शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

उदार की संधीसाधू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:54 IST

इम्रान खान यांच्या उदार धोरणामुळे अभिनंदनची सुटका होणार असली तरी त्यानंतर दहशतवाद्यांना बळ पुरविण्याचे पाकिस्तान थांबविणार आहे काय, हा मुख्य प्रश्न आहे. तसे तोंडी आश्वासन पाकिस्तानने अनेक वेळा दिले असले तरी कारवाई कधीच केलेली नाही.

हवाई चकमकीत अनपेक्षितपणे पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारताचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठविले जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी केली. अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारी परराष्ट्र खात्याची यंत्रणा आणि अभिनंदनसाठी प्रार्थना करणारे कोट्यवधी भारतीय नागरिक यांना समाधान वाटावे अशी ही घोषणा आहे.

अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागणार हे कालपासूनच लक्षात येत असले तरी सुटकेची घोषणा इतक्या तातडीने होणे अनपेक्षित आहे. कारण युद्धकैद्यांबाबत पाकिस्तानबरोबरचा अनुभव चांगला नाही. अनेक दिवस अतीव छळ सोसल्यानंतर यापूर्वीचे युद्धकैदी सुटले आहेत. अभिनंदन यांची सुटकाही काही दिवसांनंतर होईल असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणत होते. नंतर निर्णय फिरला व उद्याच सुटका होणार अशी घोषणा झाली. इम्रान खान यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला होता. अमेरिका, चीनसारखी मित्रराष्ट्रेही खडे बोल सुनावीत होती. मुस्लीमबहुल राष्ट्रांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. जगाच्या पाठीवर एकटा पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही दिखाऊ उदारता आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळाले नाही, तर पाकिस्तान दिवाळखोरीत जाईल. केवळ द्वेषापोटी भारताच्या वैमानिकाला वाईट वागणूक दिली वा अडकवून ठेवले तर त्याचे घोर परिणाम होतील हे पाकिस्तानचे पंतप्रधान व या पंतप्रधानांना पडद्याआडून नाचविणारे तेथील लष्कर यांना पुरते माहीत आहे. पैसा उभा करण्यासाठी जगासमोर उजळ माथ्याने जायचे असेल तर भारतीय वैमानिकाला सोडणे सोईस्कर होईल हा संधीसाधू हिशेब त्यामागे आहे. अभिनंदनची सुटका ही भारतासाठी महत्त्वाची व समाधानाची असली तरी त्यामागचे संधीसाधू राजकारण दुर्लक्षित करता येणार नाही. आता पंचाईत मोदी सरकारची आहे.

मंगळवारच्या हवाई मुसंडीनंतर भारताची मान ताठ झाली होती. सर्व संकेतांना दूर सारून पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या प्रचारसभेत गर्वाचे प्रदर्शन केले. भारतीय वायुदलाची कामगिरी अभिमान वाटावा अशीच होती यात शंका नाही. त्याबद्दल प्रत्येक देशवासी वायुदलाचे मनापासून कौतुकही करीत होता. पण एका कारवाईमुळे विजय मिळाला असे होत नाही. पाकिस्तान हा भारतद्वेषाने पछाडलेला प्रबळ शत्रू आहे. नव्या नव्या क्लृप्त्या शोधून भारताला जेरीस आणण्याचे मिशन त्या देशातील राज्यकर्त्यांनी घेतले आहे. एखाद-दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकने माघार घेणारा वा कारवाया थांबविणारा तो देश नाही. याचे प्रत्यंतर दुसऱ्याच दिवशी आले. बुधवारी पाकिस्तानने भारतीय लष्करी ठाण्यांवर उघड हल्ला केला. तो परतवून लावताना दुर्दैवाने अभिनंदन वर्धमानचे विमान कोसळले व तो पाकिस्तानच्या कैदेत पडला. विजयानंतर ठेच अशी भारताची अवस्था झाली. भारताच्या हवाई हल्ल्यामुळे नाचक्की झालेल्या पाकिस्तानी लष्कराला या एका दुर्दैवी घटनेमुळे जोम आला. भारताला कैचीत पकडण्यास एक कारण मिळाले. त्याच कारणाचा वापर करून भारताची आक्र मकता थांबविण्याची धडपड इम्रान खान करीत आहेत. तेव्हा अभिनंदनबाबतचे उदार धोरण व दहशतवाद्यांची सातत्याने होणारी घरभरणी या पाकिस्तानच्या दुटप्पी खेळाचा ताळमेळ कसा घालायचा, हा प्रश्न भारतापुढे आहे. यासाठी एकच मार्ग म्हणजे अभिनंदनची सुटका ही पाकिस्तानच्या उदारतेची कृती नसून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

युद्धाचे अनेक आयाम असतात व परराष्ट्र धोरण हे त्यातील एक मुख्य अस्त्र असते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने ते परिणामकारक रीतीने वापरले आणि म्हणून अभिनंदनची सुटका करण्याची वेळ पाकिस्तानवर आली हे लक्षात ठेवून जोपर्यंत दहशतवादी कारवाया बंद होत नाहीत आणि मसूद अजहरला ताब्यात देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानसोबत शांततेचा व्यवहार होऊ शकत नाही अशी धोरणातील स्पष्टता भारताने ठेवली पाहिजे. मात्र वाटाघाटीचे दरवाजे बिलकूल बंद करूनही चालत नाही. सोयीनुसार ते किलकिले करावे लागतात. मोदी सरकारने याचेही भान ठेवायलाच हवे. तीच आजची गरज आहे.