शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांना दुय्यम वागणूक मिळू नये..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:40 IST

घटनात्मक बंधुता,  समता ही तत्त्वे अंगीकारण्याची हीच वेळ आहे. अल्पसंख्य-बहुसंख्य अशा आधारावर समाजात दरी निर्माण करणे थांबले पाहिजे. दुर्दैवाने राजकीय पक्ष सोयीसोयीने तक्रारी करतात

ठळक मुद्देलोकशाहीत कोणत्याही अन्यायाला थारा नाही. घटनेची अपेक्षा तीच आहे. निरपराधांना मारणाऱ्यांची गय होता कामा नये.

फिरदौस मिर्झा

धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ यावरून कोणाच्याही बाबतीत सरकारने भेदभाव करता कामा नये, असे भारतीय घटनेचे कलम १५  सांगते. भारताच्या विविध भागात अशा घटना घडल्याचे दिसते. काश्मिरात हिंदू आणि शिखांच्या बाबतीत त्यांना बाजूला काढून ठार मारले गेले. पुरातन काळापासून  ते तेथे राहत होते. आसामातही तिथले पिढ्यानपिढ्या रहिवासी असलेले मुस्लीम बाहेर काढले गेले. केंद्रीय मंत्र्याच्या कुटुंबीयांकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले गेले. नंतरच्या हिंसेत चौघे मारले गेले, नेमके ते शीख होते. त्रिपुरात अल्पसंख्य मुस्लिमांवर तसेच त्यांच्या मालमत्तांवर हल्ले झाले. मुख्य प्रवाहातील माध्यमे या घटनांकडे कानाडोळा करतात. या सर्व घटनात एक साम्य आढळते ते म्हणजे हे हल्ले बहुसंख्याकांच्या गुंडपुंडांनी  किंवा सरकारच्या हस्तकांनी त्या त्या राज्यातील बहुसंख्याकात लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेले  असतात.  घटनेचा स्वीकार करताना आपण हा देश धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राहील असे कबूल केले आहे. समता, बंधुत्व हे त्याचे स्तंभ असतील.

मानवता विकास, बंधुत्व, सलोखा वाढवणे आपण आपले कर्तव्य मानले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात अनेक राज्ये होती, पण लोकांचा नेत्यांवर विश्वास होता. स्वातंत्र्यलढ्यातील लोकांनी आणि नेत्यांनी नवा लोकशाही देश निर्माण करण्याचा संकल्प केला होता. घटनासभेचे   अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी अल्पसंख्याकांचे हक्क आणि हित सांभाळण्याचे आश्वासन दिले होते. अल्पसंख्याक ही संज्ञा सापेक्ष असून प्रत्येक राज्यानुसार तिचा अर्थ घेतला जाईल. काश्मिरात हिंदू अल्पसंख्य आहेत. आसाम, त्रिपुरात मुस्लीम आणि उत्तर प्रदेशात शीख. लोकशाहीच्या तत्त्वानुसार अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे. बहुसंख्याकांच्या नैतिकतेवर अल्पसंख्याकांचे  भवितव्य अवलंबून असते. उपरोक्त घटना आपण देश म्हणून कसे वाढलो, अल्पसंख्याकांविषयी किती सामंजस्य दाखवतो हे दर्शवतात. आज अल्पसंख्याक केवळ धार्मिक किंवा भाषिक राहिले नसून सत्तारूढांच्या विरोधी सूर काढणारे, मतभेद असणारे त्यात गणले जातात. कोणालाच विशेषत: घटनेला स्मरून ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांना त्यांच्याविरुद्ध ब्र काढलेला चालत नाही. मंत्रिपुत्राच्या गाडीखाली शेतकरी चिरडले गेल्यानंतर एका मुख्यमंत्र्याने आंदोलनकर्त्यांचा सूड घेतला जाईल, असे म्हटल्याची बरीच चर्चा होत राहिली. आपण किती असहिष्णू झालो आहोत, हे सांगायला आणखी पुराव्यांची गरजच नाही.लोकशाहीत कोणत्याही अन्यायाला थारा नाही. घटनेची अपेक्षा तीच आहे. निरपराधांना मारणारांची गय होता कामा नये. काश्मिरी गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. इतर राज्यातील अल्पसंख्याकांना धमकावणाऱ्यांचेही तेच केले पाहिजे. लोकप्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी चिथावणी देताना आढळले तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, तरच देश वाचेल. 

घटनात्मक बंधुता,  समता ही तत्त्वे अंगीकारण्याची हीच वेळ आहे. अल्पसंख्य-बहुसंख्य अशा आधारावर समाजात दरी निर्माण करणे थांबले पाहिजे. दुर्दैवाने राजकीय पक्ष सोयीसोयीने तक्रारी करतात. त्यांच्यासाठी काश्मिरातील नागरिक आसाम, त्रिपुरा किंवा उत्तर प्रदेशातील माणसाच्या बरोबरीचा नसतो. आपण घटनात्मक नैतिकता पाळणार असू तर असे होता कामा नये. आपण देशाचे मालक नव्हे, विश्वस्त आहोत. मागच्या पिढीकडून आलेला वारसा पुढच्या पिढीकडे देणार आहोत. हा वारसा जसा आला तसा मी देणार आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. लखीमपूर खेरीतील घटनेसंबंधी सुनावणीच्या वेळी ८ ऑक्टोबरला भारताच्या सरन्यायाधीशांनी  विचारले, ‘‘आपण कायदा मोडणाऱ्या सर्वांना कठोर कायदा लावतो की त्यांचा धर्म, राजकीय विचार यानुसार शिक्षा करतो?’’ - न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वांनी विवेकाला स्मरून शोधले पाहिजे.

( लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत )

टॅग्स :Muslimमुस्लीमCourtन्यायालय