शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दत्ता ऊर्फ अप्पा गांधी: ब्रिटिश ट्रेझरीवर तिरंगा फडविण्यासाठी ‘सावित्री’च्या महापुरात उडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 06:46 IST

Dutta aka Appa Gandhi: ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्या

- माधवी पाटील(उपसंपादक, लोकमत, मुंबई) वयाची शंभरी गाठलेले विलेपार्ल्याचे दत्ता गांधी आजही खणखणीतपणे सांगतात नव्या पिढीला प्रेरक असा १९४२च्या भारत छोडो आंदोलनातील मंतरलेल्या दिवसांचा इतिहास! स्वातंत्र्य लढ्याच्या त्या धगधगत्या पर्वाच्या आठवणीत शिरलेल्या अप्पांना अजूनही लख्खपणे आठवते ती ९ ऑगस्ट १९४२ ची तुफान पावसाची रात्र !... पुराने बेफाम वाहणाऱ्या सावित्रीच्या काठावरील महाडची निद्रिस्त बाजारपेठ!  मामांच्या घरी झोपलेल्या दत्तूला त्याच्या राष्ट्रसेवा दलातील मित्राची कमलाकर दांडेकरची हाक ऐकू आली. त्याने अप्पांना घराबाहेर काढले. आठ तारखेला गांधीजींनी ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा दिला होता, भारत छोडो! त्यांच्या ‘करेंगे या मरेंगे!’ या शब्दांनी लाखो तरुणांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले होते. त्यापैकीच एक होते पोलादपूरला १५ मे १९२३ ला जन्मलेले अप्पा ऊर्फ दत्तात्रेय गोपीनाथ गांधी. महाडमध्ये मामांकडे शिकायला राहिलेल्या अप्पांनी कमलाकर व अन्य दोस्तांच्या मदतीने शाळा सकाळीच बंद पाडली होती. देशभर मोठ्या नेत्यांची धरपकड झाली होती. इकडे  महाडमध्ये नाना पुरोहितांच्या गोटात काही कट शिजत होता. पोलीस फाटा वाढेल, हे समजताच रणनीती आखण्याच्या विचारात अप्पा होते; पण कमलाकरचे रक्त उसळत होते. ‘आपण पल्याडच्या काठावरील ब्रिटिश ट्रेजरीवर तिरंगा लावायचा,’ - कमलाकर म्हणाला, पण पोलिसांचा कडक पहारा होता. दोघांच्या अंगात रग आणि मनात स्वातंत्र्याची धग होती. त्यातूनच त्यांनी पुरात उड्या घेतल्या! दुथडी भरून वाहणाऱ्या सावित्रीच्या प्रवाहात उलट दिशेने पोहत पाच मिनिटांच्या अंतरावरील पैलतीर गाठायला पाऊण तास लागला. पोलिसांची नजर चुकवून मोठ्या शिताफीने त्यांनी ट्रेझरीची पिछाडी गाठली. कमलाकरने चपळाईने वर चढत कौलांच्या बेचक्यात मध्यरात्री तिरंगा रोवला. ‘वंदे मातरम्’चा नारा पावसात विरतो तोच दोघांनी सावित्रीच्या पाण्यात परत सूर मारला. वेगाने अंतर कापत दोघे ऐलतीरावरील जाखमातेच्या मंदिरात पोहोचले. कमलाकरने चटदिशी खिशातून चाकू काढला आणि करंगळीवर मारला. रक्ताची चिळकांडी उडाली. त्याच रक्ताने दोघांनी कागदावर प्रतिज्ञा लिहिली, ‘देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’ - त्याच रात्री अप्पांनी मामींना चिठ्ठी लिहिली आणि माणगावजवळील खरवली गाव गाठलं. मोठे बंधू शंकर भाईंच्या भूमिगत गटात ते सामील झाले. अप्पांचे वडील पोलादपुरातील काँग्रेसचे नेते  आणि मोठे बंधू शंकरभाई मिठाचा सत्याग्रह करून दंडाबेडीचा कारावास भोगून आले होते. महाडमध्ये एका सभेत डॉ. आंबेडकरांनी ‘खूप वाच म्हणजे दलितांचे प्रश्न तुला कळतील,’ असे सांगितले होते.१० सप्टेंबरला महाडला नानासाहेब पुरोहित मोर्चा काढणार होते, तिथे पोलिसांची कुमक पोहोचणार नाही, यासाठी पेण व माणगावपुढील महाडचा रस्ता अडवायचा होता. त्यांनी झाडे, तारायंत्राच्या तारा तोडल्या. घोड नदीचा पूल तोडण्यासाठी रस्त्याचे चिरे उखडताना नेमका विंचू हाताला डसला; पण भाईंच्या साथीदाराने दंश झालेल्या जागेच्या बरोबर वरती कोयत्याचा वार करून रक्त वाहू दिले. करकचून दोरखंड बांधला. अंगात ताप भरला होता. अप्पा तिथेच ग्लानी येऊन पडले. मोर्चा फसला. दुसऱ्या दिवशी महाडला चौकशी केली, तर कळले की, मांढरे फौजदाराने केलेल्या गोळीबारात अप्पांचे प्रिय मित्र कमलाकर दांडेकर शहीद झाले. विसापूरचा तुरुंगवास खडतर होता. ब्रिटिश जेलर क्रूर. अन्नात अळी, भाजीत गवत नाहीतर पाला ही नित्याची बाब. भूक हडताल होत असत. त्यावर वाट्याला येई लाठीचार्ज; पण तुरुंगात बौद्धिके होत. अप्पा तब्बल १९४ पुस्तके  वाचू शकले. जेलमधून सुटल्यावर अप्पा मेट्रिक तर झाले; पण अच्युतराव पटवर्धन यांनी त्यांना स. प. महाविद्यालयात जाऊन पुढे वकील बनण्याआधी कुलाबा जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाचा सर्व वेळ सेवक म्हणून काम करण्यास सांगितले.  १९४४ साली  गांधीजींना भेटण्याचा योग आला. त्यांचा संदेश शिरसावंद्य मानत अप्पांनी गावोगावी कार्य केले. सरदार वल्लभभाईंनी सांगितल्यानुसार सत्याग्रही झाले. १९४९ मध्ये साने गुरुजींनी स्वतः अप्पांचा अर्ज भरून त्यांना दादरच्या छबिलदास शाळेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले. १९५२ मध्ये ते किशोरी पुरंदरे ऊर्फ आशा गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्याही राष्ट्र सेवा दलाच्या  कार्यकर्त्या. वंचित समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी विविध संस्थांना गांधी दाम्पत्याने स्वत:च्या भरघोस रकमेसह नेटाने देणग्या मिळवून ९६.५ लाख रुपये गोळा करून दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अप्पांनाही स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन व इतर लाभ मिळाले असते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढा देणे हे माझे कर्तव्यच होते, असे म्हणत त्यांनी पेन्शन व ताम्रपटही नाकारला.

टॅग्स :Mumbaiमुंबई