शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अग्रलेख: शेतकरी पिचतोय...! नैसर्गिक आपत्ती, कोसळणारा शेतमालाचा भाव पाहून कोलमडतोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:07 IST

सर्वच शेतकरी वर्गाच्या अर्थकारणाची काळजी घेणे गरजेचे आहे.

सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती, उत्पादकतेत घट, वाढता उत्पादन खर्च आणि सतत कोसळणाऱ्या शेतमालाच्या भावाने शेतकरी पिंजून निघतो आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी यामुळे अधिकच पिचतो आहे. कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे उत्पादन करणारा शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. भारतीय कापूस महामंडळ आणि नाफेड अनुक्रमे कापूस आणि सोयाबीनची खरेदी करताना किमान आधारभूत किंमत देत होता. मात्र, या शेतकऱ्यांचा सारा शेतमाल ते खरेदी करीत नाहीत. कापूस महामंडळ ४४ लाख क्विंटल कापूस खरेदी करून थकले. नाफेडने ११ लाख टन सोयाबीन खरेदी केली. उद्दिष्ट मात्र १४ लाख १३ हजार टनाचे होते. अद्यापही कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे.

कापूस उत्पादकांची तर आणखी वेगळीच अडचण आहे. अद्याप बराच कापूस शेतातच आहे. वाढता उन्हाळा आणि मजुरांची उपलब्धता नसल्याने कापूस वेचण्याचे काम रेंगाळले आहे. विशेषत: पश्चिम विदर्भात ही मोठी अडचण ठरली आहे. केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला ७,५२१, तर आखूड धाग्यासाठी ७,१२१ रुपये भाव जाहीर केला आहे. केवळ कापूस महामंडळच या भावाने खरेदी करते. चालू वर्षी सर्वाधिक कापूस उत्पादक असलेल्या गुजरातमध्ये सुमारे १५ टक्के उत्पादन घटले असतानाही महाराष्ट्रातील बाजार वधारत नाही, हीच तर गोम आहे. विविध कारणे देत आणि अफवा पसरवित बाजारात अस्थिरता निर्माण करण्याचे खेळ खेळले जातात. कापूस महामंडळाने खरेदी थांबविताच खासगी व्यापाऱ्यांनी हात आखडता घेऊन सहा ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव खाली आणले आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अखेरचा कापूस येईपर्यंत भारतीय कापूस महामंडळाने खरेदी चालू ठेवायला हरकत नाही. महाराष्ट्रात तर १५ टक्के कापूस अद्याप शेतात असताना उन्हाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाने शिडकावा केला आहे. तो विदर्भातदेखील होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सोयाबीन, तूरडाळ, हरभरा आदी पिकांचे भावही कोसळले आहेत. गेली काही वर्षे तेलबियांचे उत्पादन घटल्याने भाव वधारतील असा अंदाज आहे. लाखो टन खाद्यतेल आयात करून आपली गरज पूर्ण करावी लागेल, तरीही तेल बियांपैकी सोयाबीन या सर्वाधिक उत्पादित मालाचे भाव पडत आहेत. केंद्र सरकारने सोयाबीनचा ४,८९२ रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत भाव जाहीर केला होता. सध्या सरासरी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव चालू आहे. तूरडाळीचे भाव नऊ हजार रुपयांवरून सात हजारावर आले आहेत. अलीकडे नव्या बियाणांची पेरणी करीत भाव चांगला मिळतो म्हणून उत्तर महाराष्ट्रात तूर लागवडीखालील क्षेत्र वाढते आहे. भाव मात्र घसरत आहेत. किमान आधारभूत भाव देण्याची जबाबदारी घेण्यास सरकार टाळते आहे. विविध कारणे समोर करून शेतमाल खरेदी टाळण्याचा प्रयत्न असतो. कापूस किंवा सोयाबीन अद्याप शेतकऱ्यांच्या घरात असताना खरेदी बंद करण्याचे कारणच नव्हते. सोयाबीन खरेदी पूर्ण होण्यापूर्वीच  नाफेडने गोदामातील माल विक्रीस काढला आहे. त्याला बाजारात भाव मिळत नाही. शिवाय भाव पडल्याने ज्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे त्यांना फटका बसतो आहे.

यवतमाळसारख्या मोठ्या प्रमाणात कापूस पिकविणाऱ्या भागाला पांढऱ्या सोन्याचा भाग म्हटले जात होते. त्या कापूस उत्पादकास शेतात राहिलेला कापूस वेचणेदेखील परवडत नाही. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना महाराष्ट्राच्या शिवारात आणि बाजारातही विरोधाभासी परिस्थिती आहे. याची चर्चा न करता व्यंगात्मक काव्य करणाऱ्यावर किंवा पाच वर्षापूर्वी निधन झालेल्या अभिनेत्रीच्या प्रकरणाचे राजकारण करण्यात सारे दंग आहेत. विधिमंडळात महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, तरुणी, गरीब वर्ग, कामगार आदींच्या जीवनातील अडीअडचणींचा उहापोह व्हायला हवा, अशी अपेक्षा करणे गैर नाही. जनतेच्या प्रश्नांवर दर्जात्मक चर्चा होत नाही, अशी तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात अध्यक्षांकडे केली आहे. कापूस असो की सोयाबीन, सर्वच शेतकरी वर्गाच्या अर्थकारणाची काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र