शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

निकषांचे तुणतुणे नको, टँकर्स सुरू करा!

By किरण अग्रवाल | Updated: June 25, 2023 07:00 IST

Water Scarcity : राज्याचे नेतृत्वकर्ते देवेंद्र फडणवीस यांनीच आता संबंधितांचे कान धरण्याची वेळ आली आहे.

- किरण अग्रवाल

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. परंतु, जिल्हा प्रशासन जागचे हलताना दिसत नाही. संबंधितांची ही सुस्ती उतरविण्यासाठी पालकाचा अधिकार असलेले, राज्याचे नेतृत्वकर्ते देवेंद्र फडणवीस यांनीच आता संबंधितांचे कान धरण्याची वेळ आली आहे.

 

ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना व तेथील लोकप्रतिनिधीही घसा ओरडून उपाययोजनांची मागणी करत असताना जिल्हा प्रशासन टंचाईच्या शासकीय निकषांचे तुणतुणेच वाजवणार असेल तर त्यातून यंत्रणांची बेफिकिरी, निर्ढावलेपणा व असंवेदनशीलताच उजागर व्हावी.

 

पाऊस लांबत चालल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली असून, यासंबंधी होत असलेल्या त्रासाबद्दलची सहनशीलताही संपू पाहत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याचेच प्रत्यंतर आले. ग्रामीण भागातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या ठिकाणची पाणीटंचाईची समस्या कळकळीने मांडली. डोळे मिटून बसलेल्या प्रशासनाला आरसा दाखविण्यासाठी ‘झळा पाणीटंचाईच्या’ वृत्त मालिकेने लोकमतने झळकविलेत, पण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या शासकीय मर्यादांच्या चाकोरीबाहेर पडून विचार करताना दिसत नाही. डोळ्यांवर निकषांची पट्टी बांधून ते धृतराष्ट्रासारखे बसले आहे हे दुर्दैवी आहे. पाणीटंचाईने बळी गेल्यावर ही यंत्रणा जागी होणार आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित होतो.

 

या एक-दोन दिवसात पावसाचे दोन-चार थेंब आलेत खरे, पण त्याला पावसाचे आगमन म्हणता येऊ नये. पावसाच्या या विलंबित तालाने पेरण्या खोळंबलेल्या बळीराजाचेच नव्हे, तर ग्रामीण भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत, पण यासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीत आणून पाणीटंचाईपासून ज्यांनी दिलासा द्यावा ती जिल्हा प्रशासनाची यंत्रणा मात्र ही टंचाई स्वीकारायला तयार नाही. भलेही भूगर्भात पाणी उपलब्ध असेल, स्त्रोत असेल; धरणांनी तळ गाठला नसेल, पण नळावाटे ते पाणी ग्रामस्थांच्या हंड्या गुंड्यापर्यंत पोहोचणार नसेल तर तिला टंचाई नाही म्हणायचे तर काय? खारपाणपट्ट्यातील ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक योजनेला ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने पाइपलाइन जीर्ण झाली आहे. पाण्याचा उपसा करणारे पंपदेखील निकामी झाले आहेत. त्यामुळे या खेड्यांना १५ दिवसच नव्हे तर कधी कधी महिना महिना ताटकळत राहावे लागते. अकोट व तेल्हारा तालुक्यातील ८४ खेडी योजनेतील निम्म्यापेक्षा अधिक गावेही तहानलेलीच राहत आहेत. मग पाणी उपलब्ध असले तरी ते तहानलेल्यांपर्यंत पोहोचतच नसेल तर तिला टंचाई म्हणायचे नाही का? जिल्हा प्रशासन याचबाबतीत सरकारी निकषांना कवटाळून आडमुठेपणा करीत असल्याचे स्पष्टपणे दिसते.

 

दुर्दैव असे की, या पाणीटंचाईची सचित्र स्थिती लोकमतसोबतच सर्व माध्यमांद्वारे प्रशासनापुढे मांडली जात असताना व त्या त्या परिसरातील लोकप्रतिनिधीही घसा ओरडून उपाययोजनांची मागणी करत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची असंवेदनशीलता दाखविली जात आहे. जिल्हा मुख्यालयात बसलेल्यांना ग्रामीण भागात पाठविले तर उन्हाचे चटके व घशाला कोरड काय असते हे कळू शकेल, पण ती तसदी कुणी घेत नाही. सरकारी निकषांवर बोट ठेवताना थोडे मनावर व आपल्या हृदयावरही हात ठेवून बघा ना, म्हणजे कळेल की ग्रामीण जनतेचे पाण्यावाचून काय हाल होत आहेत ते.

 

महत्त्वाचे म्हणजे उपाययोजनांना विलंब झाल्याने आता ऐनवेळी टँकर सुरू करून तहान भागविण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. अकोल्याप्रमाणेच बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीही नाजूकच आहे. अधिकाऱ्यांना फरक पडत नाही, परंतु, लोकप्रतिनिधींना मतांसाठी लोकांच्या दारात जावे लागते; त्यामुळे तेही टँकरसाठी आग्रही आहेत, तेव्हा टँकर्स सुरू केले म्हणजे त्यात काही जण हात ओले करून घेतील या संशयाने न वागता अगोदर कर्तव्य आणि माणुसकी म्हणून तातडीने टँकर्स सुरू करणे गरजेचे आहे.

 

सारांशात, आगामी काळ हा निवडणुकांचा आहे, त्यापार्श्वभूमीवर पाण्यासारखे ज्वलंत विषय हाती घेऊन आंदोलने उभी राहण्यापूर्वी व त्या आंदोलनांचा फटका अंतिमत: शासन व प्रशासनालाच बसण्याअगोदर याप्रश्नी संवेदनशीलता दाखविली जाणे अपेक्षित आहे. तृषार्थ जीवांचा तळतळाट घेऊ नका इतकेच यानिमित्ताने सांगणे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला