शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
4
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
5
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
6
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
7
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
8
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
9
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
10
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
11
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
12
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
13
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
14
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
15
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
17
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
18
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
19
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
20
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका

श्वासातून ऑक्सिजन घेत आहोत की विष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 07:11 IST

पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? पैसा, गाडी, बंगला हवाच; पण आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग?

विजय बाविस्करसमूह संपादक, लोकमत vijay.baviskar@lokmat.com

पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? पैसा, गाडी, बंगला हवाच; पण आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग? 

प्रश्न केवळ जागतिक तापमानवाढीचा नाही. तो प्रदूषणवाढीचादेखील नाही. मूळ प्रश्न आहे आपल्या आरोग्याचा! चिंतामुक्त, आनंदी आणि निरोगी जगण्याचा! शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली हे खरेच. पण, खिशात दमडी नसतानाही आनंदी जीवन जगणारा गावातला सर्वसामान्य शेतकरीदेखील अस्वस्थ झाला आहे. आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न त्याच्याही घरापर्यंत धडकले आहेत. बीपी, शुगरपासून हार्ट अटॅक, किडनी फेल होण्यापर्यंतच्या सर्व आजारांशी हा गावातला माणूसही झगडत आहे. गावांचा जीडीपी वाढला, आनंद मात्र कमी झाला! पैसा येऊ लागला; पण खर्चही कितीतरी पटीने वाढला. विकास आपल्याला  हवा आहेच; पण त्यासाठी मोजायची किंमत कोणती आणि किती, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.  आपली जगण्याची जी पद्धत आहे, त्यावरच पुन्हा विचार करण्याचीही वेळ आली आहे.  ‘रॅंचो’ने त्याची सुरुवात केली आहे. 

जागतिक तापमानवाढीमध्ये स्थानिक प्रदूषणाचादेखील वाटा आहे. त्यामुळे लडाखच्या पर्यावरणाला फटका बसू नये हा प्रश्न हाती घेऊन ‘थ्री इडियट‌्स’मधला ‘रियल रॅंचो’ सोनम वांगचूक समोर आला आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा हा फटका केवळ लडाखला किंवा वांगचूकलाच बसतोय असे नाही. तुम्ही-आम्ही सर्वजण रोजच्या जगण्यात क्षणोक्षणी हे फटके अनुभवत आहोत; परंतु ‘रॅंचो’ होऊन रस्त्यावर उतरण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही. जे चालले आहे ते चूक आहे, असे सांगण्याचे धाडसही आपण दाखवत नाही. कळून, सवरूनही गंजीजवळ निखारा ठेवण्याचाच हा प्रकार! मग काय, आज ना उद्या आग लागणारच! सारे काही खाक होणारच! विकासासाठी होणाऱ्या काही कामांमुळे उत्तराखंडातील जोशीमठमध्ये घरं, रस्ते, दुकानं, हॉटेल सर्वांना तडे गेले आहेत, लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे. समुद्रावरील अतिक्रमण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबईसह देशातील १० शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याचा धोका शास्त्रज्ञांनी दिला आहे. तरीही आपण सावध व्हायला तयार नाही. 

एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत प्रदूषित शहरांची आकडेवारी जाहीर केली. त्यात देशाची राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर, दिल्लीला लागूनच असलेले हरयाणातील फरिदाबाद दुसऱ्या, तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद तिसऱ्या स्थानावर झळकले. या आकडेवारीनुसार देशातील १८५ पैकी १८ शहरांमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे. १५ शहरांमधील स्थिती काठावर आहे. ३७ शहरांमध्ये समाधानकारक, तर ४२ शहरांमधील स्थिती खराब आहे. प्रदूषित ‘टाॅप टेन’मध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही, हा काहीसा दिलासा; पण म्हणून जल्लोष करण्याची ही वेळ नाही. नवी मुंबई, नागपूर, पुणे शहरातील प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट नसली तरी चांगलीही नाही. राज्याची राजधानी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमधील प्रदूषण काठावर आहे. अमरावती, नाशिक या शहरांची स्थिती मात्र समाधानकारक आहे.

