बिहारमध्ये ‘महाराष्टÑ प्रयोग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:02 AM2020-10-08T01:02:19+5:302020-10-08T01:02:34+5:30

एडिटर्स व्ह्यू

'Maharashtra Experiment' in Bihar | बिहारमध्ये ‘महाराष्टÑ प्रयोग’

बिहारमध्ये ‘महाराष्टÑ प्रयोग’

Next

-मिलिंद कुलकर्णी

देशातील हिंदी पट्टयातील बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. हिंदी पट्टयातील हे एकमेव राज्य आहे, ज्याठिकाणी भाजपने स्वबळावर सत्ता अद्याप मिळविलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बिहार निवडणुकीवर पूर्णत: लक्ष केंद्रित केलेले आहे. गेल्या महिनाभरात पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हे घडत होते.
महाराष्टÑाचा या निवडणुकीशी अर्थाअर्थी संबंध असण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेने गेल्यावेळी तेथे काही जागा लढवल्या होत्या. बाकी मराठी माणसाला तेथील निवडणुकीविषयी रस असण्याचे कारण नाही. अमेरिकेप्रमाणेच बिहारकडे तो तटस्थपणे पाहत असतो. पण यंदाच्या निवडणुकीला वेगळे परिमाण लाभले आहे. कसे ते समजून घेऊया. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मुंबईतील मृत्यूवरुन गेले सहा महिने चित्रपट सृष्टी आणि राजकीय क्षेत्रात गदारोळ झाला. मुंबई पोलिसांनी दीड महिन्यात फिर्याद न नोंदविल्याने भाजपला आयते कोलीत मिळाले. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात फिर्याद दिली आणि पाटणा पोलीस मुंबईत तपासासाठी आले. सीबीआय चौकशीचे आदेश निघाले. आणि पुढचे सगळे रामायण घडले. सुशांतची आत्महत्या असल्याचे एम्सने जाहीर केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. महाराष्टÑ, मुंबई पोलीस, आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्याचा आरोप आता महाविकास आघाडी करीत आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर या दुर्देवी घटनेला राजकीय रंग देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी चित्र निर्माण झाले. ‘ना भुलेंगे’चे लागलेले फलक, वादग्रस्त विधाने करणाऱ्या पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा जनता दल (यु) मधील प्रवेश आणि माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना बिहारच्या निवडणुकीची भाजपने दिलेली जबाबदारी या बाबी एका साखळीचा भाग आहेत, याकडे राजकीय विश्लेषण अंगुलीनिर्देश करतात.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारची निवडणूक जबाबदारी दिल्याने भाजप वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले. कारण फडणवीस यांनी राष्टÑीय पातळीवर संघटनात्मक जबाबदारी सांभाळल्याचे ऐकीवात नाही. यापूर्वी कोणत्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेले नाही. ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या राष्टÑीय राजकारणातील प्रवेशाची नांदी तर नाही ना, अशा दृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे. त्याचसोबत राजकीय तज्ज्ञांच्या मते बिहार आणि महाराष्टÑाच्या राजकारणात काही साम्यस्थळे आहेत. पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी यशस्वीपणे सरकार चालविले आणि पुन्हा ‘भाजप - शिवसेना युती’ला बहुमत प्राप्त करुन दिले. सत्ता आली नाही, हे खरे असले तरी १०५ आमदार निवडून आणून महाराष्टÑात क्रमांक एकचा पक्ष म्हणून अस्तित्व कायम राखणे ही महत्त्वाची कामगिरी आहे. हा अनुभव फडणवीस यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजप घेऊ इच्छिते. भाजप - जनता दलाच्या युतीतील जागावाटपात भाजपला प्रथमच १२१ जागा मिळवून देऊन फडणवीस यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. जनता दल १२२ जागा लढवणार आहे. ‘मोठ्या आणि लहान भावा’तील हिस्सेवाटणी आता समान पातळीवर आली आहे. याठिकाणी शिवसेना - भाजपची आठवण आल्याशिवाय राहत नाही. २०१९ च्या महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा तर लढवल्या, पण ‘तुझे तेही माझे’ हा हेका ठेवत शिवसेनेच्या उमेदवारांविरुध्द बंडखोर उभे केले. त्यांना रसद पुरवली. मोदींचे गमछे घालून हे उमेदवार प्रचार करीत होते. जळगाव जिल्ह्यातील उदाहरण पुरेसे बोलके आहे. एकूण ११ जागांपैकी भाजपने ७ तर शिवसेनेने ४ जागा लढवल्या. भाजपने चोपडा (जि.प.चे तत्कालीन सभापती प्रभाकर सोनवणे), पाचोरा (अमोल शिंदे), जळगाव ग्रामीण (नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे), पारोळा (गोविंद शिरोळे) या चार मतदारसंघात बंडखोरांना रसद पुरवली. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या जळगावच्या जाहीर सभेपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यासपीठावर जाण्यास नकार देऊन संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. सेनेचे चारही उमेदवार निवडून आले हा भाग वेगळा. पण तशी खेळी बिहारमध्ये खेळली जात आहे. लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी ‘मोदी तेरेसे बैर नही, नितीश तेरी खैर नही’ अशी भूमिका घेतली आहे. केवळ जदयुविरुध्द उमेदवार उभे करण्याची पासवान यांची घोषणा खूप काही सांगून जाते. त्याच पार्श्वभूमीवर गेल्यावेळेचे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राजेद्रसिंग, चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रामेश्वर चौरसीया यांनी दोन दिवसांपूर्वी लोजपामध्ये केलेला प्रवेश रणनितीचा भाग आहे. माझे ते माझेच, पण तुझे तेही माझे याप्रवृत्तीचा फटका जदयुला बसतो का? शिवसेनेचा अनुभव सुशासनबाबू नितीशकुमार यांना माहित असेलच, त्यातून ते काय धडा घेतात हे नजिकच्या काळात कळेलच.
-मिलिंद कुलकर्णी

Web Title: 'Maharashtra Experiment' in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.