शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मान्सूनचा पॅटर्न’ खरोखरच बदलला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:42 IST

ऋतू बदलतात ते हवामानामुळे नव्हे. ऋतुचक्र आहे तसेच आहे. भारतीयांचे भविष्य मान्सूनशी जोडलेले आहे आणि ते निराशाजनक नाही, तर उज्ज्वल आहे.

डॉ. रंजन केळकर, निवृत्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

हल्ली अशी एक मानसिकता आहे की, निसर्गात, आकाशात, वातावरणात काही तरी विपरीत घडत आहे. टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूज अनेकदा या भावनेला दुजोरा देणाऱ्या असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात महाप्रलय होणार, वर्षभराचा पाऊस एका रात्रीत पडला, मान्सून इतक्या लवकर कधीच आला नव्हता, वगैरे. लोकांची दुसरी एक विचारसरणी आहे की, त्यांनी आखलेल्या चौकटीत निसर्गाने बसले पाहिजे. बहुतेक नैसर्गिक प्रक्रिया पद्धतशीरपणे आणि वेळेनुसार घडत असतात. मात्र, त्यात लष्करी शिस्तबद्धता असावी, ही अपेक्षा करणे हा एक विचित्र अट्टाहास आहे. निसर्गाने स्वतःच्या हालचालींसाठी पुष्कळ मुभा राखलेली आहे. त्याशिवाय निसर्गाने अनेक रहस्ये झाकून ठेवलेली आहेत, ज्यांचा उलगडा अजून व्हायचा आहे.

हवामान बदलाची चर्चा जगभर सातत्याने होत असताना मान्सूनच्या भवितव्याची चिंता भारतीय जनतेला वाटणे साहजिक आहे. दररोज प्रकाशित होत असलेले नवनवीन वैज्ञानिक निष्कर्ष आणि बातम्या या चिंतेत भर घालत आहेत. म्हणून ‘मान्सूनचा पॅटर्न खरोखरच बदलला आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. 

मागील सात-आठ वर्षांत देशात भीषण दुष्काळ पडला होता का? - नाही, मान्सून सामान्य राहिला होता. अलीकडच्या काळात देशाचे अन्नधान्य उत्पादन घटले आहे का ? - नाही, उलट ते वाढले आहे. असे आठवते का की, एकदा मान्सून आलाच नाही? - नाही. तो तर दर वर्षी न चुकता येतोच येतो. मान्सूनने त्याचा मार्ग बदलला आहे का?, तो कधी केरळऐवजी राजधानी दिल्लीत हजर झाला आहे का? - नाही. आपल्याला आश्वस्त करणारी गोष्ट ही आहे की, मान्सूनचा मूलभूत पॅटर्न होता तसाच आहे, तरीही.. 

‘बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं,वो जो बदले तो जमाने की हवा भी बदली।’ 

या ‘चौदवी का चांद’ चित्रपटातल्या गीताप्रमाणे सर्वांना असे वाटत आहे की, मान्सून काहीसा बदलला आहे, आणि ते चुकीचे नाही. 

मान्सूनमध्ये महत्त्वाचा असा जो एकमात्र बदल होत आहे तो हा की, पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या घटना वाढत आहेत. याचे कारण हे आहे की, वैश्विक तापमानवाढीमुळे हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता बळावली आहे. त्यामुळे मान्सूनच्या हलक्या, रिमझिम सरींऐवजी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वाढली आहे. थोड्या वेळात पडणाऱ्या प्रचंड पावसाला ढगफुटी हे नवे नावही मिळाले आहे. दुसरा एक बदल लोकांना जाणवत आहे की, नैऋत्य मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या तारखा बदलत आहेत. काही म्हणतात की, ऋतुचक्र बदलले आहे. खरे पाहिले तर हा हवामान बदल नाही. मान्सून दर वर्षी आपले एक नवे रूप घेऊन येत असतो. कधी तो लवकर येतो, जसे यंदा आपण पाहत आहोत, कधी तो उशीर करतो, कधी रेंगाळतो. पण, हे बदल कायमचे नसतात आणि ते सीमित असतात.

अतिवृष्टी मान्सूनमधली असो किंवा इतर महिन्यातली असो, तिचे तीन प्रमुख दुष्परिणाम घडून येतात : शहरी पूर, भूस्खलन आणि शेतीचे नुकसान. आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे दुष्परिणाम बऱ्याच अंशी मानवनिर्मित असतात. शहरी लोकसंख्या सातत्याने वाढत गेली आहे, पण त्या मानाने पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रणालींचा विकास झालेला नाही. डांबरी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचते, ते वाहून जायची सोय नसते आणि थोड्याच वेळात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. एरवी कोरड्या असलेल्या नद्या दूरवर झालेल्या ढगफुटीमुळे अचानक तुडुंब वाहू लागतात, तेव्हा अवैधपणे नदीच्या पात्रात बांधलेली घरे कोसळतात आणि लोक दगावतात. 

या सर्व गोष्टींसाठी मान्सूनला जबाबदार धरणे बरोबर नाही. भूस्खलनाचेही तसेच आहे. जर एखाद्या जागी लागोपाठ काही दिवस पाऊस पडत राहिला, तर जमीन खोलपर्यंत ओली होऊन घसरू शकते. डोंगराच्या कड्यावर हा धोका सर्वाधिक असतो आणि नेमके तेथेच लोक घरे बांधतात किंवा झोपडपट्ट्या उभारतात आणि प्राण गमावतात. येथेही मान्सून दोषी नसतो. अतिवृष्टीचा तिसरा विपरीत परिणाम होतो तो शेतीवर, म्हणजे उभ्या पिकांवर. शेतामधून पाणी वाहून जायला वाट नसली, तर पिकांचे नुकसान अपरिहार्य आहे. स्थानिक हवामानाशी सुसंगत असलेली आणि जोरदार पावसात टिकून राहणारी पिके निवडणे अगत्याचे आहे. 

सारांश, मान्सूनचे मूळ स्वरूप होते तसेच आहे, त्यात आमूलाग्र बदल झालेला नाही आणि होण्याचे संकेत नाहीत. ऋतुचक्र आहे तसेच आहे. ऋतू बदलतात ते पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे, हवामानामुळे नाही. हवामान बदलामुळे काय होऊ शकते, हे समजून घेऊन आपण खबरदारीचे उपाय करू शकतो. राजकवी भा. रा. तांबे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिले होते, 

‘असेच वारे पुढे वाहतील, मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील...’ 

भारतीयांचे भविष्य मान्सूनशी जोडलेले आहे आणि ते निराशाजनक नाही, तर उज्ज्वल आहे. 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊस