शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी? 

By shrimant mane | Updated: December 9, 2023 06:00 IST

विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे.

खेडे असो की गाव, विशेषत: महामार्गावरच्या गावांवरून जाता-येता कुठल्या तरी होर्डिंगवर अपघातात बळी गेलेल्या एक-दोन तरुणांचे चेहरे आणि त्याखाली त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल मित्रांनी वाहिलेली श्रद्धांजली हे नेहमीचे चित्र आहे. रांगड्या पुढाऱ्याकडून एखाद्या अभिनेत्रीच्या गालाची उपमा दिली जाते असे गुळगुळीत रस्ते, सरळ रेषेत जाणारे सहापदरी, आठपदरी महामार्ग, एक्स्प्रेस वे वगैरेंच्या पायाभूत सुविधा हा तसा तरुणाईला आकर्षित करणारा विषय, तर सिमेंट काँक्रीटचे चकचकीत रस्ते हा शहर विकासाचा नवा मापदंड. त्यातून तरुणाईला व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण होतात असे सांगितले जाते. एकीकडे हा विकास असा फुलत असताना त्याच रस्त्यांवर जाणारे अपघाती बळी हा तितकाच चिंतेचा विषय आहे. कोरोना काळात दोन वर्षे हे प्रमाण तुलनेने कमी झाले खरे. परंतु, त्यानंतरची २०२२ या संपूर्ण वर्षभराची एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्यूरोची आकडेवारी काही नव्या चिंता निर्माण करणारी आहे. 

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीचा गोषवारा असा - २०२१ च्या तुलनेत २०२२ हे वर्ष चिंतेचे ठरले. सगळे काही वाढले. भ्रष्टाचार वाढला, आत्महत्या वाढल्या, अपघाती मृत्यू वाढले. एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्यांचे प्रमाण १२ वरून १२.४ झाले. २०२१ मध्ये ३ लाख ९७ हजार ५३० आकस्मिक मृत्यू होते व त्यांचे एक लाख लोकसंख्येमागील प्रमाण २९.१ होते.  २०२२ मध्ये हा आकडा ४ लाख ३० हजार ५०४ असा झाला व प्रमाण ३१.२ झाले. निसर्गाच्या तडाख्यात ८०६० बळी गेले. त्यातील ३५.८ टक्के मृत्यू वीज कोसळून झाले. आकस्मिक मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू वाहतुकीशी संबंधित आहेत. त्यात सर्वाधिक १२.४ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार ९२४ मृत्यू ३० ते ४५ या कमावत्या वयोगटातील, तर त्या खालोखाल १२ टक्के (१ लाख ६४ हजार ३३) मृत्यू १८ ते ३० वयोगटातील आहेत. एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू अशा कमावत्या तरुणांचे होतात. विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे एक विचित्र समीकरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर दर शंभर किलोमीटरला वर्षभरात १०३ मृत्यू हे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. शिवाय राज्य महामार्गावर दर शंभर किलोमीटरला ४५ जणांचा जीव गेला. 

याबाबत महाराष्ट्राची स्थिती अधिक चिंताजनक आहे. देशाच्या ९.१ टक्के लोकसंख्येच्या महाराष्ट्रात देशातील १५.७ टक्के मृत्यू नोंदले गेले. त्या खालोखाल १०.१ टक्के मृत्यू मध्य प्रदेशात, दहा टक्के उत्तर प्रदेशात, प्रत्येकी ६.९ टक्के तामिळनाडू व कर्नाटकात, तर ६.२ टक्के राजस्थानात व ५.२ टक्के मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत. शहरांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगळुरू व भोपाळ ही शहरे पहिल्या सहा क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात १४ वर्षांपेक्षा कमी वयाची १३५५ मुले व ९३३ मुलींचा अपघाती मृत्यू झाला. १४ ते १८ वर्षे या विद्यार्थी दशेतील १६९१ मुले व ४२८ मुली, तर साधारणपणे बारावी अथवा पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय व उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे ११ हजार २९४ तरुण व २३८८ तरुणी अपघातांत बळी गेल्या. 

मृत्यू कोणताही वाईटच, परंतु विद्यार्थी, तरुण मुले, नुकतेच स्थिरस्थावर झालेले कमावते पुरुष व स्त्रिया अशी कर्ती माणसे अपघातात जातात तेव्हा माता-पिता, भावंडे मानसिकदृष्ट्या कोसळतात. कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. कमावती तरुण माणसे अशी अचानक निघून जातात तेव्हा त्यांच्या पश्चात चिमुकली मुले व माता-पित्यांची उपासमार होते. डोंगराएवढ्या दु:खातून सावरायला, पुन्हा उभे राहायला त्यांना कित्येक वर्षे लागतात. मुला-मुलींमध्ये समाजाने, त्यांच्या माता-पित्यांनी, परिवाराने आर्थिक, भावनिक गुंतवणूक केलेली असते. त्यांच्या उज्ज्वल भविष्याची सोनेरी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. 

याचा अर्थ सगळे अपघात तरुणांच्याच चुकीमुळे होतात असे नाही. एकूण अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण तब्बल ४५.५ टक्के आहे. या अपघातांमध्ये काहीवेळा दुचाकीस्वारांची, तर बऱ्याचवेळा इतर अवजड वाहने चालविणाऱ्यांची चूक असते. जीव मात्र शक्यतो छोट्या गाडीवाल्याचा जातो. त्याचप्रमाणे १४.५ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे आहेत. त्यांची तर शक्यतो काहीच चूक नसते. ते भरधाव वाहने चालविणाऱ्यांनी घेतलेले बळी आहेत. या तुलनेत एसयूव्ही, कारमधील प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण पादचाऱ्यांपेक्षा कमी म्हणजे १४ टक्के आहे. अलीकडे प्रवासी वाहनांमध्ये सुरक्षेचे जे अत्याधुनिक उपाय योजण्यात आले आहेत त्यामुळे हे प्रमाण आणखी कमी झाले आहे. 

रस्ते अपघातात लहान मुले व तरुणांना गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी अमेरिकेतल्या बाल्टिमोर व सेंट लुईस या शहरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले प्रयत्न आजही जगाने अमलात आणावेत असे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोटारींचा वापर वाढला आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले. १९२१ साली संपूूर्ण अमेरिकेत १३ हजार जणांचा रस्ते अपघातात जीव गेला. १९१५ च्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. बाल्टिमोर शहराने त्या वर्षी १३० मुले गमावली. चिंताग्रस्त शहरवासीयांनी या चिमुकल्यांच्या आठवणींसाठी एक स्मारक उभारले. अपघातमुक्त आठवडा साजरा होऊ लागला. पादचारी व दुचाकीस्वारांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.  शंभर वर्षांत वाहने कैक पटीने वाढली. २०२१ साली अमेरिकेत रस्ते अपघातात ४३ हजार लोकांचा जीव गेला. हा आकडा आधीच्या १६ वर्षांमधील सर्वाधिक, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १२.९ होते. भारतातील अपघाती मृत्यूचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत अडीच पट आहे. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका महाशक्ती आहे असे सांगताना आणि उठसूठ अमेरिकेशी तुलना करताना माणसांचे जीव वाचविण्यासाठीही अमेरिकेचा आदर्श घेणार आहोत की नाही ?

shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :Accidentअपघात