शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गुळाला डसला साखरेच्या भेसळीचा मुंगळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 10:16 IST

कोरोना काळात गुळाचा भाव वधारताच भेसळीच्या तक्रारी सुरू झाल्या. गूळ उत्पादक कारवाईतून सुटतो अन् व्यापारी अडकतो हा मोठा प्रश्न!

- श्रीनिवास नागे, वृत्तसंपादकलोकमत, सांगलीदीड वर्षापासून कोरोनानं धास्ती वाढवली अन् घराघरांत आयुर्वेदिक काढे उकळू लागले. त्या काढ्यांमध्ये मसाले, आयुर्वेदिक वनस्पतींसोबत गुळाचा वापरही वाढला. चहाच्या ठेल्यांवरही गुळाच्या चहाचे बोर्ड झळकू लागले. गुळाचा भाव वधारला. बाजारपेठेतली उलाढाल वाढली, पण या ढेपेला भेसळीचा मुंगळा डसू लागला! 

 आरोग्यदायी गुळातही सर्रास भेसळ होऊ लागल्यानं कारवाईचा दणका बसू लागला. दराच्या हव्यासानं भेसळीचा आधार घेऊन गूळ बनवणारा उत्पादक कारवाईतून सुटला अन् त्यात व्यापारी अडकू लागला. खरं तर व्यापाऱ्याकडं येणारा गूळ असतो घन स्वरूपातला. त्याला त्यात भेसळ करताच येत नाही, पण गुन्हे दाखल होण्याचा दट्ट्या लागला. व्यापारी वैतागले. जाचक कायद्याला विरोध करण्यासाठी सांगलीत नुकतीच गूळ व्यापारी परिषद झाली. व्यापाऱ्यांनी शरद पवारांनाही साकडं घातलं. त्यानंतर समिती नेमण्यात आली. समितीनं सकारात्मक अहवाल दिलाय. त्या अहवालानुसार व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, असा दिलासादायक निर्णय होतोय. 

पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामुळं गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ सांगली-कोल्हापुरात उभी राहिली. रंग, दर्जा, टिकाऊपणासाठी इथला गूळ नावाजला जाऊ लागला. गुळाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होऊ लागले. इथला गूळ देशभर जातो. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, गोडधोड बनविण्यासाठी भारतात गूळच वापरला जात होता. आजही कित्येक स्वयंपाकघरात गुळाच्या खड्याशिवाय रांधलं जात नाही. कोल्हापूरची गूळ बाजारपेठ दिवाळीनंतर चार-पाच महिनेच चालते. तिथं येणारा बहुतांशी गूळ त्याच जिल्ह्यात तयार होतो. सांगलीची बाजारपेठ मात्र वर्षभर चालते, पण तिथं येणारा सगळा गूळ शेजारच्या कर्नाटकातला. इथला केवळ एक टक्काच. सांगलीच्या बाजारपेठेत वर्षभरात तीस किलोंच्या २५ लाख रव्यांची (ढेप) म्हणजे साडेआठ लाख क्विंटलची आवक होते, तर कोल्हापुरातली आवक घटून २० ते २२ लाख ढेपांवर आलीय. उसाचा रस उष्णतेनं आटवून तयार केलेला लालसर-पिवळ्या रंगाचा घट्ट पदार्थ म्हणजे गूळ. जिथं तो तयार होतो, ते ‘गुऱ्हाळ’. उसाचा रस गाळलेली काहील  चुलाणावर ठेवून उकळतात. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळं गुळाच्या ढेपेला साच्याचा आकार येतो. हे काम तसं कौशल्याचं. गूळ बनवणारा ‘गुळव्या’ अन् जाळ घालणारा ‘जळव्या’ हे गुऱ्हाळावरचे महत्त्वाचे कामगार. कोल्हापूर जिल्हा, साताऱ्याचा कऱ्हाड परिसर, लातूर जिल्हा अन् पुण्यातल्या दौंड-बारामती परिसरासह दक्षिण-उत्तर कर्नाटकात गुळाचं उत्पादन होतं. बाजारात मिळणाऱ्या पिवळ्या गुळात काॅस्टिक सोडा, ऑक्झॅलिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, ह्याद्रोस पावडर, बेन्झीन ही रसायनं घातली जातात. या पिवळ्याधम्मक गुळापेक्षा आकर्षक न दिसणाऱ्या लालसर-चॉकलेटी सेंद्रिय गुळानं ग्राहकांना भुरळ घातलीय. सेंद्रिय गुळातही दोन प्रकार दिसतात. रासायनिक घटक वापरून केलेल्या शेतीतून उत्पादित झालेल्या उसाचा रसायने न वापरता केलेला गूळही सेंद्रिय म्हणून विकला जातो, तर नैसर्गिक ऊसशेतीतून आलेल्या उसापासून नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला गूळ अस्सल सेंद्रिय मानला जातो. तो बनवताना केवळ रानभेंडी अन् चुन्याचा वापर केला जातो. 

गुळात सर्वाधिक भेसळ होते, ती साखरेची! साखर स्वस्त, तर उत्पादन खर्च जादा असल्यानं गूळ महाग! त्यामुळं त्यात बेमालूमपणे साखर मिसळली जाते. दोन्हीत सुक्रोज आणि ग्लुकोजचं प्रमाण सारखंच असल्यानं कोणत्याही प्रयोगशाळेत ही भेसळ ओळखता येत नाही. शिवाय मूळचा रंग घालवून तो आकर्षक दिसण्यासाठी रंग अन् गंधकाचा वापर केला जातो. मुबलक उसामुळं कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर्वी गावागावांत गुऱ्हाळं दिसत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र उसाला जादा दर मिळत असल्यानं उत्पादकांचा साखर कारखान्यांकडं ओढा वाढलाय. त्यातच गुळाचा उत्पादन खर्च वाढल्यानं पारंपरिक पद्धतीनं चालणारी गुऱ्हाळं बंद पडू लागली. पंचवीस वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात बाराशे गुऱ्हाळं होती, ती दोन-सव्वादोनशेवर आलीत. सांगली जिल्ह्यात तर उणीपुरी ११ गुऱ्हाळं शिल्लक राहिलीत. त्यामुळं उत्पादन अन् बाजारपेठेतली आवकही घटतेय. दराची स्पर्धा वाढली, त्यामुळं कोल्हापूरचे गूळ उत्पादक सांगली-कऱ्हाडकडं ढेपा पाठवू लागलेत. दुसरीकडं महाराष्ट्रातले जाचक कायदे, कर यामुळं सांगलीच्या पेठेला कर्नाटकातल्या महालिंगपूरच्या पेठेचं आव्हान उभं राहिलंय.