शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 06:52 IST

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार गंभीरपणे पावले उचलत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. तथापि, या अत्यंत संवेदनशील राज्याच्या सरकारला या दीड वर्षाच्या हिंसाचारासाठी कधी जबाबदार धरले जाणार आहे, हा खरा प्रश्न आहे.

गेले दीड वर्ष वांशिक हिंसाचारात होरपळून निघालेल्या ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसते. नव्याने उफाळून आलेला रक्तपात अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.

देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रचारसभा रद्द करून, दौरा अर्धवट टाकून दिल्लीला परत जावे लागते, यावरूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे.

गृहमंत्र्यांनी रविवारी दिवसभर मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. आता नव्याने निमलष्करी दलाच्या आणखी पन्नास तुकड्या तिकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाम रायफल्स व अन्य सुरक्षा दले गेले दीड वर्ष मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, तिथली परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे.

हिंसाचाराचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. दंगेखोर जमावाकडून आमदारांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजपसह काही आमदारांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. आदिवासी कुकी समुदायाचा राग मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर अधिक आहे. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या लुआंगसांगबाम जिल्ह्यातील वडिलोपार्जित घरावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. तथापि, पोलिस व सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला.

मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि केंद्र सरकार बिरेन सिंह सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप अगदी प्रारंभीपासून होत आहे. त्याचमुळे सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरची दखल घेऊन तपासाची व्यवस्था लावून दिली होती. त्यानंतर काही काळ मणिपूरच्या बऱ्याच भागात शांतता होती. आता सरकार हिंसाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून कोनराड संगमा यांच्या नेतृत्वातील नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजे एनपीपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारला धोका नसला तरी ईशान्य भारतातील महत्त्वाचा मित्रपक्ष भाजपकडून दुखावला गेला हे महत्त्वाचे.

मणिपूरमधील हिंसाचाराचा हा नवा उद्रेक वेगळा, अधिक चिंताजनक आहे. गेल्या वर्षी, २०२३ च्या मे महिन्यात मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून उफाळलेल्या वांशिक दंगली मुख्यत्वे राजधानी इम्फाळच्या दक्षिण व पूर्व भागातील डोंगराळ भागात, बिष्णुपूर, चुराचांदपूर, आदी जिल्ह्यांमध्ये पेटल्या होत्या. त्या भागात कुकी आदिवासी राहतात. त्याही पूर्वेचा भाग म्यानमार सीमेला लागून आहे. त्यामुळे सीमेपलीकडून या दंगलींना उत्तेजन दिले जात असल्याचा बचाव सरकारकडून करण्यात येत होता.

आताचा हिंसाचार मात्र पश्चिमेकडील जिरीबाम जिल्ह्यात उसळला आहे. आसामच्या सिलचर, कछार भागाला लागून असलेला जिरीबाम जिल्हा गेल्या जूनपर्यंत शांत होता. मणिपूरमधील हिंसाचाराची झळ या भागाला तितकीशी बसली नव्हती. गेल्या ७ नोव्हेंबरला मात्र या भागात मैतेई व कुकी समुदायात नव्याने संघर्षाची ठिणगी पडली आणि त्यात आतापर्यंत किमान १९ लाेक मरण पावले आहेत.

एका लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. तो कुकी जमातीचा होता. प्रत्युत्तरात एका मैतेई व्यक्तीची हत्या झाली. त्यानंतर सुरक्षाबलाच्या गोळीबारात दहा कुकी तरुण मारले गेले. ते अतिरेकी होते, असा दावा करण्यात आला. कुकी संघटनांच्या मते ते ग्रामस्वयंसेवक होते. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यावरून मोठा वाद झाला. यानंतर जे घडले ते अंगावर काटा आणणारे, भयंकर आहे.

मैतेई समुदायातील तीन महिला व लहानगी तीन मुले बेपत्ता झाली. त्यापैकी तीन मुले व दोन महिला असे पाच जणांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह बराक नदीपात्रात आढळले. त्याशिवाय तीन मुलांची आई असलेल्या एका शिक्षिकेवर पाशवी बलात्कार करून तिला जाळण्यात आले. या निरपराध शिक्षिकेला इतके अमानुषपणे जाळण्यात आले की, शवविच्छेदनात बलात्काराच्या खाणाखुणादेखील तपासता आल्या नाहीत.

या पार्श्वभूमीवर, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार गंभीरपणे पावले उचलत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. तथापि, या अत्यंत संवेदनशील राज्याच्या सरकारला या दीड वर्षाच्या हिंसाचारासाठी कधी जबाबदार धरले जाणार आहे, हा खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनीदेखील हाच प्रश्न जाहीरपणे विचारला होता. मणिपूरचा विचार वेगळ्या चाैकटीत करण्याची गरज त्यांना अभिप्रेत होती. म्हणूनच हिंसाचार रोखतानाच आता राजकीय तोडगा काढण्याची, बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालयBJPभाजपा