संदीप प्रधान
मुंबई - आदित्य ठाकरे हे धाडसी नेते आहेत. ठाकरे कुटुंबात निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वप्रथम त्यांनी घेतला. तरुणांच्या हिताचा ते विचार करतात. त्याच हेतूने त्यांनी नाइटलाइफचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मंजूर करवून घेतला. बृहन्मुंबईत साधारणपणे पाच लाख युवक-युवती हे शिफ्टमध्ये काम करतात. त्यांच्या सोयीकरिता २४ तास मुंबई सक्रिय हवी, असे आदित्य म्हणाले. मुंबई अहोरात्र सुरू राहिली तर वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी किमान १० लाख लोकांना रोजगार मिळेल, असा त्यांचा होरा आहे. आदित्य यांचा हेतू चांगला आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, ही योजना अमलात आणण्यात काही अडचणी निश्चित दिसतात. त्यांचा विचार वेळीच केला, तर नंतर तोंडघशी पडण्याची वेळ येणार नाही.
सर्वप्रथम मुंबईत एक नाइटलाइफ वर्षानुवर्षे सुरू होते व आहे. त्यामध्ये सहभागी निशाचरांनी आपापली व्यवस्था करून घेतलेली आहे. कुलाब्यात एकेकाळी ब्ल्यू नाइल नावाचा कॅब्रे सुरू असायचा व रात्री उशिरापर्यंत स्त्री-पुरुष त्याचा आनंद घ्यायचे. काही वर्षांपूर्वी तो बंद झाला. तेथेच लिओपोल्ड हे विदेशी नागरिकांचे फेव्हरेट डेस्टीनेशन आहे. त्यावर २६/११ ला हल्ला झाला होता. ताजमहाल हॉटेलच्या मागे एक हॉटेल गेली कित्येक वर्षे सुरू असून त्याला पिकअप जॉइंट म्हणून ओळखले जाते. मुंबई सेंट्रल व आॅपेरा हाउस परिसरातील ‘टोपाझ’ हा डान्स बार नाइटलाइफ शौकिनांमध्ये सुपरिचित होता. तेथे पहाटेपर्यंत बड्या असामींचा वावर असायचा. ‘काँग्रेस हाउस’मधील मुजराही विशिष्ट शौकिनांमध्ये पसंत होता. फोरास रोडवर रात्रभर ‘बाजार’ भरलेला असायचा व त्या परिसरातील पानवाल्यांपासून बारपर्यंत सारेच एकेकाळी पहाटेपर्यंत सुरू असायचे. पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले या सांस्कृतिक नगरीत एकेकाळी ‘दीपा’ बारमधील तरन्नुम या बार गर्लने बॉलिवूडच्या स्टार्सनाही खुळं केलं होत. तिला त्या काळात महागड्या मोटारी व फ्लॅट बक्षीस देणारे आशिक लाभले होते. मुंबईत एकेकाळी डान्स बारमुळे कुलाबा, मुंबई सेंट्रल, चेंबूर, मुलुंड, अंधेरी, मालाड वगैरे भागांत नाइटलाइफ फेसाळून वाहत होते. भेंडीबाजार, डोंगरी, भायखळा वगैरे काही मोहल्ल्यांत रात्री उशिरापर्यंत कबाब, बिर्यानी खायला गर्दी असते. ‘बडे मियाँ’सारखे स्पॉट खवय्यांना रात्री उशिरा तिकडे खेचून नेतात. हाजी अलीच्या कोपऱ्यावरील ज्युस सेंटर रात्री उशिरापर्यंत गर्दीने खचाखच असायचे. घाटकोपरच्या गारोडियानगरमध्ये पानाचे शौकीन रात्री पिचकाºया मारत गप्पांचे अड्डे जमवतात. सायकलवर चहा-कॉफी व सिगारेट-गुटखा किंवा इडली घेऊन फिरणारे दाक्षिणात्य मुंबईतील शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांचा मोठा आधार आहेत. याखेरीज, मुंबईतील अनेक अधिकृत, अनधिकृत क्लबमध्ये रात्रभर जुगार चालतो. येथेही धनिकांची ऊठबस असते.
