- डॉ. कुमार सप्तर्षी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)भारत १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. महात्मा गांधी स्वातंत्र्यलढ्याचे सेनापती. लोकमान्य टिळक व नामदार गोखले या महान नेत्यांच्या विचारसरणीचा तथ्यांश स्वीकारून, त्यांनी भारतीय जनतेला सामुदायिक पुरुषार्थाची दीक्षा दिली. त्यातून व्यापक जनसंघटन निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ९१ टक्के जनता निरक्षर होती. शिक्षणाच्या माध्यमातून नवा भारतीय नागरिक निर्माण करण्याचे ध्येय ठरले. नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये हा गाभा असलेले संविधान तयार झाले.संसदीय आणि संसदबाह्य असे राजकारणाचे दोन विभाग हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य. शासन, प्रशासन व संसद या संस्था जातिधर्मनिरपेक्ष असल्याच पाहिजेत हा संविधानाचा गाभा. २६ जानेवारी १९५० रोजी प्रत्येक भारतीय व्यक्ती जातिधर्माच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतंत्र झाली. नागरिकांना धर्माचे पालन करण्याचे वा न करण्याचे, ईश्वर मानण्याचे वा न मानण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु जातपंचायत किंवा धर्म यांना व्यक्तीवर वर्चस्व गाजविण्याचा अधिकार नाही. संविधानाने संसदीय पक्षांवर संविधानातील पायाभूत मूल्ये समाजात रुजविण्याची जबाबदारी सोपविली आहे. परंतु राजकीय पक्षांनीच पक्षांतर्गत लोकशाहीचा लोप केला आणि त्यांचे नेतृत्व फॅसिस्ट बनले तर काय करायचे, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. भाजप २०१४मध्ये सत्तारूढ झाला आणि वातावरण बदलले. आम्ही म्हणजेच राष्ट्र आणि आम्हाला विरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह हे केंद्रीय नेतृत्वाचे सूत्र बनले.या पार्श्वभूमीवर देशभरातल्या विद्यापीठांमध्ये चालू असलेल्या सरकारच्या विरोधातील विद्रोहाचे स्वागत केले पाहिजे. संसदेत विरोधी पक्ष भाजपसमोर शक्तिहीन आहेत. अशा विकलांगांचे नेतृत्व तरुणपिढी कशी मानेल? या अपरिहार्यतेमधून सत्ताविरोधी राजकारणाचे रणांगण संसदबाह्य शक्तींच्या हातात जाणे स्वाभाविक आहे. या विद्रोहाचे, स्फोटाचे निमित्त बनला धर्मांवरून भेदाभेद करणारा नवा नागरिकत्वाचा कायदा! देशात भयाचे वातावरण आहे. तरुण वर्ग बेकारीमुळे निराशाग्रस्त आहे. उरतो तो फक्त विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग. हा वर्ग रोज एकमेकांच्या संपर्कात असतो. तारुण्यात प्रचंड ऊर्जा असते; विशेष म्हणजे ते हिंसेचा आश्रय घेत नाहीत. त्यांनी सध्या ‘लढाऊ अहिंंसा’ हे तत्त्व आत्मसात केलेले दिसते.१९६७ सालात जगभर विद्यार्थी आंदोलने झाली. त्यात एकच सूर होता. बापांचे पापाचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा तरुण म्हणून आमचा वयसिद्ध मूलभूत अधिकार आहे. बापपिढीने आमच्यासमोर अंधाराची भिंंत उभी केली असेल, तर प्रकाश आणण्यासाठी ती फोडण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे.
अहिंसक युवाशक्तीची हिंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 02:48 IST