोडून द्यायची, असा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देऊन टाकला आहे. शेतीला लागणाऱ्या विजेचे पैसे देऊ शकत नसतील तर त्याची कारणे शोधून काढावीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या वायद्याचे २०२२ हे वर्ष आहे. कारण तसे आश्वासन दिले होते. महावितरणचे अधिकारी सांगत होते की, विजेचे पैसे न भरणाऱ्यांची वीज कायमस्वरूपी खंडित केली आहे. त्यांच्याकडे ६ हजार ४२३ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांकडे ४४ हजार ९२० कोटी रुपये थकीत आहेत. काही शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत एक पैसाही महावितरणला दिलेला नाही. अशाने एका मोठ्या महावितरण कंपनीचे दिवाळे निघणार आहे. ज्या आमदारांनी ऊर्जामंत्र्यांवर हल्लाबोल केला आणि थकबाकी असतानाही वीजतोडणीस विरोध केला, त्यांनी आपल्या मतदारसंघातील थकबाकीच्या वसुलीची जबाबदारी स्वीकारावी.

आज खासगीकरणाचा आग्रह सर्वच क्षेत्रांत धरतात. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर आणि शेतकरीवर्गाला थकबाकी असतानाही वीजपुरवठा कोणती खासगी वितरण कंपनी करणार आहे? मुंबई-ठाण्यासारख्या शहरातील विजेच्या वितरणाचे खासगीकरण झाले आहे. नंदुरबार, गडचिरोली किंवा नांदेडच्या किनवट या ग्रामीण टोकापर्यंत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यायला कोणी खासगी कंपनीवाले पुढे येतील का? हा धोका वेळीच ओळखून महावितरण कंपनी अधिक कार्यक्षम कशी होईल याचा विचार गांभीर्याने करायला हवा. शेतकऱ्यांना माफक, मुबलक आणि नियमित वीजपुरवठा करायला हवा. मात्र, त्याचे पैसे त्यांनी भरावेच, त्यांना शक्य नसेल तर सरकारने ती जबाबदारी स्वीकारावी. थकीत कर्जे माफ करताना संबंधित वित्तीय संस्थांना सरकार पैसा देते, कर्जमाफी म्हणजे कोणीच कोणाचे देणे लागत नाही, असे जाहीर करणे नव्हे. तेव्हा महावितरणला दिवाळखोरीत काढू नका!

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज