शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पैशावर स्वदेशी सेवा...

By admin | Updated: May 4, 2015 00:11 IST

विदेशातून पैसा घेऊन स्वदेशात समाजसेवेची दुकाने उघडून बसलेल्या ३३ हजार ९७९ समाजसेवकांना व समाजसेवी संस्थांना २००५ ते २०१० या पाच वर्षांत त्यांच्या

विदेशातून पैसा घेऊन स्वदेशात समाजसेवेची दुकाने उघडून बसलेल्या ३३ हजार ९७९ समाजसेवकांना व समाजसेवी संस्थांना २००५ ते २०१० या पाच वर्षांत त्यांच्या अज्ञात देणगीदारांकडून ५५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. नंतरच्या काळात त्यांना मिळालेल्या या देणग्यांत आणखी वाढ झाली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आरोग्यविषयक, महिला व बालकल्याणसंबंधी, शेती व पर्यावरण विषयक क्षेत्रात आपण काम करतो असे सांगणाऱ्या या संघटनांना मदत देणाऱ्या देशात अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, बेल्जियम, नेदरलॅण्ड, कॅनडा आणि फ्रान्स यासोबतच पाकिस्तानचाही समावेश असून, ते गंभीर वाटावे असे वास्तव आहे. जगभरच्या १०० गरीब देशांना मिळून या देशांनी एवढे अर्थसहाय्य या काळात केले त्याहून अधिक ते आमच्या येथील समाजसेवकांना केले असल्याची बाब नुसती अंतर्मुख करणारीच नव्हे तर चिंतातूर करणारी ठरावी. भारत सरकारला चार अब्ज अमेरिकन डॉलर्सचे अर्थसहाय्य ज्या काळात मिळाले त्या काळात या समाजसेवकांनी त्या देशाकडून तीन अब्ज डॉलर्स मिळविले ही बाब त्यांचे विदेशातील वजन सरकारएवढेच असल्याचे लक्षात आणून देणारी आहे. त्याचवेळी हे देणगीदार देश व त्यातील अज्ञात दाते या सेवेकऱ्यांकडून काय साधू इच्छितात हेही लक्षात घ्यावे असे वास्तव आहे. अशा संस्था-संघटनांची सर्वाधिक संख्या तामिळनाडूत, तर दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रात आहे हा मराठी माणसांच्याही चिंतेचा विषय आहे. पूर्वीच्या सरकारने जाहीर केलेली ही आकडेवारी हिशेबातली आहे. त्याखेरीज या देशी समाजसेवकांच्या खिशात जमा होणारा बेहिशेबी पैसा केवढा असू शकेल याची आपण केवळ कल्पनाच करायची आहे. आताच्या केंद्र सरकारने या संस्थांपैकी १०,३४३ संस्थांकडे त्यांच्या हिशेबाची व प्राप्तिकराची मागणी केली आहे. त्यापैकी नऊ हजारांहून अधिक संस्थांनी हे हिशेब द्यायला नकार दिल्यामुळे केंद्र सरकारने त्यांची मान्यताच आता रद्द केली आहे. विदेशातून पैसा आणून स्वदेशात सेवेचा धंदा मांडून बसलेले उपदेशक, प्रवचनकार, भागवत कथाकार, बुवा, बाबा, बापू, श्रीश्री, मुल्ला आणि मौलवी व ख्रिस्ती धर्मोपदेशक संस्काराचा घनघोर पाऊस पाडताना आणि हजारो कोटींच्या खासगी इस्टेटी उभारताना देशाने पाहिले आहे. त्यांच्या राहणीवर, बडदास्तीवर व अनुयायांना माहीत नसलेल्या ऐशांवर होणाऱ्या खर्चाविषयी जाब विचारणाऱ्याला पाखंडी ठरविण्याएवढा भक्तिभावही येथे आहे. त्यांना सरकार हात लावीत नाही, अनुयायांचा डर नाही आणि इतरांच्या चुकीवर तुटून पडणाऱ्या माध्यमांना त्यांच्या लेखण्या व कॅमेरे त्यांच्याकडे वळवावे असे वाटत नाही. यात बाबा लोकांएवढेच भगतांचे व चेल्यांचे तांडे त्या ५० हजार कोटीवाल्या समाजसेवकांभोवती आता उभे झाले आहेत. त्यांची संपत्ती केवढी, वर्षाकाठची मिळकत किती याची साधी चौकशीही न करता त्यांच्या घरात व संस्थेत पैसा ओतणाऱ्या त्यांच्या भगतांची मानसिकताही बुवा-बाबांच्या चेल्याहून वेगळी नाही. त्यांचे वाजिंत्र वाजविणे आमची माध्यमेही धन्यता मानणारी व त्यांच्या सेवाकार्याला सहाय्य केल्याचे पुण्य पदरात पाडून घेणारी आहेत. या प्रकारात कोण कोणाची फसवणूक करतो? ते बुवा-बाबा आणि समाजसेवक आपल्या भगतांना बनवितात की त्यांच्या झोळीत आपल्या घामाचा पैसा टाकायला धावत निघणारी माणसेच स्वत:ची फसवणूक करीत असतात? एरव्ही ज्ञान-विज्ञानावर चौकस बोलणारी माणसे अशा भजनात नाचताना किंवा तशा सेवांवर फारशी चौकशी न करता पैसे उधळताना दिसतात तेव्हा तो दिङ्मूढ करणारा प्रकार होतो. अशा संस्थांना व तशा समाजसेवकांना चाप बसविण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले असेल तर तो त्याच्या अभिनंदनाचा विषय ठरतो. विदेशी पैशावर आपला सेवाभाव मिरविणारी ही पोकळ माणसे देशात धरणे नकोत, कारखाने नकोत, अणुप्रकल्प नकोत आणि कोणतीही नवी योजना नको अशी विकासाला नकार देणारी व रोजगार थांबविणारी आंदोलने करतानाच अधिक दिसतात. मानवाधिकारवाल्यांची नक्षलसेवा व पर्यावरणवाल्यांची उद्योग आणि धरणविरोधी चळवळ यांचा आधारही विदेशातून येणारा हा पैसा असतो. माध्यमे त्यांना जेवढी प्रसिद्धी देतात तेवढी त्यांच्या मिळकतीच्या साधनांवर ती प्रकाश टाकत नाहीत. सामान्य माणसांना मग ही देशबुडवी माणसेच खरीखुरी समाजसेवक वाटू लागतात. धरणे नको म्हणणारी माणसे त्यावाचून शेतीचा विकास कसा होणार ते सांगत नाहीत आणि पर्यावरणासाठी उद्योग नको म्हणणारी माणसे उद्योगावाचून रोजगार कसा वाढेल हेही सांगत नाहीत. विकासाला विरोध करणारी ही माणसे नक्षलवाद्यांना साथ देतात आणि काश्मिरात गदारोळ करणाऱ्या अतिरेक्यांनाही मदत करताना दिसतात. त्यांना देशात आणि विदेशात पुरस्कार मिळतात, त्यांच्यावर लेख लिहिले जातात आणि त्यांच्या नावामागे समाजसेवक, मानवाधिकार रक्षक व पर्यावरण संरक्षक अशी अतिशय खोटी बिरुदे लावली जातात. या माणसांचा, त्यांच्या संस्थांचा व त्यांना मिळालेल्या देणग्यांचा छडा लावण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते. ते सरकारने हाती घेतले आहे. विदेशी दानावर पुष्ट होणाऱ्या या सेवेकऱ्यांबाबत समाजानेही आता सावध होणे गरजेचे आहे.