शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मुस्लिमांनी संस्कृत शिकलेलं चालतं, मग शिकवलेलं का चालत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:33 IST

मुस्लिमांनी संस्कृत शिकलेले चालते, पण शिकविलेले चालत नाही ही अकलेची दिवाळखोरी आहे. निवडणुकांत भरघोस यश मिळाल्याने या मंडळींना ‘हिंदू राष्ट्रा’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पण ते अशा क्षुद्र आणि भिक्कार विचारांच्या पायावर असेल तर कसे चालेल?

केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात एका मुस्लिमाला संस्कृतचा प्राध्यापक नेमले जाण्यावरून तेथील विद्यार्थ्यांचे आंदोलन भारताला लाज आणणारे आहे. गेल्या काही वर्षांत हिंदुत्ववाद्यांनी सत्ताकारण व प्रशासनावर पगडा बसविला आहेच. पण त्यांनी आता विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रातही नादानपणा सुरू करावा, ही घोर चिंतेची बाब आहे. संस्कृतमध्ये डॉक्टरेट मिळविलेल्या फिरोज खान या तरुणाची १० अर्जदारांमधून संस्कृत विद्याधर्म विज्ञान विभागाच्या साहित्य शाखेत साहाय्यक प्राध्यापकपदी गुणवत्तेवर निवड झाली. एका मुस्लिमाने आपल्याला देववाणी संस्कृत शिकवावी यास विरोध करून तेथील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उघड आंदोलन सुरू केले. याला संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची फूस आहे, हे लपून राहिलेले नाही.

नाही म्हणायला विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर यांनी फिरोज खान यांचे समर्थन केले असले तरी बेशिस्त, वाह्यात विद्यार्थ्यांना ते वठणीवर आणू शकलेले नाहीत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय या वादात गप्प आहे, हे कदाचित त्याचे कारण असावे. बिच्चारे फिरोज खान, जीवाच्या भीतीने, मोबाइल फोनही बंद करून, मूळ गावी निघून गेले आहेत. विद्यार्थी वर्ग घेऊ देत नाहीत आणि विद्यापीठ प्रशासनही ‘तुम्ही व्हा पुढे, आम्ही पाहतो कोण अडवते ते,’ अशी खंबीर भूमिका घेत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपला अध्यापक कोण असावा, कोणत्या धर्माचा असावा, हे विद्यार्थ्यांनी ठरवणे ही तद्दन मुजोरी आहे.
मुस्लिमांनी संस्कृत शिकलेले चालते, पण शिकविलेले चालत नाही ही अकलेची दिवाळखोरी आहे. याच हिंदुत्ववाद्यांनी राजस्थानमध्ये सरकारी संस्कृत विद्यालये सुरू केली. त्यात बहुसंख्य विद्यार्थी मुस्लीम असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. संस्कृत भाषा ही कोणाही एका समाजवर्गाची किंवा धर्माची मक्तेदारी नाही. अभिजात संस्कृत साहित्य हा अभिमानास्पद जागतिक वारसा आहे. उद्या कोणी हिंदू वैदिक पौरोहित्य सेवा पुरविणारी कंपनी काढली व त्यात एखादा मुस्लीम ‘भटजी’ नोकरीवर ठेवला किंवा सरकारी देवस्थान असलेल्या पंढरपूर किंवा सिद्धिविनायक मंदिरात मुस्लीम पुजारी नेमला तर हिंदू धर्माचा विटाळ झाला, अशी ओरड रास्त ठरेल का?
जर्मन कवी गटे कालिदासाचे अभिजात शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचल्याचा टेंभा मिरविणारे हेच धर्म आणि संस्कृतीरक्षक मॅक्समुुलर या संस्कृत विद्वानाचा ‘पं. मोक्षमुल्लर’ म्हणून गौरव करतात. पूर्वी याच कर्मठ मंडळींनी संस्कृत ही फक्त ब्राह्मणांनी शिकण्याची भाषा आहे, असा माज केला होता. आपल्याकडे ज्ञानेश्वर माउलींना सुबोध भाषेत ज्ञानेश्वरी कथन करण्याची गरज त्यामुळेच भासली. संस्कृतचे शुद्ध उच्चार करता येत नाहीत त्यांना ‘म्लेच्छ’ म्हणून हिणवणे, याच काळात सुरू झाले. पुढे हा शब्द फक्त मुस्लिमांना वापरण्याची विकृती आली. मुघलांच्या काळात जीवाच्या भीतीने किंवा मानमरातबाच्या लालसेने औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याला संस्कृत शिकविण्यासाठी काशीच्या पंडितांमध्ये चढाओढ लागल्याचे दाखले इतिहासात मिळतात. या दाराने ५२ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केल्याने संस्कृत विटाळली नाही की हिंदू धर्म बाटला नाही.
ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यावरही अनेक पंडित सोवळे नेसून साहेबाला संस्कृत शिकवायला त्याच्या घरी जात असत. अनेक ब्रिटिश अभ्यासकांनी संस्कृत-इंग्रजी शब्दकोष प्रसिद्ध केले. ब्रिटिशांनी तर संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. पोटभरू संस्कृत शिक्षक तेथे रुजू झाले. हा सर्व पूर्वेतिहास पाहता आता बनारस हिंदू विद्यापीठातील निंद्य प्रकारामागे धर्म हेच एकमेव कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाल्याने या मंडळींना ‘हिंदू राष्ट्रा’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पण त्यांच्या कल्पनेतील ‘हिंदू राष्ट्र’ अशा क्षुद्र व भिक्कार विचारांच्या पायावर उभे राहणार असेल तर अशा कलुषित ‘हिंदू राष्ट्रा’त भारतमाताही नांदायला तयार होणार नाही!