शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नागरिक ‘वाचू’ लागले, तर समाज ‘टिकेल’, देश ‘वाचेल’...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 10:28 IST

पाश्चात्त्य देशांची उन्नती, तेथे दिसणारी सामाजिक जागरूकता यामागे तेथील जनतेची वाचनप्रियता हेही एक महत्त्वाचे कारण समजले जाते.

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, शैक्षणिक-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक -

मानवी जीवनात वाचनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वाचनाने व्यक्ती विचारी बनते, बहुश्रुत होते. माहिती मिळविण्यासाठी वाचन हे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे नीर-क्षीर विवेकाने विचार करण्याची क्षमता प्राप्त होते, आयुष्यात आलेल्या संकटांना धीराने सामोरे जायला बळ मिळते. वाचन हा एक विरंगुळा देखील आहे. या विरंगुळ्याने मनाची उदासी दूर होते. मन प्रफुल्लित होते.  उत्तम साहित्य वाचल्याने संकुचित वृत्ती लोप पावते, विचारांची कक्षा रुंदावते. ज्या समाजात वाचणारे लोक अधिक असतात तो समाज सुसंस्कृत-विचारी-विवेकशील-समजूतदार-संवेदनशील-समतावादी असतो. पाश्चात्त्य देशांची झालेली उन्नती, तेथे दिसणारी जागरूकता यामागे अनेक कारणांपैकी तेथील जनतेची वाचनप्रियता हेदेखील एक महत्त्वाचे कारण समजले जाते.

वाचनाचे एवढे महत्त्व असूनही दुर्दैवाने आपल्या देशातील लोकांमध्ये म्हणावी तशी वाचनाची आवड आणि प्रवृत्ती निर्माण झालेली नाही. वाचन ही आपली मूलभूत गरज आहे, असे लोकांना वाटत नाही. याची अनेक कारणे सांगता येतील. निरक्षरतेचे प्रमाण, आर्थिक विपन्नावस्था, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक वातावरण, शिक्षण संस्थांची उदासीनता, ग्रंथ व्यावसायिकांची नफेखोरी प्रवृत्ती, सार्वजनिक वाचनालयांची हेळसांड, वाचकाला समाजात न मिळणारे प्रोत्साहन, वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीचे अपुरे प्रयत्न, वाचनसंस्कृती विकसित होण्यासाठी एकसंध चळवळीची वानवा, राजकीय पक्ष आणि सरकार यांचे दुर्लक्ष, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचे गारुड, ग्रामीण भागात असलेला सुविधांचा अभाव इत्यादी.

वाचनसंस्कृतीच्या प्रसारात सार्वजनिक वाचनालये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. ज्या देशांमध्ये सार्वजनिक वाचनालयांचे जाळे भक्कम आहे तिथे वाचनसंस्कृती विकसित झालेली दिसते. महाराष्ट्र शासनाने जवळपास चार दशकांपूर्वी ग्रंथालय कायदा पारित केला असला तरी ग्रंथालय चळवळीला म्हणावे तसे पाठबळ दिले नाही. आपल्या राज्यातील सार्वजनिक वाचनालयांची संख्या शहरी भागात जास्त आहे. राज्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणी पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ग्रंथालय कायद्यात ‘साखळी ग्रंथालये’ निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे. पण, दुर्दैवाने याची पूर्तता अजूनही झालेली नाही. म्हणून राज्यातील ग्रामीण-आदिवासी भागातील जनतेला वाचनापासून वंचित राहावे लागते.

जगभरातील देशांसाठी ‘युनेस्को’ने सार्वजनिक वाचनालयांचे उद्देश, भूमिका-जबाबदाऱ्या-कार्ये आणि स्वरूप यांची मांडणी करणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात ‘देशातील सार्वजनिक वाचनालयांनी सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता, नि:पक्षपातीपणे, विनामूल्य वाचनालय सेवा उपलब्ध करून द्यावी. जनतेमध्ये वाचनाची अभिवृत्ती विकसित करून त्यांना विचारशील करण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांनी समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या मदतीने निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. युनेस्कोच्या या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी आपल्या सरकारने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. जनतेला ज्ञानोत्सुक  बनविण्यासाठी ग्रंथप्रेम रुजवले पाहिजे. वाचनाची आवड सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. या प्रक्रियेत सार्वजनिक वाचनालये लक्षणीय योगदान देऊ शकतात.

युनेस्कोच्या पुढाकाराने १९७२ मध्ये एक जागतिक परिषद भरली. यात प्रकाशक, ग्रंथविक्रेते, लेखक, वाचनालये यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात दहा कलमी ‘ग्रंथ सनद’ तयार करण्यात आली. विकसनशील देशांमध्ये वाचनसंस्कृती विकसित होण्याच्या अनुषंगाने ही सनद खूप महत्त्वपूर्ण आहे.  सार्वजनिक वाचनालये सक्षम करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. शासनाने वेळेवर अनुदान (वेतन/ग्रंथखरेदी/ सोयीसुविधेसाठी) दिले तरच सार्वजनिक वाचनालये वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यात योगदान देऊ शकतील.