शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

ड्रॅगनची नांगी ठेचण्याचं रामायणातील 'रामबाण' सूत्र; श्रीरामाने बिभिषणाला सांगितलं होतं 'युद्धतंत्र'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:25 IST

युद्धाच्या बाबतीत आपली चीनशी तुलना करताना या गोष्टी खास करून महत्त्वाच्या ठरतात. १९६२ पासून अनेक दशके चीन आपल्याशी दांडगट शेजाऱ्यासारखा वागत आला आहे, पण याचा सामना करताना आपल्यामध्ये रणनीतीची सुस्पष्टता दिसत नाही.

- पवन के. वर्मालष्करीदृष्ट्या आपल्याहून बलाढ्य असलेल्या शत्रूला कसे खडे चारावेत, याचे सुंदर विवेचन तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’मध्ये आढळते. सत्वशील व सदाचारी असलेला बिभिषण हा रावणाचा लहान भाऊ रामायणातील युद्धात प्रभू रामचंद्रांच्या बाजूने उभा राहिला होता. रावणाच्या अचाट सैन्यशक्तीची चांगलीच माहिती असल्याने बिभिषणाने, ‘रावणाचा पाडाव कसा करणार’, असे प्रभूंना विचारले. याचे मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे व तुलसीदासांनी त्याचे मोठे काव्यात्मक वर्णन केले आहे. प्रभू रामांनी बिभिषणाच्या शंकेचे निरसन करताना सांगितले होते की, युद्धामध्ये केवळ सैन्यबळ व शस्त्रायुधे पुरेशी नाहीत. त्या जोडीला योद्धा व त्याच्या सैन्यातील शौर्य व निस्सीम दृढविश्वास; सचोटी व सद्वर्तन; विवेक, आत्मसंयम व औदार्य; क्षमाशीलता, करुणा आणि मानसिक संतुलन; देवावरील प्रगाढ श्रद्धा व अलिप्तता, दानधर्म व तारतम्य; परमोच्च प्रज्ञा व शुद्ध-स्तब्ध ही गुणवैशिष्ट्येच विजयाचा मार्ग प्रशस्त करतात.

मी हा संदर्भ दिल्यावर त्याचा आज चीनच्या निमित्ताने निर्माण झालेल्या भारताच्या परिस्थितीशी संबंध काय, या विचाराने मुरब्बी रणनीतीकारांच्या कपाळावर अठ्या चढल्या असतील याची कल्पना आहे. त्यांना मी एवढेच सांगेन की, आधुनिक काळातील समरप्रसंगांमध्ये दोन प्रतिस्पर्ध्यांची तुलनात्मक ताकद जोखताना डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीही निर्णायक ठरू शकतात, यावर भर देण्यासाठीच मी वरील संदर्भ दिला आहे. अशी तुलना करताना तज्ज्ञमंडळी सर्वसाधारणपणे दोघांपैकी कोणाकडे सैन्य, रणगाडे, चिलखती वाहने, विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे, रस्ते व विमानतळ किती अशा गोष्टींचा हिशेब करतात. इतिहासाचे अभ्यास या गोष्टींखेरीज सैन्याची चपळाई, त्यांचे मनोधैर्य, एकसंधता, लक्ष्याप्रती सुस्पष्टता, डावपेचांची लवचिकता, देशाचा निर्धार व त्याला असलेले लोकांचे समर्थन या अदृश्य बाबीही विचारात घेत असतात.

युद्धाच्या बाबतीत आपली चीनशी तुलना करताना या गोष्टी खास करून महत्त्वाच्या ठरतात. १९६२ पासून अनेक दशके चीन आपल्याशी दांडगट शेजाऱ्यासारखा वागत आला आहे, पण याचा सामना करताना आपल्यामध्ये रणनीतीची सुस्पष्टता दिसत नाही. स्वत: जागतिक शक्ती बनण्याची ईर्षा बाळगणारा चीन भारताकडे आव्हान म्हणूनच पाहणार, हे फार पूर्वीच लक्षात यायला हवे होते. जगातील सर्वांत मोठी लोकशाही, सशक्त होत असलेली आर्थिक सत्ता, १३० कोटींची लोकसंख्या आणि प्राचीन संस्कृतीचे पाठबळ या बाबींच्या जोरावर निदान आशिया खंडात तरी भारत हे चीनसाठी आव्हान नक्कीच आहे. असे आव्हान शेजारी देशाचे असल्याने त्याची दखल चीनला घ्यावीच लागेल. म्हणूनच भारताला कायम दडपण्याचे धोरण चीन सातत्याने राबवीत आला आहे. जोपर्यंत भारत स्पष्टपणे हे लक्षात घेणार नाही, तोपर्यंत या ड्रॅगनचा मुकाबला करताना भारताला ‘बॅकफूट’वरच राहावे लागेल.

