शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 05:33 IST

औरंगाबादची घटना एका कुटुंबातली; पण एकमात्र नव्हे. जवळच्या नात्यांमध्ये पडत चाललेल्या अशा फटी; हे दुर्दशेचे चिन्ह होय

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, औरंगाबादपती-पत्नी दोघेही प्राध्यापक, दरमहा सहा आकडी पगार, महाविद्यालयात शिकणारी दोन मुलं, उच्चभ्रू वस्तीत आलिशान बंगला, महागडी चारचाकी वाहनं, सामाजिक - शैक्षणिक वर्तुळात वावर, उच्च मध्यमवर्गीय राहणीमान... वरवर पाहता कोणालाही हेवा वाटेल अशा कुटुंबात एकाएकी असे काय घडले? असा प्रश्न प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आठ दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर पोलिसांनी प्रा. शिंदे यांच्या हत्येचे गूढ उकलून एका अल्पवयीन मुलास (कायद्याच्या भाषेत, विधिसंघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेतले खरे, परंतु अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. राजन शिंदे यांची गेल्या सोमवारी राहत्या घरी हत्या झाली. प्रा. शिंदे यांच्या हत्येची वार्ता समजताच शहरभर खळबळ उडाली. प्रा. शिंदे हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक. सामाजिक, शैक्षणिक चळवळीत त्यांचा चांगला वावर होता. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असाच आरंभी सर्वांचा समज झाला होता. मात्र, सकृतदर्शनी हाती आलेले पुरावे आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या जबानीतून जी माहिती समोर आली, ती ऐकून पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. कारण, मारेकरी दुसरा - तिसरा कुणी नसून निकटवर्तीय अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. महाविद्यालयात नुकत्याच दाखल झालेल्या एका शाळकरी वयाच्या मुलाच्या हातून हे निर्घृण कृत्य घडले, यावर सहसा कोणाचा विश्वासच बसणार नाही. एखादा सराईत, अट्टल गुन्हेगारदेखील इतक्या निर्घृणपणे कृत्य करणार नाही, तितक्या थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) हे हत्याकांड त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या हातून घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हातून हे कृत्य कसे घडले, याचा छडा पोलिसांनी लावला आहे. पण का घडले? या प्रश्नाचे उत्तर अजून बाकी आहे. 

या हत्याकांडामागे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबीक नातेसंबंधाचे अनेक नाजूक पदर असल्याने हा गुंता वाटतो तितका सहज सुटणारा नाही. म्हणूनच, कदाचित कायद्याच्या पुस्तकातही या ‘का’चे उत्तर सापडणार नाही. नातेसंबंधाची वीण एकदा का उसवली, की त्यातून कौटुंबीक ताणतणाव वाढत जातो. त्यातून मग हत्या किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते, हे आजवरच्या अनेक घटनांमधून समोर आले आहे. आजकाल एकलकोंडी झालेली मुले सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत. कोरोनाकाळात तर सर्वांचीच घरकोंडी झाल्याने कुटुंबातील ताणतणाव विकोपाला गेले. एरवी समाजात उजळ माथ्याने वावरणाऱ्या अनेकांचा खरा ‘चेहरा’ याच काळात उघडा पडला. सोशल मीडियामुळे जगभरचे मित्र-मैत्रिणी जवळ आल्या. पण घरचे दुरावले. संवाद खुंटल्याने नातेसंबंध ताणले गेले. घरातील अशा विसंवादी वातावरणाचा मुलांच्या भावविश्वावर नकळत का होईना परिणाम होतच असतो. दुसरीकडे, संस्काराच्या नावाखाली मुलांवर सतत पाळत ठेवणे, त्यांच्या आवडी-निवडीकडे दुर्लक्ष करून विशिष्ट अभ्यासक्रमासाठी बळजबरी करणे, अभ्यासावरून मुलांना सतत टोमणे मारणे, हे सर्रास होताना दिसते. 
प्रा. शिंदे यांच्या हत्येप्रकरणी बाल न्याय मंडळाने निरीक्षणगृहात रवानगी केलेला विधिसंघर्षग्रस्त मुलगा अशाच कौटुंबीक ताणतणावाखाली होता आणि त्यातून त्याला ओटीटीवरच्या ‘क्राइम सिरीज’ पाहण्याचा छंद लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे असेल तर भयंकर आहे. कारण, हत्या कशी करावी, पुरावे कसे नष्ट करावेत, याचे जणू प्रशिक्षणच त्याने ओटीटीवरून मिळवले होते. मित्र नसल्याने आलेला एकलकोंडेपणा, दुरावलेले नातेसंबंध आणि ओटीटीचे व्यसन अशा चक्रातून त्याला बाहेर पडता न आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असेल का? ही घटना एका कुटुंबातली खरी; पण एकमात्र मात्र नव्हे. समाजासमोर आरसा धरण्याचे काम अशा घटना करत असतात, हे विसरता कामा नये. जवळच्या नात्यांमध्ये पडत चाललेल्या या अशा फटी; हे दुर्दशेचे चिन्ह होय.  कुटुुंब हीच खरी संपत्ती मानून प्रामाणिकपणे नाती जपली तर कोणावरच असा दुर्धर प्रसंग ओढवणार नाही. फक्त त्यासाठी, खासगी आयुष्याच्या विहिरीत साचलेला गाळ उपसावा लागेल. तो उपसण्याची किती जणांची तयारी आहे, हा या निमित्ताने उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे!