शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 13, 2025 11:57 IST

भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तिणीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जाताहेत का ?

मुंबईसारख्या महानगरातील शांतताप्रिय नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणे आणि सगळी कामं बाजूला सारून दाणे टाकण्यास सरकारला बाध्य करणे, हे वाटते तितके सोपे काम नाही; पण शांततेचं प्रतीक आणि प्रेमाचा संदेशवाहक असलेल्या कपोतांनी (कबुतरांनी) ही किमया करून दाखवली आहे! आपल्या राजकीय निष्ठा आणि विष्ठांनी महानगरांना आणि पर्यायाने नागरिकांना वेठीला धरण्याचा मक्ता आजवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या नावे होता. यात आता कबुतरांची भर पडली! हा तर माणसांच्या संगतीचा, पंक्तीचा आणि सहवासाचा परिणाम असू शकतो. मुंबईत राहून कबुतरांना एवढे शहाणपण तर आलेच असेल. आपल्या हक्कांसाठी उगीच एखाद्याच्या दारात तिष्ठत बसण्यापेक्षा फडफड करून त्यांची झोपमोड केल्याखेरीज अथवा विष्ठा करून जगणे मुश्कील केल्याशिवाय कोणालाच जाग येत नाही, हा ‘कबुतरी’ धडा मराठी माणसांनी शिकण्यासारखा आहे. राज्यातील जनतेचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून सरकार कबुतरांसाठी धडपड करत आहे. यावरून या सजीव पक्ष्याची महत्ता राजकीय पक्षांहून अधिक असल्याचे अधोरेखित होते.

पूर्वी मुंबईत सगळीकडे झाडी होती, त्यावर कावळ्यांचं राज्य होतं. दादर, परळ, लालबाग, विलेपार्ले इथे मराठी माणसांचा वावर होता. गिरणी कामगारांच्या चाळींमध्ये पितृपक्षात कावळ्यांना मिष्ठान्न मिळायचं आणि तेही पिंडीवर गपगुमान बसून आपली भूमिका बजावायचे; पण गिरण्या बंद झाल्या. झाडं तोडली गेली. टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या. मराठी माणूस उपनगरांतून बाहेर फेकला गेला. कावळे परांगदा झाले. आणि या निर्वासनाच्या पोकळीत कबुतरांनी घर केलं! आज दादरमधून मराठी माणूस हद्दपार झाला असला, तरी कबुतरखाना मात्र शाबूत आहे. दाणे टाकणाऱ्या श्रीमंतांच्या पुण्यकर्मांवर तो टिकून आहे. तुम्ही कितीही उपद्रवी असाल. जर तुमच्यामागे धनशक्ती असेल, तर तुमचं पंखही कोणी वाकडं करू शकत नाही, हा धडा कबुतरांनी शिकवला आहे.

प्रश्न केवळ मुंबईतील कबुतरांचा अथवा कोल्हापुरातील हत्तींचा नाही, तर त्या खेळात गुंतलेल्या भावना, श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा वापर करून सामान्य माणसाच्या विवेकावर अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जातात. कबुतरांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले तरी चालेल, आमच्या पुण्यकर्माच्या आड कोणी येता कामा नये, असा आग्रह कसा काय धरला जातो? कपोतांना दाणापाणी हे पुण्यकर्म कुठल्या धर्मग्रंथात सांगितले आहे?

जॉर्ज अर्वेल यांच्या ‘ॲनिमल फार्म’ या राजकीय रूपककथेत सुरुवातीला सत्तेवर आलेले प्राणी ‘आपण सर्व समान आहेत’ अशी घोषणा करतात; पण सत्ता स्थिरावत जाते, तसतसे नियम बदलतात. आणि शेवटी संविधानात बदल होतो की,“काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत!” कबुतरांच्या बाबतीत हेच तर होतंय. या जंगलातून बाहेर पडायचं असेल, तर बुद्धीवादी वर्गाने विवेक, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. नाहीतर उरतात फक्त दाणे, विष्ठा आणि फडफड...

टॅग्स :pigeonsकबुतरenvironmentपर्यावरण