हवामान बदलाचे संकट हे आता केवळ शैक्षणिक आणि बौद्धिक सेमिनार्समध्ये चर्चिले जाणारे प्रेझेंटेशन राहिलेले नाही. त्याचा प्रत्यय आपण सर्वजण आता नियमितपणे घेत आहोत. त्यामुळे विविध अहवाल प्रकाशित होतात आणि मागे पडतात. यात आश्चर्य वाटण्याजोग काही नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एखाद्या एजन्सीने याबाबत एखादा अहवाल प्रकाशित केला, तरी त्याविषयी फारशी चर्चा होत नाही, परंतु नोकऱ्या आणि रोजगार संधीवर त्याचा परिणाम होणार, असे म्हटल्याबरोबर सर्वांना अगदी खडबडून जाग येते. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताजा अहवाल ‘वर्किं ग ऑन ए वॉर्मर प्लॅनेट : द इम्पॅक्ट ऑफ हिट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिव्हीटी अॅन्ड डिसेंट वर्क’ अशा लांबलचक शीर्षकामुळे वेगळा ठरतोय़, पण त्यात जे चित्र रेखाटलंय, त्यामुळे अधिकच महत्त्वाचा ठरतोय. त्यानुसार, कृषी आणि बांधकाम या सर्वाधिक रोजगार पुरविणाºया क्षेत्रावर या तापमान वाढीचा मोठा घाला येणार आहे.
उष्णतेच्या ताणाचा सर्वाधिक प्रभाव आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात जाणवत असून, २०३० पर्यंत कामगारांच्या उत्पादकतेवरील त्याचा प्रभाव अधिकच जाणवेल. भारताला सर्वाधिक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलंय. उष्णतेच्या ताणामुळे भारतामध्ये १९९५ सालीच सुमारे ४.३ टक्के कामाचे तास वाया जात होते, ते प्रमाण २०३० मध्ये ५.८ टक्क्यांवर पोहोचणार आहे, शिवाय प्रचंड लोकसंख्यावाढीमुळे उष्णता ताणाचे परिणाम अधिकच होणार असले, तरी बांधकाम क्षेत्रामध्ये जास्तीतजास्त कामाचे तास वाया जाणार आहेत. जेव्हा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा वर जातं आणि दमटपणा वाढतो, त्यावेळी उष्णता ताण मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतो. अतिरेकी उष्णता कामाच्या वेळी आरोग्याला हानिकारक ठरून कामगारांच्या शारीरिक क्रियांमध्ये अडथळे आणते. ज्यावेळी शरीराचं तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं, तेव्हा ‘हिट एक्झॉशन’ घडतं आणि काम करण्याची क्षमता कमी होते.
त्याचबरोबर, वयस्कर कामगारांना त्यांच्यामधील उष्णतेशी लढा देण्याच्या कमी पातळीमुळे खूपच त्रास होणार आहे. देशांमधील वयस्कर लोकांचं कामगार क्षेत्रातील प्रमाण लोकसंख्येच्या ‘एजिंग’मुळे वाढतंय, तेव्हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगार असलेल्या भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळसारख्या देशातही वयस्कर कामगार वाढताना दिसत आहेत. तेव्हा उष्णतेच्या ताणाचे संकट खूपच गांभीर्याने घेऊन पावलं उचलावी लागणार आहेत, हे निश्चित.- शैलेश माळोदे। हवामान बदलाचे अभ्यासक