मनमोहन सिंग हे राजकारणी नाहीत, ते अर्थतज्ज्ञ आहेत, प्रस्थापित राजकारणाची पठडी व त्यातील नेते यात ते बसणे अशक्य आहे, असे सर्वसाधारणत: मानले जात आले आहे. पण हा समज कितपत खरा आहे, असे वाटण्याजोगा प्रसंग मोदी सरकारला एक वर्ष पुरे होत असताना घडला आहे. काँग्रेसप्रणीत ‘नॅशनल स्टुडन्ट्स युनियन आॅफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेच्या अधिवेशनात बोलताना डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. वृत्तवाहिन्यांवर त्यांचे हे आरोप झळकत असताना काही तासांच्या अवधीतच डॉ.सिंग पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन थडकले आणि मोदी यांच्याशी ते हसतमुखाने हस्तांदोलन करीत असल्याची छायाचित्रे ट्विटरवर फिरू लागली. मग दिवसभर चालू असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत संध्याकाळी बोलताना, ‘अर्थव्यवस्था सुधारण्याचे धडे मोदी सरकारला देण्यासाठी डॉ. सिंग यांनाच शेवटी बोलवावे लागले’, अशी मल्लीनाथी राहुल गांधी यांनी केली. विकासात राजकारण नको, राजकीय मतमतांतरे नकोत, सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या प्रक्रि येत साथ देत सहभागी व्हायला हवे, अशी नवी प्रथा अलीकडच्या काळात राजकारणात पाडण्यात आली आहे. म्हणून मग मोदी व त्यांची भाजपा निवडणूक प्रचारात सामाजिक ध्रुवीकरणाचे डावपेच खेळतात, जमातवादी विद्वेषाचे विष समाजमनात कालवतात, त्याद्वारे मतांची बेगमी करतात आणि सत्तेवर आल्यावर ‘सबका विकास, सबका साथ’ ही रेकॉर्ड लावून ठेवतात. भाजपा कशी संधीसाधू आहे, संघाच्या ती कशी कचाट्यात आहे, यावर निवडणूक प्रचारात भर देणारे शरद पवार निकाल लागत असतानाच, महाराष्ट्रात स्थिर सरकार हवे, या उद्देशाने नव्या सत्ताधाऱ्यांना एकतर्फी पाठिंबा जाहीर करून टाकतात. पुढे बारामती येथील एका कार्यक्रमाला पंतप्रधान बनलेल्या मोदी यांना बोलावतात. असा दुटप्पीपणा व संधीसाधूपणा करायचा आणि पराकोटीच्या निगरगट्टपणे त्याचे समर्थन करण्यासाठी वैचारिकतेचा आव आणायचा, हा आता राजकारणाचा स्थायीभाव बनला आहे. मोदी सरकारवर घणाघाती टीका करून नंतर लगेचच पंतप्रधानांची भेट डॉ.सिंग यांनी घेतल्याने, अशा दुटप्पी व संधीसाधू राजकारण्यांच्या गोतावळ्यात सामील होत असल्याचा आरोप ते स्वत:वर ओढवून घेत आहेत. ‘मोदी यांनी मला बोलावले आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून मी त्यांची भेट घेतली, ते राजकीय शिष्टाचाराला धरूनच आहे’ , असा युक्तिवाद डॉ.सिंग करू शकतील. पण तो कोणाला पटणार नाही आणि तसा तो पटणार नाही, हे डॉ.सिंग यांनाही माहीत आहे. मग ते असे का वागले असतील? स्वत:च्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला अतिशय जपणाऱ्या डॉ.सिंग यांनी असे पाऊल का टाकले असावे? त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या सभेत केलेले भाषण बारकाईने बघितल्यास आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षांतील घटनांशी त्याची सांगड घातल्यास या प्रश्नाची उकल करण्याची दिशा सापडू शकते. ‘पंतप्रधानपद वापरून मी स्वत:चा, माझ्या कुटुंबियांचा व माझ्या मित्र परिवाराचा कधीच फायदा करून दिला नाही’, असे ठामपणे सांगून, प्रदीप बैजल या ‘ट्राय’च्या माजी प्रमुखाने केलेले सर्व आरोप त्यांनी दिल्लीतील भाषणात फेटाळून लावले. पण याच प्रतिपादनात ‘मी काँग्रेस पक्षालाही फायदेशीर ठरेल, असे निर्णय घेतले नाहीत’, हे डॉ.सिंग यांनी सांगितले नाही. हे जाणीवपूर्वक घडले की, सत्ता सोनिया गांधी यांच्याकडेच होती, या भाजपाच्या आरोपाची ही पुष्टी होती? त्याचबरोबर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शेवटच्या काही वर्षांत आर्थिक धोरणावरून डॉ.सिंग आणि सोनिया गांधी व त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रीय सल्लागार समिती यांच्यात मतभेद विकोपाला कसे गेले होते, डॉ.सिंग यांना निर्णय स्वातंत्र्य कसे उरलेले नव्हते, पंतप्रधानांच्या कार्यालयातील फायली सोनिया गांधी यांच्याकडे कशा जात असत, याचे सविस्तर वर्णन डॉ.सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळातच प्रसिद्ध झालेल्या ‘अॅॅक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’ या पुस्तकात केले आहे. त्यावरून गदारोळ उडाल्यावर डॉ.सिंग यांनी तोंड उघडले नाही, फक्त त्यांच्या मुलीने या तपशीलाचा इन्कार केला होता, ही बाबही दुर्लक्षीत करण्याजोगी नाही. त्यामुळेच बारू यांच्यामागे डॉ.सिंगच असावेत, असा समज पसरण्यास हातभार लागला. या पार्श्वभूमीवर मोदींवर सडकून टीका केल्यावर लगेच त्यांची डॉ.सिंग यांनी घेतलेली भेट आणि राहुल गांधी यांची मल्लीनाथी बघायला हवी. तशी ती बघितल्यास मोदी यांची भेट घेऊन डॉ.सिंग हे सोनिया गांधी यांना, ‘माझ्यावरच्या आरोपांना पक्ष जर ठोस उत्तर देण्यास कमी पडला, नरसिंह राव यांच्यासारखे मला एकटे पाडायचे प्रयत्न झाले, तर मी काय करू शकतो ते बघा,’ हा इशारा देत आहेत, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. पक्षाशी इतके निष्ठावान असलेल्या डॉ.सिंग यांच्या मनात असे काही येईलच कसे, हा प्रश्न साहजिकच विचारला जाऊ शकतो. पण दिल्लीच्या सिंहासनासाठी कोणी काय काय केले, याचा ऐतिहासिक काळापासूनचा नुसता तपशील जरी डोळ्यांंखालून घातला, तरी सत्तेची किमया कशी असते, याचे प्रत्यंतर येते. या किमयेने भल्या-भल्यांनाही भुलवले. तेथे डॉ. सिंग कसे अपवाद ठरतील ?
मनमोहनी डावपेच
By admin | Updated: May 29, 2015 23:51 IST