शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अजहरच्या मुसक्या आवळत नाही, तोपर्यंत हे कागदी ठराव कागदावरच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 04:33 IST

मसूद अजहरला दहशतवादी ठरविण्याचा ठराव मंजूर होणे हा भारतासह शांतताप्रिय देशांना त्यांचा राजकीय विजय वाटत असला, तरी जोवर पाकिस्तान सरकार त्याच्या मुसक्या आवळत नाही, तोवर हा ठराव कागदावर राहण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोटापासून भारतात अनेक दहशतवादी कारवाया करीत आलेला पाकिस्तानचा कुख्यात दहशतखोर मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतखोर म्हणून घोषित करण्यात यावे, या भारतासह जगातील अनेक देशांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत केलेल्या मागणीला आजवर चीन मान्यता देत नव्हता. त्याच्या नकाराधिकारामुळे अजहर पाकिस्तानात मोकळा होता. मध्यंतरी त्याने आपला राजकीय पक्ष स्थापन करून तेथील निवडणुकांत भाग घेतला. मसूद जोवर भारतावर हल्ले करतो, तोवर चीनला त्याची फारशी दखल घ्यावीशी वाटली नाही. भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालय व सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी चीनच्या दारात दीर्घकाळ पाणी भरले; पण चीन पाकिस्तानशी असलेल्या त्याच्या मैत्रीमुळे ती गोष्ट मान्य करीत नव्हता.

प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आता अमेरिकेसह जगातील लोकशाही राष्ट्रे या मागणीच्या रेट्यामागे उभी राहिल्याने, चीनने आपली भूमिका बदलली व मसूदला ‘दहशतखोर’ म्हणून त्याने मान्यता दिली. भारताला व जगातील अनेक शांतताप्रिय देशांना तो त्यांचा मोठा राजकीय विजय वाटत असल्याने ते त्याचा आनंदही साजरा करीत आहेत. मात्र, या आनंदाला व संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावाला प्रत्यक्षात फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. जोपर्यंत पाकिस्तानचे सरकार अजहरच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद करीत नाहीत, तोपर्यंत हे कागदी ठराव कागदावरच राहणार आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेवर दहशतखोरी करणाऱ्या तालिबान व ओसामा बिन लादेनच्या टोळ्यांविरुद्ध सारे जग एकवटले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तान अमेरिकेकडून मोठी आर्थिक मदतही मिळवीत होता, पण ती मदत तो भारताविरुद्ध वापरत राहिला, हे आता उघड झाले आहे, शिवाय ओसामा बिन लादेन याला अबोटाबाद या पाकिस्तानच्याच शहरात मारायला प्रत्यक्ष अमेरिकेलाच कारवाई करावी लागली, हे जगाने पाहिले.

त्यामुळे पाकिस्तानचे सरकार जोवर मसूदविरुद्ध पावले उचलत नाही, तोवर तो मोकळाच राहणार आणि या ठरावामुळे त्याच्या प्रसिद्धीतच जास्तीची भर पडणार. जागतिक ठरावांचा, दबावाचा परिणाम म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अजहरचा बंदोबस्त करावा, असे कितीही वाटत असले, तरी तेथील लष्कर जोवर या गोष्टीला तयार होत नाही, तोवर त्यांनाही काही करता येण्याजोगे नाही. पाकिस्तानच्या सरकारवर लष्कराचा वरचष्मा आहे आणि त्याची नाराजी ओढवून तेथील कोणतेही सरकार सत्तेवर राहू शकणारे नाही. त्यामुळे ठराव होतील, त्यांना चीनची मान्यता मिळेल; पण त्यामुळे अजहर त्याच्या कारवाया थांबवील, असे समजणे हा भाबडेपणा आहे. काही काळापूर्वी पाकिस्तानला ‘दहशतखोर राष्ट्र’ ठरविण्याचा एक जोरकस प्रयत्न भारत व पाश्चात्त्य देशांनी केला, पण त्याला यश आले नाही. पाकिस्तान हे अजूनही दहशतखोरांचे आश्रयस्थान आहे आणि त्याचे तसे असणे जगाला मुकाट्याने पाहावे लागत आहे. (एक गोष्ट येथे आणखीही नमूद करण्याजोगी. संयुक्त राष्ट्र संघटना एके काळी सार्वभौम देशांचाच विचार तेवढा करायची.

आता तिला अजहरसारख्या गुन्हेगारांवर ठराव करावे लागतात, ही स्थिती त्या संघटनेची क्षीण झालेली क्षमताही सांगणारी आहे.) दहशतखोरांना देशाचा व जगाचा कायदा मान्य नसतो. त्याचप्रमाणे, कोणताही कायदा किंवा ठराव, जे त्यांचा आदर करतील, त्यांच्यासाठी असतात. ज्यांना ते कागदाचे चिटोरे वाटतात, त्या उद्दाम गुंडांना त्यांची फारशी महती नसते. अजहरची दहशतखोरी तीन दशकांएवढी जुनी आहे. त्याच्यावर या ठरावांचा फारसा परिणाम होणार नाही, हे साऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे भारत, संयुक्त राष्ट्र संघटना, चीन या साऱ्यांचा प्रयत्न त्याच्या दहशतीला जगभरात मोठे करणारा प्रकार ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. या संदर्भात भारताच्या दृष्टीने समाधानाची बाब एकच, चीन हा देश त्याची अजहरबाबतची ताठर भूमिका सोडून भारतासोबत आला ही. त्यावर ज्यांना समाधान मानायचे, त्यांना ते मानण्याचा अधिकार आहे. मात्र, याचा अजहरवर काही परिणाम होईल, ही अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिकाmasood azharमसूद अजहरchinaचीन