शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ही नक्की ‘क्रांती’ आहे की, केवळ ‘भ्रांती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 07:51 IST

भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा अंत हा नेपाळी लोकशाहीचाच अंत तर ठरणार नाही ना? - प्रश्न कठीण आहे. या क्रांतीमुळे लगोलग भारावून जाणे उतावीळपणाचे ठरेल.

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

भोवती  अंधारच इतका दाटलाय की, चुकून कुठं एखादा किरण दिसला की, आपण धावत सुटतो. एखादी मिणमिणती पणती असो किंवा काजव्यांची चमचम, अगदी विध्वंसक  ठिणगीसुद्धा मोहवते. दुरून दिसणाऱ्या कोणत्याही प्रकाशशलाकेवर क्षीण आशांचा हिंदोळा टांगायला आपण आतुर असतो. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तापालटाबाबत  काहीसं असंच झालं. एकेकाळी आपण नेपाळला आतून ओळखत होतो. हल्ली केवळ दुरून दिसणाऱ्या प्रतिमेवर विसंबून आहोत. टीव्हीवर, समाजमाध्यमांत ‘ जेन-झी’चे काही तरुण चेहरे दिसले, राजकीय व्यवस्थेविरुद्धचा संताप दिसला आणि लगेच सत्तापरिवर्तन झाल्याची बातमी येऊन थडकली. तिलाच ‘क्रांती’ मानून आपण भारावून गेलो.

कोमेजत्या आशांचे जड झालेले ओझे उतावीळपणे हलके करण्याच्या  नादात काही साधे प्रश्न विचारायचे आपल्या ध्यानातच आले नाही : हे ‘जेन झी’ आहेत तरी कोण? नेपाळच्या राजधानीत गोळा झालेले हे शहरी तरुण संपूर्ण देशातल्या नव्या पिढीचे कितपत प्रतिनिधित्व करतात? एखाद्या देशाची सत्ता केवळ चाळीस मिनिटांत कशी काय कोसळू शकते? ८ सप्टेंबरच्या गोळीबारानंतर लगेच  दुसऱ्या दिवशी झालेल्या हिंसेमागे कोण होते? या प्रकरणात नेपाळी सेनेची आणि पार्श्वभूमीवरील पदच्युत राजाची भूमिका काय होती? हे काही  किरकोळ किंवा निव्वळ तपशिलाबाबतचे  प्रश्न नाहीत. त्यांची उत्तरे मिळाल्याशिवाय या सत्तापालटाचे योग्य मूल्यमापन करता येणार नाही.  ही ‘क्रांती’ आहे की ‘भ्रांती’?  हे आपणास आज तरी ठामपणे सांगता येणे शक्य नाही.

नेपाळ बऱ्याच वर्षांपासून खूपच कठीण परिस्थितीतून  जात आहे. जनतेने एकदाच नव्हे, तर दोनदा क्रांती केली, दोन्ही वेळा तिची फसवणूक झाली. १९९० मध्ये राणा राजवटीविरुद्ध बंड झाले; पण जुनीच राजेशाही जनतेच्या वाट्याला आली. २००८ मध्ये राजेशाही संपुष्टात येऊन एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही नेपाळ अस्तित्वात आला; परंतु राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी त्या लोकचळवळीमागील भावना पायाखाली तुडवली. बाल्यावस्थेतील लोकशाहीचे  नीट पालनपोषण झाले नाही. सत्तेच्या खेचाखेचीत सर्वच पक्षांनी सगळे नियम, कायदे आणि संकेत धाब्यावर बसवले. आलटून पालटून तीच  दोनचार माणसे पुनःपुन्हा पंतप्रधानपद भूषवू लागली.

त्यावर कहर म्हणजे भ्रष्टाचार. यात एकही पक्ष  धुतल्या तांदळाचा नव्हता. डाव्या आंदोलनासारख्या वैचारिक पार्श्वभूमीतून आलेल्या नेत्यांचे  सहजासहजी नैतिक पतन होत नाही. नेपाळमध्ये तेही झाले.  बेकारी वाढली. नेत्यांची आणि त्यांच्या पोराटोरांची ऐषोआरामी राहणी युवकांच्या डोळ्यांना खुपू लागली. न्यायव्यवस्थेसह सर्व नियंत्रक संस्था एकतर अपयशी झाल्या किंवा स्वतःच भ्रष्टाचारात सामील झाल्या. लोकशाही शासनाला पुरती  वीस वर्षेही उलटली नसताना संपूर्ण राजकीय व्यवस्थेने आपली विश्वासार्हता गमावली.

अशा परिस्थितीत तरुणांचे अनावर होणे समजू शकते; परंतु याची तुलना श्रीलंका किंवा बांगला देशात झालेल्या सत्तापरिवर्तनाशी करणे घाईचे ठरेल. श्रीलंकेतील लोकचळवळ कित्येक महिने चालू होती. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचे बळी असलेल्या गरीब आणि वंचित तरुणांना एका वैचारिक आंदोलनाची  पार्श्वभूमी होती. बांगला देशातील सत्तापालट हा नेपाळप्रमाणेच नाट्यपूर्ण होता; परंतु त्या विद्रोहाची मुळे बांगला देशाच्या गावागावांत पोहोचली  होती. बांगला देशातील सत्तापालटामागे जातीयवादी शक्ती होत्या; परंतु तिथेही लोक मोठ्या संख्येने विद्रोहात सामील होते हे निःसंशय.

नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या झेंड्याखाली गोळा झालेल्या तरुणांची न कुठली संघटना न वैचारिक धारणा. ही लोकचळवळ कशी? या साऱ्या संतापाचा स्फोट काठमांडू खोऱ्यापुरताच मर्यादित होता. ओली सरकारने तरुणांवर गोळीबार केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे हिंसेचे तांडव सुरू झाले त्यात ‘जेन-झी’च्या मोहिमेचे नेतृत्व अगतिक झालेले दिसले. या प्रक्रियेचा वेग  पाहता या सत्तापालटामागे काही अदृश्य शक्तींचा हात असल्याचा संशय येतो. नव्या पंतप्रधान सुशीला कारकी भ्रष्टाचाराविरोधात स्पष्ट आवाज उठवत आल्या आहेत  यात शंका नाही; परंतु या विद्रोहातील अन्य नेत्यांविषयी असे म्हणता येणे कठीण आहे.

नेपाळची राजकीय व्यवस्था तडकाफडकी कोलमडून पडली आहे. त्यामुळे नेपाळी लष्कर, पदच्युत राजा आणि परकीय शक्ती  या आंदोलनाबाहेरील शक्तींच्या यामागील  भूमिका तपासून पाहायला हव्यात. आजवर नेपाळी लष्कराने तेथील राजकारणात कधीच महत्त्वाची किंवा घातक भूमिका घेतलेली नाही; परंतु या प्रकरणात लष्करावर  जबाबदारी येताच  त्यांनी राष्ट्रपतींवर दबाव टाकला. हा काही शुभसंकेत नाही. पदच्युत राजे ज्ञानेंद्र आपल्या परतीची शक्यता सतत आजमावून पाहत होते हे उघड गुपित आहे. शेजाऱ्यांना आणि महाशक्तींना तर  या छोट्याशा डोंगराळ देशात नेहमीच रस असतो.

भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा अंत हा नेपाळी लोकशाहीचाच अंत तर ठरणार नाही ना?- प्रश्न कठीण आहे. या क्रांतीमुळे लगोलग भारावून जाणे उतावीळपणाचे ठरेल.

टॅग्स :Nepalनेपाळ