शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

विकासाआडची विषमता; अर्थकारणाची प्रगती दोन्ही बाजूंचे वास्तव दाखवत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:45 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार चार ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकत जगात चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. अनेक अडचणींवर मात करत महासत्तांच्या स्पर्धेत हा बहुमान मिळवला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हेच देश आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार चार ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालाचा आधार घेत नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती जाहीर केली. वास्तविक आर्थिक अडचणींमुळे जपानची अर्थव्यवस्था आकुंचन पावली आणि त्यामुळे भारताने त्या देशाला मागे टाकले, हे त्यामागचे एक कारण आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान सुमारे ४१८७ अब्ज डॉलर्सचे, तर त्यामानाने किरकोळ लोकसंख्येच्या जपानमधील अर्थव्यवस्थेचे आकारमान ४१८६ अब्ज डॉलर्सचे आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. शिवाय दरडोई उत्पन्नामध्ये भारत १९४ देशांमध्ये १४१ व्या क्रमांकावर आहे. जपानचे दरडोई उत्पन्न (अंदाजे २८,९२,४१३ रुपये) भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा (अंदाजे २,४५,२९३ रुपये) कैक पटीने जास्त आहे. त्यामुळे आपल्यापुढे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे आव्हान मोठे आहे.

नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार दरडोई उत्पन्नात भारताची प्रगती होत असेल आणि ती पुढच्या काही वर्षात आश्वासक असेल तर ही गोष्ट काहीअंशी आशादायक आहे. पुढील दोन वर्षे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील, असा अंदाज जागतिक बँक आणि आयएमएफने व्यक्त केला आहे. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. त्यासाठी कृषी, सेवा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासास धोरणात्मक प्राधान्य मिळायला हवे. निर्मिती क्षेत्राच्या बाबतीत भारत हा पर्यायी देश बनत चालला आहे, परंतु त्याआधारे आपली बाजारपेठ बळकट करून तिचा उपयोग जागतिक स्पर्धेमध्ये आपले स्थान उंचावण्यासाठी करून घेतला पाहिजे. 

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यात आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले आयात शुल्काचे अडथळे पार करण्यात भारताने यश मिळवले आहे. मात्र उत्पादकता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना कामगारांसाठी नोकऱ्याही निर्माण करणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे बाहेरची मागणी मंदावली आहे, तर देशांतर्गत मागणीही पूर्णपणे रूळावर आलेली नाही. अर्थव्यवस्थेच्या जलद वाढीसाठी हा अडसर कायम आहे. असे धक्के आले नाहीत तर बचत आणि गुंतवणुकीच्या पातळीवर पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची क्षमता आहे. मात्र त्याकरिता अधिक संरचनात्मक बदलांची आवश्यकता आहे.

ट्रम्प यांच्या अडथळ्यांमुळे भारतासारख्या देशांना आत्मनिर्भरतेची संधी निर्माण झाली, आर्थिक विकासाला दिशा देण्याचा मार्ग गवसला, हा सकारात्मक विचार देशभरातील प्रत्येकात रुजवण्याची जबाबदारी सरकारची आहे. देशांतर्गत आर्थिक सुधारणा तसेच इतर देशांकडून भारताला दिले जात असलेले झुकते माप यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. विकासाची हीच गती कायम राहिली तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावरील जर्मनीला मागे टाकू शकतो, असेही सांगितले जाते. देशवासीयांच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी अशा भाकितांचा उपयोग करून घेण्यात येेतो. अर्थात सक्षम, प्रशिक्षित आणि तरुणवर्गाचा जर्मनीत मोठा तुटवडा आहे. त्याचा परिणाम काहीअंशी तेथील अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्याउलट तरुणांची सर्वाधिक संख्या भारतात असल्याने त्याचा फायदा मिळणार आहे. शिवाय आपली अर्थव्यवस्था वाढत असताना जर्मनी स्थिर राहत असेल किंवा एक-दोन टक्क्याने वाढत असेल तर तोही फायदा भारताला होणार आहे. 

कृषी, आरोग्य, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, वाहतूक, दळणवळण, अन्नप्रक्रिया या क्षेत्रांच्या माध्यमातून उत्पादन आणि निर्यातीत भारत मोठी मजल मारू शकतो. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा वाटा वाढवायला हवा. विकसित भारताचे स्वप्न पाहण्याआधी अर्थव्यवस्थेत जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर असणारा देश लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे सत्य मान्य करावे लागेल. कारण स्थूल अर्थकारणाची गुदगुल्या करणारी प्रगती नाण्याच्या दोन्ही बाजूंचे वास्तव दाखवत नाही. विकासाच्या सोबतीने वाढणारी विषमता नेहमीच झाकोळली जाते. 

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था