प्रदूषणात जगाच्या नकाशावरही आपण पुढे आहोत. सर्वाधिक वायू प्रदूषण करणाऱ्या ‘टॉप टेन’ शहरांमध्ये भारतातील तीन शहरे आहेत. एक देशाची राजधानी दिल्ली, दुसरे कोलकाता आणि तिसरे शहर आहे महाराष्ट्राची मुंबई. हे काही भूषण नाही. प्रदूषणाकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर आज ज्या शहरांची स्थिती खराब आहे ती अतिशय वाईट व्हायला, जे काठावर आहेत ते खराब स्थितीमध्ये यायला आणि समाधानकारक आहेत ती शहरे काठावर येण्यास फारसा वेळ लागणार नाही. तापमान किंवा प्रदूषण वाढले तर मला काय फरक पडणार, मी एकट्याने बदलून काय उपयोग, मी एकट्याने प्रदूषण केल्याने अशी किती वाढ होणार, या व अशा भाबड्या प्रश्नांमुळे परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे.  

आपण नाकावाटे जो ऑक्सिजन घेतो, त्यातून शरीराला ९० टक्के ऊर्जा मिळते. उर्वरित दहा टक्के ऊर्जा खाण्या-पिण्यातून मिळते. ९० टक्के ऊर्जा देणारा आपला श्वास खरंच ऊर्जा देत आहे की आजारपण? जागतिक आरोग्य संघटेनेच्या निकषानुसार हवेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण २५ मायक्रोग्रॅमपर्यंत असायला हवे. प्रत्यक्षात आपल्या शहरात यापेक्षा जास्त धूलिकणांची नोंद होते. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या कणांमुळे फुप्फुसांमध्ये संसर्ग, दम्याचे आजार वाढतात. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एकूण मृत्यूंपैकी २३ टक्के मृत्यू हे प्रदूषणामुळे होतात.  

राज्यातील चंद्रपूरचे उदाहरण पाहू. २०२२ या वर्षामध्ये चंद्रपूरमध्ये ३६५ पैकी केवळ २९ दिवस दररोज घेतला जाणारा श्वास आरोग्यदायी होता. १६४ दिवस कमी प्रदूषण होते. १५० दिवस जास्त प्रदूषण होते. २२ दिवस अत्यंत हानिकारक होते. प्रदूषणाची तीव्रता पाहण्यासाठी वर्षभरापूर्वी शहरात कृत्रिम फुप्फुस लावण्यात आले. अगदी सहा दिवसांत ते काळवंडून गेले. शहरात राहणाऱ्यांच्या  फुप्फुसांचे काय होत असेल? या जीवघेण्या प्रदूषणामुळे ९२ टक्के चंद्रपूरकरांचा जीव शहरात गुदमरत आहे. तब्बल ७० टक्के लोकांची गाव सोडून जाण्याची तयारी आहे. एका ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती अलीकडेच समोर आली आहे. औद्योगिक भरभराट झालेल्या सर्वच शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. सध्याचीच स्थिती इतकी गंभीर, तर उद्या काय वाढून ठेवले असेल?  श्वसनाद्वारे घेतला जाणारा ऑक्सिजन ऊर्जा देण्याऐवजी शरीरात विष पसरवणार असेल, तर पुढची पिढी आपल्याला माफ कशी करील? पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? लाखो-करोडो रुपयांमधली संपत्ती पुढच्या पिढीला देण्याचा अभिमान बाळगायलाच हवा. पैसा, गाडी, बंगला असायलाच हवा; पण सोबत आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग? आजारपणात पिचलेल्या शरीराला आणि मनालाही या गाडी-बंगल्याचा आनंद तरी कसा मिळेल ?