अर्थात, आदित्य यांना नाइटलाइफमध्ये वरील बाबी अभिप्रेत नाहीत. आदित्य यांना बीपीओ, आयटी, मीडिया, मनोरंजन क्षेत्रांत काम करणाºया तरुणांकरिता पोटापाण्याची व मनोरंजनाची व्यवस्था करायची आहे. सध्या जेथे बीपीओ अथवा आयटी क्षेत्रातील तरुणवर्ग काम करतो, तेथे रात्रीच्या वेळी पावभाजी, पिझ्झा, ज्युस यांची अगदी उशिरापर्यंत विक्री होते. त्यांची सिगारेटची तल्लफ भागवण्याकरिता दुकाने सुरू असतात. अर्थात, त्यांना परवानगी नसल्याने पोलिसांना खाद्यपदार्थांचे पार्सल व पैसे मोजावे लागतात. मात्र, ही मालाड, अंधेरी, लोअर परळ वगैरे काही मोजकी ठिकाणे आहेत. त्यामुळे या तरुण नोकरदारवर्गाकरिता संपूर्ण मुंबईभर नाइटलाइफ सुरू राहील, ही अपेक्षा चुकीची आहे. त्यातही सध्या आर्थिक मंदीमुळे आयटी क्षेत्रापासून आॅटोमोबाइलपर्यंत सर्व क्षेत्रांतील हजारो लोकांनी नोकºया गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल किंवा इंटिंग जॉइंट्समध्ये जर रात्री दीड-दोन वाजल्यानंतर गर्दी नसेल, तर पहाटेपर्यंत हॉटेल खुले ठेवून कर्मचाºयांचे वेतन, वीजबिल, सुरक्षाव्यवस्था वगैरेंवर खर्च करणे हॉटेल इंडस्ट्रीतील लोकांना परवडणार नाही. आदित्य म्हणतात तसे हा जर पाच लाख तरुण नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असेल, तर मुंबईच्या एक कोटी ४० लाख लोकसंख्येपैकी केवळ ३ ते ३.५ टक्के लोकसंख्येच्या गरजा भागवण्याचा विषय आहे. मग त्याकरिता पोलीस, अग्निशमन दल व तत्सम सर्व यंत्रणांवरील ताण वाढवायचा का, याचा विचार करायला हवा. अहोरात्र हॉटेल, मॉल खुले राहिले तर पोलीस त्यांचे मूळ सुरक्षेचे काम करतील व सध्या ते बंद करण्याकरिता पोलिसांना जे हेलपाटे मारावे लागतात ते मारावे लागणार नाहीत, असे आदित्य म्हणतात. मात्र, ग्राहक नसतानाही हॉटेल सुरू ठेवणे मालकांना अशक्य आहे. अनेक व्यावसायिक नोटाबंदी व जीएसटीमुळे आर्थिक संकटात असताना हॉटेल व्यावसायिकांना तुलनेने कमी झळ बसली आहे, याचे कारण हॉटेलिंग ही आजही मोठ्या वर्गाची गरज आहे. नाइटलाइफमुळे त्यांच्यावरील आर्थिक बोजा वाढला, तर या व्यावसायिकांचेही कंबरडे मोडेल व लोकांना रोजगार मिळणे दूरच, उलट काहींना रोजगार गमवावा लागेल.
त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर नाइटलाइफचा लाभ किती मोठ्या वर्गाला होणार आहे व खरोखरच त्यांची ती मागणी आहे का, हा प्रश्न मनात येतो. शेजारील गोव्यात क्रूझ कॅसिनो आहेत. मुंबईतील नाइटलाइफला विरोध करणाºया भाजपचे तेथे सरकार असूनही त्यांनी ते बंद केलेले नाहीत. क्रूझ कॅसिनोत मुंबई, गुजरात व पंजाबमधून लोक जातात. तेथे वास्तव्याची सोय असते, तशीच मसाजपासून अनेक मौजमजेची सोय केलेली असते. खेळण्याकरिता उधारीवर पैसे दिले जातात व ते वसूल केले जातात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मुंबईलगच्या समुद्रात तसे क्रूझ कॅसिनो किंवा वांद्रे-कुर्ला संकुलात कॅसिनो सुरू करण्याकरिता तर नाइटलाइफची टूम काढलेली नाही ना? अशी शंका घ्यायला वाव निर्माण होतो. अर्थात, नाइटलाइफच्या निर्णयातील ‘अंदर की बात’ लवकरच उजेडात येईल.