शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ही नक्की ‘क्रांती’ आहे की, केवळ ‘भ्रांती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 07:51 IST

भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा अंत हा नेपाळी लोकशाहीचाच अंत तर ठरणार नाही ना? - प्रश्न कठीण आहे. या क्रांतीमुळे लगोलग भारावून जाणे उतावीळपणाचे ठरेल.

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

भोवती  अंधारच इतका दाटलाय की, चुकून कुठं एखादा किरण दिसला की, आपण धावत सुटतो. एखादी मिणमिणती पणती असो किंवा काजव्यांची चमचम, अगदी विध्वंसक  ठिणगीसुद्धा मोहवते. दुरून दिसणाऱ्या कोणत्याही प्रकाशशलाकेवर क्षीण आशांचा हिंदोळा टांगायला आपण आतुर असतो. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तापालटाबाबत  काहीसं असंच झालं. एकेकाळी आपण नेपाळला आतून ओळखत होतो. हल्ली केवळ दुरून दिसणाऱ्या प्रतिमेवर विसंबून आहोत. टीव्हीवर, समाजमाध्यमांत ‘ जेन-झी’चे काही तरुण चेहरे दिसले, राजकीय व्यवस्थेविरुद्धचा संताप दिसला आणि लगेच सत्तापरिवर्तन झाल्याची बातमी येऊन थडकली. तिलाच ‘क्रांती’ मानून आपण भारावून गेलो.

कोमेजत्या आशांचे जड झालेले ओझे उतावीळपणे हलके करण्याच्या  नादात काही साधे प्रश्न विचारायचे आपल्या ध्यानातच आले नाही : हे ‘जेन झी’ आहेत तरी कोण? नेपाळच्या राजधानीत गोळा झालेले हे शहरी तरुण संपूर्ण देशातल्या नव्या पिढीचे कितपत प्रतिनिधित्व करतात? एखाद्या देशाची सत्ता केवळ चाळीस मिनिटांत कशी काय कोसळू शकते? ८ सप्टेंबरच्या गोळीबारानंतर लगेच  दुसऱ्या दिवशी झालेल्या हिंसेमागे कोण होते? या प्रकरणात नेपाळी सेनेची आणि पार्श्वभूमीवरील पदच्युत राजाची भूमिका काय होती? हे काही  किरकोळ किंवा निव्वळ तपशिलाबाबतचे  प्रश्न नाहीत. त्यांची उत्तरे मिळाल्याशिवाय या सत्तापालटाचे योग्य मूल्यमापन करता येणार नाही.  ही ‘क्रांती’ आहे की ‘भ्रांती’?  हे आपणास आज तरी ठामपणे सांगता येणे शक्य नाही.

नेपाळ बऱ्याच वर्षांपासून खूपच कठीण परिस्थितीतून  जात आहे. जनतेने एकदाच नव्हे, तर दोनदा क्रांती केली, दोन्ही वेळा तिची फसवणूक झाली. १९९० मध्ये राणा राजवटीविरुद्ध बंड झाले; पण जुनीच राजेशाही जनतेच्या वाट्याला आली. २००८ मध्ये राजेशाही संपुष्टात येऊन एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही नेपाळ अस्तित्वात आला; परंतु राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी त्या लोकचळवळीमागील भावना पायाखाली तुडवली. बाल्यावस्थेतील लोकशाहीचे  नीट पालनपोषण झाले नाही. सत्तेच्या खेचाखेचीत सर्वच पक्षांनी सगळे नियम, कायदे आणि संकेत धाब्यावर बसवले. आलटून पालटून तीच  दोनचार माणसे पुनःपुन्हा पंतप्रधानपद भूषवू लागली.

त्यावर कहर म्हणजे भ्रष्टाचार. यात एकही पक्ष  धुतल्या तांदळाचा नव्हता. डाव्या आंदोलनासारख्या वैचारिक पार्श्वभूमीतून आलेल्या नेत्यांचे  सहजासहजी नैतिक पतन होत नाही. नेपाळमध्ये तेही झाले.  बेकारी वाढली. नेत्यांची आणि त्यांच्या पोराटोरांची ऐषोआरामी राहणी युवकांच्या डोळ्यांना खुपू लागली. न्यायव्यवस्थेसह सर्व नियंत्रक संस्था एकतर अपयशी झाल्या किंवा स्वतःच भ्रष्टाचारात सामील झाल्या. लोकशाही शासनाला पुरती  वीस वर्षेही उलटली नसताना संपूर्ण राजकीय व्यवस्थेने आपली विश्वासार्हता गमावली.

अशा परिस्थितीत तरुणांचे अनावर होणे समजू शकते; परंतु याची तुलना श्रीलंका किंवा बांगला देशात झालेल्या सत्तापरिवर्तनाशी करणे घाईचे ठरेल. श्रीलंकेतील लोकचळवळ कित्येक महिने चालू होती. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचे बळी असलेल्या गरीब आणि वंचित तरुणांना एका वैचारिक आंदोलनाची  पार्श्वभूमी होती. बांगला देशातील सत्तापालट हा नेपाळप्रमाणेच नाट्यपूर्ण होता; परंतु त्या विद्रोहाची मुळे बांगला देशाच्या गावागावांत पोहोचली  होती. बांगला देशातील सत्तापालटामागे जातीयवादी शक्ती होत्या; परंतु तिथेही लोक मोठ्या संख्येने विद्रोहात सामील होते हे निःसंशय.

नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या झेंड्याखाली गोळा झालेल्या तरुणांची न कुठली संघटना न वैचारिक धारणा. ही लोकचळवळ कशी? या साऱ्या संतापाचा स्फोट काठमांडू खोऱ्यापुरताच मर्यादित होता. ओली सरकारने तरुणांवर गोळीबार केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे हिंसेचे तांडव सुरू झाले त्यात ‘जेन-झी’च्या मोहिमेचे नेतृत्व अगतिक झालेले दिसले. या प्रक्रियेचा वेग  पाहता या सत्तापालटामागे काही अदृश्य शक्तींचा हात असल्याचा संशय येतो. नव्या पंतप्रधान सुशीला कारकी भ्रष्टाचाराविरोधात स्पष्ट आवाज उठवत आल्या आहेत  यात शंका नाही; परंतु या विद्रोहातील अन्य नेत्यांविषयी असे म्हणता येणे कठीण आहे.

नेपाळची राजकीय व्यवस्था तडकाफडकी कोलमडून पडली आहे. त्यामुळे नेपाळी लष्कर, पदच्युत राजा आणि परकीय शक्ती  या आंदोलनाबाहेरील शक्तींच्या यामागील  भूमिका तपासून पाहायला हव्यात. आजवर नेपाळी लष्कराने तेथील राजकारणात कधीच महत्त्वाची किंवा घातक भूमिका घेतलेली नाही; परंतु या प्रकरणात लष्करावर  जबाबदारी येताच  त्यांनी राष्ट्रपतींवर दबाव टाकला. हा काही शुभसंकेत नाही. पदच्युत राजे ज्ञानेंद्र आपल्या परतीची शक्यता सतत आजमावून पाहत होते हे उघड गुपित आहे. शेजाऱ्यांना आणि महाशक्तींना तर  या छोट्याशा डोंगराळ देशात नेहमीच रस असतो.

भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा अंत हा नेपाळी लोकशाहीचाच अंत तर ठरणार नाही ना?- प्रश्न कठीण आहे. या क्रांतीमुळे लगोलग भारावून जाणे उतावीळपणाचे ठरेल.

टॅग्स :Nepalनेपाळ