डाॅ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांच्याऐवजी सेना अध्यक्ष जनरल असीम मुनीर यांना भोजनाला बोलावले. त्यावर अशी चर्चा होऊ लागली की, जर ट्रम्प यांना भारताशी बोलाचाली करायची असती तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले असते. ट्रम्प जर भारताला मित्र मानतात तर त्यांनी मुनीर यांना भोजनाला का बोलावले? अशीही चर्चा झाली. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर हे लक्षात आले की, या भोजनामागे तर षड्यंत्र होते. अमेरिकेने तुकडा फेकला आणि मुनीर पळत गेले.
प्रकरण एवढेच नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांनी इराणचे सर्वात मोठे सेनाधिपती मोहम्मद हुसेन बकरी यांची भेट घेतली आणि त्यांना एक स्मार्ट घड्याळ भेट दिले, असा आरोप इराणी माध्यमे स्पष्ट शब्दात करत आहेत. त्या स्मार्ट घड्याळात जीपीएसचा ट्रॅकर लावलेला होता. मुनीर यांनी त्या जीपीएस ट्रॅकरचा संपर्क इस्रायलला दिला. त्यानंतर तीनच आठवड्यांत इस्रायलने मोहम्मद हुसेन बकरी यांना ठार मारले. इस्लामचा झेंडा मिरवत फिरणारा पाकिस्तान इतका मोठा धोका देईल किंवा मुनीर हे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या हस्तकासारखे काम करतील, असे बकरी यांनी स्वप्नातही कल्पिले नसेल. जगात पाकिस्तान हा एक असा देश आहे की, त्याच्यावर विश्वास राखणारा नेहमीच अडचणीत येतो. बकरी यांनी इतिहासातून हा धडा घेतलेला नव्हता. इस्रायल-इराणच्या युद्धात पाकिस्तानने विश्वासघातकी उद्योग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. एका बाजूला पाकिस्तान इराणवरील हल्ल्याची निंदा करत होता आणि दुसरीकडे इराण उद्ध्वस्त होईल, अशाप्रकारे सगळे उद्योग त्या देशाने चालवले होते.
अर्थात मुनीर तेच करत आहेत जे त्यांच्या आधीचे सेनाध्यक्ष करत आले. पाकिस्तानवर त्यांनी असेच संस्कार केले. जो तुकडे दाखवील, चांगली किंमत देईल त्याला विकले जावे. उद्या जर कोणी त्यापेक्षा जास्त किंमत दिली तर त्याच्या गळ्यात पडावे. अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाला जेरीस आणण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज होती, तेव्हा अमेरिकेने थैल्या उघडल्या आणि पाकिस्तान त्याच्या मांडीवर जाऊन बसला. चीनने खजिन्याची दारे उघडल्यावर अजिबात वेळ न घालवता पाकिस्तान चीनचा झाला. पाकिस्तान स्वतंत्र झाला त्या वेळेला त्याला केवळ अमेरिका जवळची होती. परंतु, तेव्हाही तो गद्दारी करत असे. अफगाणिस्तानच्या बदल्यात अमेरिकेकडून त्याने खूप पैसा उकळला आणि इकडे ओसामा बिन लादेनला आपल्या घरात लपायला जागाही दिली. ही गद्दारी अमेरिकेला समजत होती. परंतु, तोही कच्चा खेळाडू थोडाच होता! त्यानेही पाकिस्तानला खूप वापरून घेतले. परंतु, आता पाकिस्तानला चीनही जवळ आहे. दोघांशी जवळीक असल्याने बेईमानीही वाढली. जवळीक असलेला एक देश नाराज झाला तर दुसऱ्या देशाच्या मांडीवर जाऊन बसता येते. पाकिस्तान बेईमान आहे हे दोघांनाही ठाऊक आहे. पण काय करणार? अनेकदा बेईमानी फार उपयोगाची गोष्ट असते. थोडी बेईमानी सहन करणे ही काळाची गरज होते. हा माल विकाऊ आहे, किंमत मोजू आणि आपल्या मांडीवर बसवून घेऊ हे दोघांनाही ठाऊक असते.
परंतु, पाकिस्तानच्या या दुर्दैवाबद्दल खूप वाईट वाटते. मला तीनदा पाकिस्तान जाण्याची संधी मिळाली. तेथील लोक आणि माध्यमांशी बोलायला मिळाले. आताही परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांशी भेटीगाठी, बोलणे होत असते. पाकिस्तानमध्ये परिस्थिती इतकी वाईट का आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. मूळचे पाकिस्तानी लोक जे दु:ख व्यक्त करतात ते अंगावर काटा आणणारे असते. अगदी अलीकडे मी कॅनडात ज्या मोटारीने प्रवास करत होतो, तिचा मालक वसीम अहमद याची वेदना अगदी वेगळी होती. तो अहमदिया होता. मिर्झा गुलाम अहमद यांनी १८८९ मध्ये पंजाबमधील गुरूदासपूर जिल्ह्याच्या कादियानमध्ये या समाजाची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या वेळी बहुतेक अहमदिया पाकिस्तानात गेले. परंतु, त्यांच्याशी खूप वाईट व्यवहार झाला. झुल्फीकार अली भुत्तो पाकिस्तानचे प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांनी अहमदिया समाजाला मुसलमान मानले जाणार नाही, असा ठराव संसदेत केला. अहमदिया न्यायालयात गेले; परंतु अशाच प्रकारचे फर्मान हुकुमशहा झिया -उल- हक यांनी काढले. आता या अहमदियांना पाकिस्तानात मशिदीत नमाज पढण्याची परवानगी नाही. तसेच त्यांना मतदानाचा अधिकारही नाही. हजारो लोक तुरुंगात डांबले गेले. खैबर पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी तर मुल्लांनी जणू अहमदिया समाजाचा नरसंहार केला आहे. तिथे एकेकाळी ४० हजार अहमदिया होते. आता केवळ ९०० राहिले आहेत. कुठे गेले या समाजाचे लोक? त्यांचे धर्मगुरू मसरूर अहमद निर्वासित होऊन लंडनमध्ये राहात आहेत. त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
या समाजाचे घोषवाक्य फार चांगले आहे. ‘सर्वांप्रति प्रेम, कोणावर राग नाही...’ परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या समाजाबद्दल पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात इतका द्वेष भरलेला आहे की, देशाला पहिले विज्ञान क्षेत्रातले एकमेव नोबेल मिळवून देणारे प्राध्यापक अब्दुल सलाम यांचे नावही पुसून टाकले गेले. कारण ते अहमदिया होते. पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चनांवर होत असलेले अत्याचार सर्वांना ठाऊक आहेत. सध्या पाकिस्तान तीन तुकड्यांत विभागला गेलेला दिसतो. एका बाजूला सैन्य आणि आयएसआय यांनी देशावर कब्जा केलेला आहे. दुसरीकडे डरपोक आणि चापलूस नेते आहेत. दगाबाजी दोघांच्याही रक्तात आहे. तिसऱ्या बाजूला दुर्दैवी जनता आहे. या देशाला विकाऊ माल होऊ देण्यापासून लांब ठेवण्यासाठी जनतेने कितीही प्रयत्न केले तरीही सैन्य ते होऊ देत नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पण काय करणार, पाकिस्तानचे नशीब तूर्त तरी असे आहे. खुदा त्याचे भले करो!