मिशन लोकसभा; ठरलं तर मग?

By रवी टाले | Published: December 17, 2023 10:12 AM2023-12-17T10:12:33+5:302023-12-17T10:12:59+5:30

मुद्द्याची गोष्ट : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि त्याबरोबरच वेध लागले ते 2024 मधील लोकसभा निवडणुकीचे! भाजपने हिंदी पट्ट्यातील तीनही राज्ये जिंकून टेनिसच्या भाषेत सांगायचे तर एक प्रकारचे ‘अपसेट’ घडविले. आता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी यांचे डावपेच काय असतील? प्रचारात कोणते मुद्दे समोर येतील? 

Mission Lok Sabha; If so? | मिशन लोकसभा; ठरलं तर मग?

मिशन लोकसभा; ठरलं तर मग?

- रवी टाले
कार्यकारी संपादक, जळगाव
पूर्ण भारतात समान व्यूहरचनेवर आणि मुद्द्यांवर लोकसभानिवडणूक लढविली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. मुळात सध्याच्या घडीला ढोबळमानाने राजकीयदृष्ट्या भारताचे तीन भाग पडल्याचे दिसत आहेत. उत्तर भारत, दक्षिण भारत आणि त्या भूभागांच्या मध्यभागी असलेला महाराष्ट्र, यांच्या राजकारणाचा बाज वेगवेगळा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय पूर्व भारतातील पश्चिम बंगाल व ओडिशा ही दोन राज्ये आणि ईशान्य भारताचे राजकारणही उत्तर भारताच्या राजकारणापासून वेगळे आहे. पुन्हा दक्षिण भारतातही तामिळनाडू व केरळ या सुदूर दक्षिणेतील राज्यांच्या तुलनेत कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशचे राजकारणही थोडेफार वेगळे आहे. त्यामुळे काही समान डावपेच आणि मुद्द्यांसह त्या त्या भागात काम करणारे डावपेच व मुद्देही उभय बाजूंकडून वापरले जातील, हे स्पष्ट आहे.

एनडीएमध्ये सांगायला खंडीभर छोटे पक्ष असले तरी तो भाजपचा एकखांबी तंबू आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या आघाडीत भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा असेल, हे स्पष्ट आहे. विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर ते जरा जास्तच स्पष्ट झाले आहे. त्या तीनही राज्यांतील मतदारांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर पसंतीची मोहर उमटवल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. या राज्यांत चाललेले मुद्दे लोकसभा निवडणुकीतही जोरकसपणे प्रचारात आणले जातील, हे उघड आहे. त्यातच जानेवारीत अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने त्याचाही भाजपला लाभ होईल. `मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे’ या भाषेत विरोधकांनी उडवलेल्या खिल्लीचा पुरेपूर वचपा काढण्याची सुवर्णसंधी भाजपकडे आहे. जोडीला ३७० वे कलम, `सर्जिकल स्ट्राईक’, `एअर स्ट्राईक’ इत्यादी विषय असतीलच! केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांवर खास भर असेल!

मोदी लाट, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणकारी योजनांशिवाय, विरोधकांचा भ्रष्टाचार हा भाजपच्या भात्यातील आणखी एक अमोघ बाण असेल. `जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है’, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या `ट्विटर पोस्ट’ने ते स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली ३५० कोटींची रोख रक्कम आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे `कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या हाती हा बाण लागला आहे.

काय असेल विरोधकांची रणनीती?

दुसऱ्या बाजूला विरोधक उपांत्य सामन्यातील पराभवाने गांगरले आहेत; पण त्यातही आपला स्वार्थ साधण्याची संधी शोधण्यात मश्गुल झाले आहेत. इंडिया आघाडीची पूर्वनिर्धारित बैठक रद्द होण्यामागे तेच कारण होते. पराभवाने `बॅकफूट’वर गेलेल्या काँग्रेसला रेटता येईल तेवढे मागे रेटण्याचे प्रयत्न आघाडीतील काँग्रेसेतर पक्षांनी सुरू केले आहेत. ही आघाडी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराविनाच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. 
बिहारमधील नितीश-लालू जोडगोळीने चर्चेच्या केंद्रस्थानी आणलेल्या जातनिहाय जणगणनेचा मुद्दा काँग्रेसने विधानसभा निवडणुकांमध्ये वापरला. त्यातून भाजपच्या हिंदू मतपेढीमध्ये विभाजन घडवून आणता येईल,
असा विरोधकांचा होरा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून जातनिहाय जनगणना हा मुद्दा केंद्रस्थानी असेलच! 

प्रचारात कोणते असतील मुद्दे?
केंद्र सरकारच्या पातळीवरील भ्रष्टाचार म्हणता येईल, असे कोणतेही प्रकरण अद्याप तरी विरोधकांच्या हाती लागलेले नाही. तसे ते लागावे असा प्रयत्न विरोधक करतीलच; पण ते शक्य न झाल्यास राफेल खरेदीमधील कथित भ्रष्टाचार हा विषय विरोधकांतर्फे पुन्हा एकदा प्रचारात आणला जाण्याची शक्यता आहे. शिवाय भाजप देशात दुभंग निर्माण करीत असल्याचा मुद्दाही असेलच! यापैकी कोणत्या आघाडीचे कोणते मुद्दे मतदाराला भावतात, याचे उत्तर मिळण्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागेल!

लोकसभा निवडणुकीतही ‘मोदी की गारंटी’
nराजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ‘मोदी की गारंटी’ खणखणीत वाजल्याने लोकसभा निवडणुकीपर्यंत ती कायम ठेवली जाईल आणि ‘गॅरंटी’मध्ये `कव्हर’ होणाऱ्या बाबी वाढतच जातील, यात दुमत नसावे. 
nनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा असतो; पण कदाचित निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच 
आश्चर्यकारकरित्या विरोधकांचा भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा ठरण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.

पक्ष-चिन्हाचा नाही पत्ता 
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्तेत असलेले सुपात, तर विरोधातील जात्यात अशी अवस्था आहे. ठाकरे आणि शरद पवार गटाची ऊर्जा आणि पैसा निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयातील लढाईतच खर्ची पडत आहे. अशात लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पत्ता नसताना पूर्ण ताकदीने उतरण्याचे आव्हान शरद पवार-ठाकरे गटापुढे आहे.

अवतरले ‘हनुमान’ 
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी आपले नाव सार्थक करून दाखवले. १३ डिसेंबरला संसद भवनाची सुरक्षा भेदून सागर शर्मा व मनोरंजन डी. यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उड्या मारल्या तेव्हा त्यांच्यापाशी बॉम्बदेखील असू शकतो, याची पर्वा न करता बेनीवाल यांनी दोघांना पकडले आणि त्यांची जोरदार धुलाई केली. 

पदाची आसक्ती
तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या पक्षांतर्गत अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. या तीन राज्यांमध्ये एक नेता प्रदेश अध्यक्ष आहे. ते राजीनामा देतील, असे सांगितले जात होते. या राज्याच्या आमदारांची दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीलाही ते पोहोचले नाहीत. आता त्यांना बदलण्यात आले आहे.

Web Title: Mission Lok Sabha; If so?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.