शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

By विजय दर्डा | Updated: June 3, 2024 08:06 IST

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीत हार-जीत झाल्यानंतर शत्रुत्व विसरून देशाच्या विकासासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

आता फक्त एका दिवसाची प्रतीक्षा उरली आहे. भारतीय मतदारांनी कोणाला सत्तेवर येण्याचा आदेश दिला, हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असेल; परंतु एक गोष्ट अगदी नक्की आहे, निकाल लागण्याच्या आधीच या देशातील लोकशाही पुन्हा एकदा विजयी झाली आहे. आपल्या लोकशाहीचे  वैशिष्ट्य हेच की, तिला कोणीही ओलीस ठेवू शकत नाही. कारण या देशातला मतदार सतर्क, शक्तीशाली आहे.लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सुमारे अडीच महिने नको त्या गोष्टी घडल्या, नेत्यांच्या तोंडून कडवट वक्तव्ये बाहेर पडली, शेवटी निवडणूक आयोगाला हस्तक्षेपही करावा लागला. उशिरा का होईना, अनेक पक्षाच्या प्रमुखांना आयोगाने दटावलेही. अशा गोष्टी बोलल्या गेल्या की, त्यांचा तपशील इथे लिहिणेही उचित नाही. 

महाराष्ट्राला ‘शिमगा’ काही नवा नव्हे. त्या दिवशी लोक समजून उमजून एकमेकांना शिव्या देतात,  राग मोकळा करतात. पण, तो दिवस सरला, की पुन्हा एकमेकांना प्रेमाने रंगही लावतात! या  निवडणुकीचे रंग शिमग्यासारखे दिसत होते. पण, तो शिमगा सरल्यावर  ही मंडळी एकमेकांना जवळ करतील का, कोण जाणे! ज्यांनी विष ओकले, त्यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा कशी करावी? मी राजकीय कुटुंबामध्ये जन्माला आलो. अठरा वर्षे संसदीय लोकशाहीचे प्रतिनिधीत्व केले. १९६२ नंतर झालेल्या सगळ्या निवडणुका जवळून पाहिल्या. यावर्षीच्या निवडणुकीत भाषा अगदीच रसातळाला गेलेली पाहिली.  दोष कोणाला द्यावा? - सत्ताधाऱ्यांना की विरोधी पक्षाच्या नेत्यांना? - खरा न्याय शेवटी मतदारच करतो, यावर माझा विश्वास आहे. 

निवडणुकीच्या काळात प्रचारामुळे आधीच भडकलेले वातावरण सूर्याच्या उष्णतेने आणखीन तापवले. नेते मंडळींची डोकी गरम झालेली दिसत होती. भयंकर शब्द वापरले जात होते. नेत्यांनी कष्टही पुष्कळ घेतले. सभा आणि रोड शोच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाच्या या टप्प्यावर दाखविलेला उत्साह अन्य कोणात दिसला नाही. दोनशेपेक्षा जास्त सभा त्यांनी केल्या. रोडशोही केले. शिवाय ८० पेक्षा जास्त मुलाखती दिल्या. ही कमालीची उर्जा म्हटली पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी यांनीही सभा आणि रोड शोच्या बाबतीत शतक झळकवले. यावेळी नेते स्वतःबद्दल कमी आणि आपल्या विरोधकांबद्दल जास्त बोलत होते. समोरचा अतिशय बेकार आहे, हे सिद्ध करण्याची अहमहमिका लागली होती.

या सगळ्यात मला जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या निवडणुकीतील काही गोष्टी आठवल्या. चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य प्रकारे पराभूत होणे केव्हाही चांगले, असे ते म्हणत. १९६२ साली काँग्रेसचे उमेदवार रिखबचंद शर्मा यांच्या प्रचारासाठी पंडितजी नागपूरला आले होते. त्यांनी सभेत शर्मा यांच्याविषयी फार काही सांगितले नाही. पण, अपक्ष उमेदवार लोकनायक बापूजी अणे हा भला माणूस असल्याचे उद्गार काढले. त्या निवडणुकीत लोकनायक अणे विजयी झाले. अर्थात या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत.

मत द्यायला जे मतदार घराबाहेर पडले नाहीत, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप जरूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात फेऱ्या पार पडल्या. पहिल्या सहा फेऱ्यांची आकडेवारी पाहता २९ कोटी लोकांनी मतदान केले नाही. हा आकडा अमेरिकेत नोंदल्या गेलेल्या सुमारे २४ कोटी मतदारांपेक्षा पाच कोटींनी अधिक आहे. हा संदर्भ अशासाठी दिला, की आपली लोकशाही किती विशाल आहे हे आपणास समजावे. 

अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्याच्या दरम्यान लोकांनी मोठ्या आश्चर्याने मला विचारले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण रीतीने तुमच्याकडे निवडणुका कशा घेतल्या जातात? भारतीय लोकशाहीची भव्यता संपूर्ण जगासाठी आश्चर्यजनक आहे. ही भव्यता सांभाळावयाची असेल तर मतदान का आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जो मतदान करणार नाही, त्याला काही अधिकारांपासून वंचित केले तरी काही हरकत नाही.

मतदानाकडे मी पूजा, प्रार्थना आणि इबादत म्हणून पाहतो. लोकशाही हे आपले भाग्य आहे. जगातील ५०पेक्षा जास्त देशांमध्ये लोकांकडे आजही मताचा अधिकार नाही. तेथील जीवन गुलामांसारखे आहे. म्हणून तर स्वच्छ पद्धतीने, शांततापूर्ण रीतीने निवडणुका होणे, हीच भारतीय लोकशाहीची विजय पताका मानली गेली पाहिजे. केंद्रात सत्ता कोणाची राहणार हे उद्या कळेल. निवडून येणाऱ्यांचे आधीच अभिनंदन! परंतु, जे सत्तेपासून दूर राहतील, त्यांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तेही आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा घेऊन संसदेत येणार आहेत. देशाबद्दल जेवढी जबाबदारी सरकारची असेल तेवढेच विरोधी पक्षांचीही असेल.

तूर्तास ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीचा महोत्सव दिवाळीसारखा साजरा करण्याची आहे. आपण जगातील तिसरी महाशक्ती व्हावे आणि त्या संपत्तीतून सामान्य माणसाचे घर आबादीआबाद व्हावे. ८० कोटी लोकांना धान्य फुकट देण्याची गरजच राहू नये. यासाठी देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जावे लागेल. सशक्त आणि समर्थ भारताची कल्पना आपण सर्वांनी एकत्र येऊन साकार केली पाहिजे.

टॅग्स :Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४