शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

By विजय दर्डा | Updated: June 3, 2024 08:06 IST

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीत हार-जीत झाल्यानंतर शत्रुत्व विसरून देशाच्या विकासासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

आता फक्त एका दिवसाची प्रतीक्षा उरली आहे. भारतीय मतदारांनी कोणाला सत्तेवर येण्याचा आदेश दिला, हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असेल; परंतु एक गोष्ट अगदी नक्की आहे, निकाल लागण्याच्या आधीच या देशातील लोकशाही पुन्हा एकदा विजयी झाली आहे. आपल्या लोकशाहीचे  वैशिष्ट्य हेच की, तिला कोणीही ओलीस ठेवू शकत नाही. कारण या देशातला मतदार सतर्क, शक्तीशाली आहे.लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सुमारे अडीच महिने नको त्या गोष्टी घडल्या, नेत्यांच्या तोंडून कडवट वक्तव्ये बाहेर पडली, शेवटी निवडणूक आयोगाला हस्तक्षेपही करावा लागला. उशिरा का होईना, अनेक पक्षाच्या प्रमुखांना आयोगाने दटावलेही. अशा गोष्टी बोलल्या गेल्या की, त्यांचा तपशील इथे लिहिणेही उचित नाही. 

महाराष्ट्राला ‘शिमगा’ काही नवा नव्हे. त्या दिवशी लोक समजून उमजून एकमेकांना शिव्या देतात,  राग मोकळा करतात. पण, तो दिवस सरला, की पुन्हा एकमेकांना प्रेमाने रंगही लावतात! या  निवडणुकीचे रंग शिमग्यासारखे दिसत होते. पण, तो शिमगा सरल्यावर  ही मंडळी एकमेकांना जवळ करतील का, कोण जाणे! ज्यांनी विष ओकले, त्यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा कशी करावी? मी राजकीय कुटुंबामध्ये जन्माला आलो. अठरा वर्षे संसदीय लोकशाहीचे प्रतिनिधीत्व केले. १९६२ नंतर झालेल्या सगळ्या निवडणुका जवळून पाहिल्या. यावर्षीच्या निवडणुकीत भाषा अगदीच रसातळाला गेलेली पाहिली.  दोष कोणाला द्यावा? - सत्ताधाऱ्यांना की विरोधी पक्षाच्या नेत्यांना? - खरा न्याय शेवटी मतदारच करतो, यावर माझा विश्वास आहे. 

निवडणुकीच्या काळात प्रचारामुळे आधीच भडकलेले वातावरण सूर्याच्या उष्णतेने आणखीन तापवले. नेते मंडळींची डोकी गरम झालेली दिसत होती. भयंकर शब्द वापरले जात होते. नेत्यांनी कष्टही पुष्कळ घेतले. सभा आणि रोड शोच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाच्या या टप्प्यावर दाखविलेला उत्साह अन्य कोणात दिसला नाही. दोनशेपेक्षा जास्त सभा त्यांनी केल्या. रोडशोही केले. शिवाय ८० पेक्षा जास्त मुलाखती दिल्या. ही कमालीची उर्जा म्हटली पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी यांनीही सभा आणि रोड शोच्या बाबतीत शतक झळकवले. यावेळी नेते स्वतःबद्दल कमी आणि आपल्या विरोधकांबद्दल जास्त बोलत होते. समोरचा अतिशय बेकार आहे, हे सिद्ध करण्याची अहमहमिका लागली होती.

या सगळ्यात मला जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या निवडणुकीतील काही गोष्टी आठवल्या. चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य प्रकारे पराभूत होणे केव्हाही चांगले, असे ते म्हणत. १९६२ साली काँग्रेसचे उमेदवार रिखबचंद शर्मा यांच्या प्रचारासाठी पंडितजी नागपूरला आले होते. त्यांनी सभेत शर्मा यांच्याविषयी फार काही सांगितले नाही. पण, अपक्ष उमेदवार लोकनायक बापूजी अणे हा भला माणूस असल्याचे उद्गार काढले. त्या निवडणुकीत लोकनायक अणे विजयी झाले. अर्थात या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत.

मत द्यायला जे मतदार घराबाहेर पडले नाहीत, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप जरूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात फेऱ्या पार पडल्या. पहिल्या सहा फेऱ्यांची आकडेवारी पाहता २९ कोटी लोकांनी मतदान केले नाही. हा आकडा अमेरिकेत नोंदल्या गेलेल्या सुमारे २४ कोटी मतदारांपेक्षा पाच कोटींनी अधिक आहे. हा संदर्भ अशासाठी दिला, की आपली लोकशाही किती विशाल आहे हे आपणास समजावे. 

अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्याच्या दरम्यान लोकांनी मोठ्या आश्चर्याने मला विचारले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण रीतीने तुमच्याकडे निवडणुका कशा घेतल्या जातात? भारतीय लोकशाहीची भव्यता संपूर्ण जगासाठी आश्चर्यजनक आहे. ही भव्यता सांभाळावयाची असेल तर मतदान का आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जो मतदान करणार नाही, त्याला काही अधिकारांपासून वंचित केले तरी काही हरकत नाही.

मतदानाकडे मी पूजा, प्रार्थना आणि इबादत म्हणून पाहतो. लोकशाही हे आपले भाग्य आहे. जगातील ५०पेक्षा जास्त देशांमध्ये लोकांकडे आजही मताचा अधिकार नाही. तेथील जीवन गुलामांसारखे आहे. म्हणून तर स्वच्छ पद्धतीने, शांततापूर्ण रीतीने निवडणुका होणे, हीच भारतीय लोकशाहीची विजय पताका मानली गेली पाहिजे. केंद्रात सत्ता कोणाची राहणार हे उद्या कळेल. निवडून येणाऱ्यांचे आधीच अभिनंदन! परंतु, जे सत्तेपासून दूर राहतील, त्यांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तेही आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा घेऊन संसदेत येणार आहेत. देशाबद्दल जेवढी जबाबदारी सरकारची असेल तेवढेच विरोधी पक्षांचीही असेल.

तूर्तास ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीचा महोत्सव दिवाळीसारखा साजरा करण्याची आहे. आपण जगातील तिसरी महाशक्ती व्हावे आणि त्या संपत्तीतून सामान्य माणसाचे घर आबादीआबाद व्हावे. ८० कोटी लोकांना धान्य फुकट देण्याची गरजच राहू नये. यासाठी देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जावे लागेल. सशक्त आणि समर्थ भारताची कल्पना आपण सर्वांनी एकत्र येऊन साकार केली पाहिजे.

टॅग्स :Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४