लष्करी व आर्थिक सामर्थ्यात भारताची चीनशी तुलना होऊच शकत नाही. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाचपट आहे. चीनचा संरक्षणावरील खर्च (सुमारे २२५ अब्ज डॉलर) हा भारताच्या (५५ अब्ज डॉलर) सुमारे चौपट आहे. चीनचे सैन्य २० लाख, तर भारताचे १३ लाख आहे. चीनकडे १३ हजार, तर आपल्याकडे चार हजार रणगाडे आहेत. ४० हजार चिलखती लढाऊ वाहने असलेला चीन या बाबतीतही २,८०० वाहने असलेल्या भारताच्या कितीतरी पुढे आहे. चीनच्या दोन हजार रॉकेट लाँचरना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे फक्त ३०० लाँचर आहेत. चीनच्या पाणबुड्यांची संख्याही भारताच्या पाचपट आहे. शिवाय सीमेवरील रस्त्यांसह चीनच्या पायाभूत सुविधा आपल्याहून कितीतरी उत्तम आहेत.

पण हे लक्षात घ्यायला हवे की, मर्यादित स्वरूपाच्या युद्धात एकूण युद्धसामर्थ्याचे मोठेपण तेवढेसे निर्णायक नसते. पूर्णक्षमतेचे युद्ध झाल्यास चीनकडे आपल्यापेक्षा जास्त अणुबॉम्ब व ते लक्ष्यावर डागण्याची साधने आहेत, पण भारतही अण्वस्त्रधारी देश आहे व ती जमीन, हवा व पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून डागण्याची क्षमता भारताकडेही आहे. चीनलाही याची कल्पना आहे. म्हणूनच प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर दादागिरी करण्याचे उद्योग चीन करतो, पण येथेही आपले भरपूर नुकसान करण्याची भारताकडे क्षमता आहे, हेही चीन जाणून आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारताला पाकिस्तानशी अनेक छुप्या व कमी तीव्रतेच्या संघर्षांचा दांडगा अनुभव असल्याने भारत प्रत्यक्ष युद्धासाठी चीनहून अधिक सज्ज व सक्षम आहे, असे अनेक तज्ज्ञ त्यामुळेच मानतात. अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूलच्या बेल्फार सेंटरने यासंदर्भात अभ्यास केला आहे. उच्च पहाडी प्रदेशातील युद्धात भारत चीनहून सरस ठरू शकेल, असा त्यांचा निष्कर्ष आहे. १९७९ मध्ये व्हिएतनामवरील आक्रमणाशिवाय चीनला मोठ्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. व्हिएतनामनेही अधिक सैन्याच्या जोरावर चीनला धूळ चारली होती. चीनकडे भारताहून अधिक लढाऊ विमाने असली तरी भारताच्या ‘मिराज २०००’ व ‘एसयू ३०’ लढाऊ विमानांची भेदकता व उपयुक्तता सर्व प्रकारच्या परिस्थितीत सिद्ध झाली आहे.

प्रभू रामचंद्रांनी बिभिषणाला दिलेल्या उत्तराचा संदर्भ वेगळा असला तरी युद्धामध्ये वरकरणी बलाढ्य दिसणाऱ्या पक्षाची सरशी होतेच असे नाही व त्याखेरीज इतरही अनेक गोष्टी विजयश्री खेचून आणू शकतात, हेच त्याचे सार आहे. भारताने सामरिक दृष्टिकोनात सुस्पष्टता आणून चीनच्या सीमारेषेलगत पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे विणायला हवे. जोडीला शस्त्र-आयुधांचे आधुनिकीकरण करणेही क्रमप्राप्त आहे. चीन आपल्याहून अधिक प्रबळ असल्याने एकाहून अनेक ठिकाणी त्याला युद्धात गुंतवून ठेवण्याची व प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्यात असायला हवी.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव