शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दिनू रणदिवे; पत्रकारितेतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 05:48 IST

‘सिंहासन’ चित्रपटात दिगू टिपणीस नावाचा जो पत्रकार आहे, तो दिनू रणदिवे आणि जगन फडणीस यांमधून तयार झाला होता.

- संजीव साबडे, समूह वृत्त समन्वयक, लोकमतदिनू रणदिवे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी म्हणजे वृद्धापकाळाने निधन झाले असले तरी त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रातील आणि राजकारणातील अनेकांना धक्काच बसला. ते हाडाचे पत्रकार होते. त्यांचे सामाजिक भान कमालीचे होते. ‘सिंहासन’ चित्रपटात दिगू टिपणीस नावाचा जो पत्रकार आहे, तो दिनू रणदिवे आणि जगन फडणीस यांमधून तयार झाला होता. आताच्या पिढीला रणदिवे माहीत असण्याची शक्यता नाही; पण रणदिवे यांचे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, बॅ. वानखेडे, वसंतदादा पाटील, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, शरद जोशी अशा असंख्य राजकारण्यांशी उत्तम संबंध होते. पण, प्रसंगी त्यांच्या विरोधातही रणदिवे यांनी लिखाण केले. त्यामुळे पत्रकार व राजकारणी यांच्यात दिनू नावाने ओळखल्या जाणाऱ्या रणदिवे यांच्याविषयी सर्वांनाच भीतीयुक्त आदर होता. रणदिवे अस्सल मुंबईकर होते आणि मुंबईचा कानाकोपरा नव्या पत्रकारांना माहीत व्हावा, यासाठी ते त्यांना बसने प्रवास करायला सांगत. वार्ताहराने कार्यालयात बसणे हे त्यांना मान्यच नव्हते.

रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुरुंगवास भोगला. गोवा मुक्ती लढ्यातही ते सहभागी होते. समाजवादी चळवळीशी जवळीक असलेल्या ध्येयनिष्ठ रणदिवे यांच्यावर महात्मा गांधी, कार्ल मार्क्स आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पगडा होता. त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे धारावीचा भूखंड घोटाळा, सांगलीतील भूखंड घोटाळा, स्मशानभूमी अशी अनेक दडपली गेलेली प्रकरणे लोकांसमोर आली आणि काही प्रकरणांमुळे अधिकाऱ्यांच्या चौकशा झाल्या आणि राजकारणी मंडळीही हादरली. रणदिवे यांनी बांग्लादेश मुक्ती लढ्याचे रणांगणावरून केलेले वार्तांकन तर खासच होते.देशात १९७४ मध्ये रेल्वेचा संप सुरू असताना रेल्वेचे अधिकारी आम्ही आज अमूक गाड्या सोडल्याचा दावा रोज संध्याकाळी पत्रकार परिषदेत करीत. प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नव्हती. त्यामुळे एक दिवस पहाटेपासून रात्रीपर्यंत रणदिवे दादर स्टेशनवर उभे राहिले. दिवसभरात गेलेल्या गाड्या त्यांनी मोजल्या. रेल्वेचे अधिकारी त्यापेक्षा जादा गाड्या सोडल्याचा दावा करू लागताच रणदिवे यांनी त्यांना खोटे पाडले. त्यामुळे तेव्हाचे मुख्य सचिव डी. डी. साठे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे कानच उपटले.
सिमरनजितसिंग मान नावाच्या मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा शीख अतिरेकी आणि भिंद्राणवाले यांच्याशी संबंधित होता. पोलिसांनी पाळत ठेवताच मान पंजाबमध्ये पळून गेल्याचे प्रकरण रणदिवे यांनीच उघडकीस आणले. हेच मान पुढे खासदार झाले. नाशिकच्या इन्फँट जीझस चर्चच्या यात्रेसाठी १९८३ मध्ये गेलेल्या मुंबईतील यात्रेकरूंची बस कसारा घाटात कोसळली आणि त्यातील जवळपास सर्वजण मरण पावले. त्यावेळी मृतांच्या प्रत्येक कुटुंबीयांशी संपर्क रणदिवे यांनी साधला. मुंबईत अतिवृष्टी झाली की, प्रत्येक परिचिताशी संपर्क साधून, त्याच्या भागातील परिस्थितीची ते माहिती मिळवत आणि बातमी देत. टीव्ही, फोन अशा सुविधा नसताना ते बातम्यांसाठी सतत धडपड करीत.
दत्ता सामंत यांनी घडवून आणलेला गिरणी कामगारांचा संप असो की, शरद जोशी यांनी काढलेली शेतकरी दिंडी असो, त्यांचे वार्तांकन करण्यासाठी त्यांनी विशेष वार्ताहराची निवडच केली होती. कडाक्याच्या थंडीत अनेक मुंबईकरांना फूटपाथवरच राहावे लागते. अशाच एका थंडीच्या रात्री ते बोरी बंदर ते दादर चालत आले. फूटपाथवर राहणाऱ्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. त्या रात्री त्यांना कुत्रा चावला. त्याची दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध होताच, राज्य सरकारला जाग आली.रणदिवे यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि ते माहितीचा खजिनाच होता. गुगल आणि इंटरनेट नसताना पत्रकारांसाठी तेच माहितीचा स्रोत होते. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. रणदिवे जवळपास २५ वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये होते. त्याआधी काही काळ एस. एम. जोशी यांनी सुरू केलेल्या ‘लोकमित्र’ या दैनिकात ते होते. तिथे नारायण आठवले, चंद्रकांत मेढेकर, काशिनाथ पोतदार, वि. वि. करमरकर हे त्यांचे सहकारी होते. संयुक्त महाराष्ट्र पत्रिकाही त्यांनी काही मित्रांच्या मंडळींनी काढली होती. पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले आणि त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला. अत्यंत मनमिळाऊ आणि शांत असलेल्या रणदिवे यांचे तिथे तेव्हाचे संपादक गोविंद तळवलकर यांच्याशी अनेकदा वाद होत; पण रणदिवे यांच्याविषयी तळवलकर कायम आदराने बोलत. याचे कारण रणदिवे यांची पत्रकारिता. आपल्या बातमीतील प्रत्येक शब्दाबाबत ते आग्रही असत, याचे कारण त्यांनी तो विचारपूर्वक लिहिलेला असे. पत्रकारांच्या संस्था, संघटनांशी ते कायम संबंध ठेवत. कोणी पत्रकार अडचणीत वा आजारी असल्याचे कळताच ते मदतीचा हात पुढे करीत. निवृत्तीनंतरही त्यांचे अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांत लिखाण सुरू होते. त्यांच्यासारखी अस्सल आणि एखाद्या घटनेच्या सर्व बाजू तपासून केली जाणारी बातमीदारी आता अगदीच दुर्मीळ होत चालली आहे.