शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

...की यापेक्षा काहीतरी वेगळे सरकारच्या मनात आहे; घुमटाखाली दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष परिषदेवेळी शिरस्त्याप्रमाणे इंग्रजीतला ‘इंडिया’ हा शब्द न वापरता ‘भारत’ असा उल्लेख केला. त्यासंदर्भात काहीतरी विशेष अधिवेशनात होईल, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

म्हटले तर घटना समितीपासून गेली ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचा आढावा घेणारी गंभीर चर्चा आणि म्हटले तर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवरील कमी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. ते पाच दिवस चालेल. त्यातील पहिल्या दिवसाचे कामकाज संसदेच्या ९६ वर्षे जुन्या इमारतीत चालेल दुसऱ्या दिवसापासून नव्या इमारतीत काम सुरू होईल. तथापि, विरोधकांचा कयास आहे की यापेक्षा काहीतरी वेगळे सरकारच्या मनात आहे. म्हणूनच हे अधिवेशन बोलावण्यासंदर्भात विरोधकांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नाही. स्पष्ट, पटण्याजोगी कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली नाही.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात हा मुद्दा अधिक विस्ताराने मांडला आणि विशेष अधिवेशनात ९ प्रमुख मुद्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. सत्ताधारी मंडळींनी त्या पत्राची सुरुवातीला फारशी दखल घेतली नाही. परंतु, विरोधाचा स्वर अधिक मोठा होऊ नये म्हणून संसदीय प्रवास व मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया हे दोन जुजबी मुद्दे अधिवेशन सुरू होण्याच्या पाच दिवस आधी राज्यसभा व लोकसभा सचिवालयाने जाहीर केले. धक्कातंत्र हे केंद्र सरकारच्या गेल्या ९ वर्षांतील कारभाराचे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. नोव्हेंबर २०१६ मधील नोटाबंदी ते जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचा निर्णय, त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन असे निर्णय राजकीय पक्षांच्या ध्यानीमनी नसताना घेण्यात आले. हे लक्षात घेतले तर सरकारच्या पोतडीत काय आहे, यावर अनेक अंदाज बांधले जात आहेत. त्यापैकी पहिला अंदाज ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या रूपाने समोर आला. तथापि, त्यासाठी गठित केलेली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीची पहिली बैठक विशेष अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे या विषयावर तोवर प्रत्यक्ष दोन्ही सभागृहांमध्ये फार काही होणार नाही.

जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आधी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी देशी-विदेशी पाहुण्यांना पाठविलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणात आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष परिषदेवेळी शिरस्त्याप्रमाणे इंग्रजीतला ‘इंडिया’ हा शब्द न वापरता ‘भारत’ असा उल्लेख केला. त्यासंदर्भात काहीतरी विशेष अधिवेशनात होईल, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय समान नागरी कायदा वगैरे अनेक विषय चर्चेत आहेत. परंतु, अशा कोणत्याही विषयासंदर्भात काहीही स्पष्ट संकेत सरकारकडून मिळत नाहीत. त्यामुळे विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याचे गूढ कायम आहे. राहिला प्रश्न संसदेच्या नव्या इमारतीत प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचा तर गेल्या २८ मे रोजी पंतप्रधानांनी नव्या इमारतीचे उद्घाटन केले असल्याने नव्या घरात देशाच्या लोकशाहीचा प्रत्यक्ष संसार सुरू करण्याची अधिक चांगली संधी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनावेळी सरकारला होती. आता जुन्या इमारतीला रामराम नक्की ठाेकला जाईल, असे दिसते.

ब्रिटिश राजवटीत सर हर्बर्ट बेकर व सर एडविन ल्युटेन्स यांनी बांधलेल्या तेव्हाच्या इंपेरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या या इमारतीचे उद्घाटन जानेवारी १९२७ मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केले होते. क्रिकेटच्या भाषेत ही इमारत नर्व्हस नाइन्टिजमध्ये आहे. शतक पूर्ण करण्यास चार वर्षे शिल्लक आहेत. अशावेळी नवी, आधुनिक, झालेच तर ब्रिटिश वसाहतीच्या खाणाखुणा पुसणारी इमारत जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे नवे मंदिर बनणार आहे. तथापि, सामान्य लोकशाहीप्रेमी, प्रजासत्ताकप्रिय भारतीयांना खंत याचीच आहे की, या मंदिराच्या कळसारोहणापासून ते आता त्याच्या गाभाऱ्यात लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत सत्ताधारी व विरोधकांमधील बेबनाव अनुभवास येत आहे. सामान्य जनतेची भावना हीच आहे की, सत्तेत असो की विरोधी बाकांवर, आपण सगळे जनतेचे सेवक आहोत, ही भावना ठेवून दोन्ही बाजूंनी ही कटुता कमी करण्याचे प्रयत्न व्हावेत. वैयक्तिक हेवेदावे व शत्रुत्व बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांवर या मंदिरात चर्चा व्हावी. देशवासीयांच्या आयुष्यात आनंदाचे, सुखाच्या चार क्षणांची पखरण व्हावी. तसे झाले तर हा विविधतेने नटलेला आणि तरीही एकात्म, एकसंध असा हा सुंदर देश खऱ्या अर्थाने ‘सारे जहां से अच्छा...’ बनेल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस