शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

हसतमुख, दिलदार आणि विद्वान सहकारी

By rajendra darda | Updated: January 22, 2022 05:44 IST

ज्येष्ठ पत्रकार, ‘लोकमत’चे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे जाणे वेदना देणारे आहे. हसतमुख, दिलदार, विद्वान सहकाऱ्याला आम्ही मुकलो.

- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री आणि एडिटर इन चीफ, लोकमत मीडियापत्रकारितेतील उमेदीचा काळ इंडियन एक्स्प्रेससारख्या इंग्रजी वृत्तपत्र समूहात घालविल्यानंतर निवृत्तीनंतरच्या काळात मराठी पत्रकारितेत कोणी रमेल का, असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याचे उत्तर नाही, असेच राहील. दिनकर रायकर यांनी हे म्हणणे सपशेल खोटे ठरविले.  निवृत्तीनंतर ते मराठी वृत्तपत्रसृष्टीत म्हणजेच ‘लोकमत’मध्ये केवळ रमलेच नाहीत, तर मराठी पत्रकारिता ही त्यांच्या जीवनाचा अंग बनून गेली. संपादक ते समूह संपादक आणि पुढे सल्लागार संपादक अशी मोठी जबाबदारी त्यांनी ‘लोकमत’ परिवारात पार पाडली. अखेरच्या श्वासापर्यंत ते लोकमत परिवाराचा भाग राहिले.कोल्हापूरच्या लाल मातीत तयार झालेला आणि पुढे मुंबईतच रमलेला हा पहिलवान मराठवाड्याच्या दुष्काळी मातीत नुसता रमलाच नाही, तर या मातीत त्यांनी मोठा गोतावळा निर्माण केला. मुंबईसारख्या स्वप्ननगरीत संपूर्ण कारकीर्द घालविल्यानंतर औरंगाबादसारख्या शांत शहरात ते रमतील असे मला वाटले नव्हते.  माझा हा अंदाज दिनकर रायकर यांनी खोटा ठरविला. एक्स्प्रेस ग्रुपमध्ये वाढलेल्या दिनकर रायकर यांनी निवृत्तीनंतरची इनिंग ‘लोकमत’मध्ये सुरू केली.  

२००२ ते २००६ अशी चार वर्षे ते औरंगाबाद आवृत्तीत संपादक राहिले. औरंगाबाद शहर समजून घेण्यासाठी प्रारंभीच्या काळात सहकाऱ्यांच्या स्कूटरवर त्यांनी अगदी गल्लोगल्ल्या पालथ्या घातल्या. या चार वर्षांत त्यांनी औरंगाबाद कार्यालयातील न्यूज रूमचे वातावरण बदलून टाकले. साऱ्या जगाची चिंता आपल्यालाच आहे, अशा ओझ्याखाली का जगायचे, काम करीत असताना आनंद देत राहा, आनंद घेत राहा असे ते म्हणायचे. दिनकर रायकर अखेरच्या श्वासापर्यंत असाच आनंद वाटत राहिले. पुढे २००६ ते २००९ पर्यंत मुंबई आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. २००९ ते २०२० जवळपास ११ वर्षे ‘लोकमत’चे समूह संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. पत्रकाराला वयाचे बंधन नसते. त्याला प्रत्येक गोष्टीचे किमान ज्ञान आवश्यक असते. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या पिढीला ते हे नेहमी सांगायचे. काम करणाऱ्या माणसाच्या हातूनच चुका होतात, हे सांगत असताना एकच चूक पुन्हा होऊ द्यायची नसते हेही ते सांगायला विसरत नसत.मराठी माणसाने आत्मविश्वासाने जगायला पाहिजे. विशेषत: गावाकडून येणाऱ्या तरुणांनी तर अधिक आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत असत. ‘लोकमत’ परिवारातील संपादकीय विभागातील अधिकतर सहकारी खेडेगावातून आले. मुंबईत संपादक झाले तेव्हा अशा तरुण सहकाऱ्यांना ते मुद्दाम पंचतारांकित हॉटेलमधील पत्रकार परिषदांना पाठवीत असत. गावखेड्यातून आलेल्या अनेक तरुणांना त्यांनी आत्मविश्वासाने उभे केले. यातील अनेक जण आज संपादक म्हणून यशस्वीपणे काम करीत आहेत. 
राज्यात ४५ पेक्षा जास्त संपादक घडविणारे दिनकर रायकर संपादक म्हणून जेवढे कठोर होते, तेवढेच ते मिश्कीलदेखील होते. न्यूज रूम गंभीर झाली, की एखादा किस्सा घेऊन ते आनंद पेरत राहायचे. त्यांच्यासमोर दैनिकाचे पान दाखविण्यासाठी नेताना भल्याभल्या उपसंपादकाची घाबरगुंडी उडायची. काही मिनिटांत पूर्ण पान वाचून चुकांवर लाल मार्क यायचे. त्यांच्या नजरेतून अंकातील चूक अजिबात सुटायची नाही.महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून ते आताच्या उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांचा जवळून परिचय असलेल्या मोजक्या संपादकांपैकी ते एक.  संपादक म्हणून यशस्वी राहिले, तेवढेच ते रिपोर्टर म्हणून देखील यशस्वी राहिले. त्यांच्यातील पत्रकार त्यांनी कधीच मरू दिला नाही. वाचनाची अफाट गती आणि प्रत्येक बातमीवर तातडीने रिॲक्ट होण्याचा स्वभाव यामुळे ते कायम बातमीत रमत राहिले. सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता. कुठल्याही विषयावर केवळ त्यांचा अभ्यासच नव्हता तर ते व्यक्त करण्याची कलादेखील त्यांना अवगत होती. कुठलीही व्यक्ती पहिल्या भेटीतच दिनकर रायकरांच्या प्रेमात पडायची, ते यामुळेच. निसर्ग नियमाप्रमाणे वयानुसार ते वृद्ध झाले होते. मात्र, पंचविशीतल्या तरुणाला लाजवील असा त्यांचा उत्साह शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता. त्यांचे कायम उत्साही असण्याचे औषध मात्र त्यांनी आम्हाला कधीच सांगितले नाही. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांचा चाहता वर्ग मोठा. ‘लोकमत’मध्येदेखील केवळ संपादकीय विभागातच त्यांचे चाहते आहेत असे नाही, तर सर्वच विभागातील सहकारी त्यांचे चाहते राहिले. काम करताना ताण न घेणे. हसत-खेळत काम करणे आणि सर्वांना तसे करायला भाग पाडणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी न्यूज रूम जितकी सिरियस ठेवली तितकीच ती हसती-खेळतीदेखील ठेवली.खरे तर इंडियन एक्स्प्रेसमधून निवृत्त झाल्यानंतर दुसरा एखादा पत्रकार कौटुंबिक जीवनात रमला असता. दिनकर रायकर असे सर्वसामान्यांमधले नव्हते. निवृत्तीनंतर जवळपास २२ वर्षे म्हणजे अख्खी एक इनिंग त्यांनी ‘लोकमत’ परिवारासोबत काम केले. निवृत्तीनंतर ‘लोकमत’ परिवारात ते आले तरी त्यांच्या कामात, कामांच्या वेळात निवृत्ती कधीच जाणवली नाही. ती आता कायमचीच जाणवणार आहे.