शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे मारेकरी

By admin | Updated: December 8, 2014 06:02 IST

शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात.

अमर हबीब - शेती व शेतकऱ्यांबद्दल बिगर शेतकरी समाजात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक शेतकरी ही एक जीवनशैली आहे, असे मानतात. बिगर शेतकऱ्याने असे उदात्तीकरण केले, की मी त्यांना ‘तुम्ही शेती का करीत नाहीत?’ असा प्रश्न विचारतो. तेव्हा गप्प बसतात. शेती करणे हे एवढे छान छान असते, तर त्यावर लोकांच्या उड्या नसत्या का? शेती ही जीवनशैली आहे, असे म्हणणाऱ्यांच्या मनात ‘तू असाच राबत राहा.’ असा छुपा संदेश असतो. छान टुमदार बंगला, नवरा बायकोचा गडगंज पगार. दोघांना कार, मूल कॉन्व्हेन्टला. अधून मधून गावाकडे फेरफटका मारायचा अन् म्हणायचे, ‘तुमचे किती चांगले आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते.’ महिन्याच्या पगाराची वा हरामाच्या कमाईची ददात नसलेल्यांची ही कोडगी भाषा. शेती ही जीवनशैली आहे, ही समजूत केवळ बिगर शेतकऱ्यांचीच नाही. अनेक शेतकरी खुद्द शेतीला जीवनशैली मानतात. याला ‘तुरुंगातील तंद्री’ म्हणतात. तुरुंगात राहणारेच तुरुंगाचे गुणगान करू लागतात. माझ्या तुरुंगाच्या भिंती किती उंच आहेत आणि मला घातलेल्या बेड्या किती बलदंड आणि सुंदर आहेत, याची महती ते सांगू लागतात. असे तुरुंगाचे ‘गौरवगीत’ गाणारे अनेक महाभाग मी पाहिले आहेत. त्यांपैकी बऱ्याच लोकांना शेतीबाह्य उत्पन्न होते. जात किंवा धर्म जसा जन्माच्या आधाराने ठरतो, तसे ज्यांचे आई-बाप शेतकरी आहेत, त्यांना शेतकरी समजले जाते, ही समजूतदेखील चुकीची आहे. शेती हा एक व्यवसाय आहे. किराणा दुकानदाराचा मुलगा कलेक्टर झाल्यावर जसा किराणा दुकानदार म्हणून ओळखला जात नाही, तसेच शेती न करणारा शेतकऱ्याचा मुलगाही शेतकरी नसतो. शेतकऱ्याचा मुलगा प्राध्यापक, तलाठी, शिक्षक झाल्यानंतर शेतकरी राहत नाही. समाजाचे विश्लेषण करणारे विद्वान खास करून ही गफलत करतात.ज्याच्याकडे सात-बारा आहे, तो शेतकरी, ही समजूतही चूक आहे. इन्कम टॅक्स बुडविण्यासाठी अनेक व्यापारी, पुढारी आणि अधिकारी शेतजमिनी आपल्या नावाने करून ठेवतात. आपल्याकडील काळा पैसा शेतीतून आला आहे, असे दाखवून पांढरा करून घेतात. त्यांना शेतकरी म्हणायचे का? स्वत:ला शेतकरी म्हणून मिरविणारे चलाख पुढारी आहेत. सगळ्या शेतकऱ्यांची शेती तोट्यात असताना पुढाऱ्याचीच शेती फायद्याची कशी काय होते? पुढाऱ्याची शेती रानात नव्हे, राजकारणात पिकते. मग शेतकरी कोण? ज्यांचे पोट शेतीवर आहे, ज्यांची प्रगती आणि अधोगती शेतीतून आलेला पैसा ठरवितो, ते सगळे शेतकरी. हा शेतकरी आज भयंकर संकटात आहे.मराठी साहित्यात अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचे वास्तव चित्र काही प्रमाणात दिसते आहे. पूर्वीचे साहित्य म्हणजे लेखक लहानपणी सुटीच्या दिवसांत मामाच्या गावी जायचे. तेथे त्यांना शेती दिसायची. हिरवीगार राने, नदीपात्रात पोहणे, आंबराया, चांदणी रात्र वगैरे. निसर्गचित्राचे वर्णन करावे, तसे त्यांनी केले. नंतर हे चित्र बदलले. इंग्रज भारतात आल्यानंतर काही शहरांत औद्योगिकीकरण झाले. खेड्यातील लोक शेती सोडून जगायला शहरात येऊ लागले, तेव्हा तथाकथित मध्यप्रवाह मानलेल्या मराठी साहित्यात शेतकरी ‘विदूषक’ म्हणून रंगविला गेला. काळ बदलला. कामगारांच्या बाजूने आवाज उठू लागला. मार्क्सवादी विचारांचा प्रभाव वाढला. वर्गसंघर्षाची भाषा बोलली जाऊ लागली. मालक आणि मजुरांचे तत्त्वज्ञान लोकप्रिय झाले. मालक शेतकरी आणि शेतीत काम करणारा मजूर. मजुरांचा कैवार घेण्यासाठी मालकावर हल्ला चढविला पाहिजे. या काळात ‘खलनायक’ म्हणून शेतकऱ्यांचे चित्र रेखाटले गेले. मराठी चित्रपटांत त्याचे प्रतिबिंब उमटलेले. गावचा पाटील, पिळदार मिश्या, खांद्याला बंदूक, घोड्यावर बसून येतो, रानातल्या मजुराच्या सुंदर पोरीला उचलून घेऊन जातो, अशी दृश्ये रेखाटली गेली. शेतकऱ्याला परंपरागतवाल्यांनी ‘विदूषक’ आणि पुरोगाम्यांनी ‘खलनायक’ ठरविले. ही दोन्ही चित्रे खोटी, भ्रामक आणि द्वेषमूलक होती.शेतकऱ्यांचे खरे दुखणे कोणीच मांडले नाही का? याचे उत्तर ‘मांडले होते,’ असे आहे. १५० वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिला. शेतकऱ्याचे वास्तव चित्र मांडले. फार कमी लोकाना माहीत आहे, की प्रबोधनकार ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक पुस्तक लिहिले आहे. प्रबोधनकार आज असते, तर त्यांनी सत्तेचे सिंहासन अक्षरश: पेटवून दिले असते, इतके जहाल लेखन त्यांनी केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी अनेकांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा दिली. लोकांनी काय केले? या महात्म्यांचे जे आणि जेवढे सोयीचे होते, तेवढेच उचलले. शेतकऱ्यांबद्दलच्या विचाराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की माणसे मेंदूने कमी आणि खिशाने जास्त विचार करतात. कारखानदार असो की औद्योगिक कामगार, नोकरदार असो की सरकार, यांना शेतकऱ्यांचे वाईट करूनच कल्याण साधायचे असेल, तर कोणता महात्मा तरी काय करू शकेल?