मुलायमसिंह यादव किंवा उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर अमिताभ बच्चन यांचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी बिहार आणि नितीशकुमार यांच्यावरही तो असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. असे असताना बच्चन यांच्या शहेनशाह या चित्रपटातील एक कल्पना उचलून धरुन राबविण्याचा निर्धार नितीशकुमार यांनी केला आहे. या सिनेमात अवैध दारुचे आणि तत्सम सारेच धंदे करणारा बदमाष जसा रातोरात दुधाच्या धंद्याला लागतो त्याच धर्तीवर आज दारु विक्रीचे जे गुत्ते बिहारात आहेत त्यांचे रुपांतर येत्या एक एप्रिलपासून म्हणजे दारुबंदीचे धोरण अंमलात येण्याच्या दिवसापासून दूध विक्री केन्द्रांमध्ये केले जाणार आहे. अशा गुत्त्यांची संख्या जवळजवळ सहा हजारांच्या घरात आहे. नितीशकुमार यांनी दूध महासंघाला गुत्त्यांच्या जागी दूध विक्री केन्द्रे सुरु करण्याची जबाबदारी सोपविली असून त्यातून दारुबंदीपायी निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला आळा बसू शकेल असा त्यांना विश्वास वाटतो. बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी राज्ये यादवबहुल असल्याने तिथे दूधदुभत्याची रेलचेल असेल असे येथे गृहीत धरावे लागेल. बेरोजगारीशिवाय दुसरा भेडसावू शकेल असा प्रश्न उत्पन्नात येणाऱ्या घटीचा. पण ती सोसण्याची तयारी बिहार सरकारने म्हणे केली आहे. तिचा अंदाजित वार्षिक आकडा तीन हजार कोटींचा आहे. दारुसारखे दुष्परिणाम घडवून आणणारे पेय लोकानी बाजूला सारुन दुधासारखे पौष्टिक पेय आपलेसे करावे हा नितीशकुमार यांचा यामागील हेतू शुद्धच आहे. मुद्दा इतकाच की त्यांचा हा विचार किती लोकांच्या पचनी पडू शकेल. अशी शंका उपस्थित करण्याचे कारण म्हणजे एक एप्रिलपासून संपूर्ण नव्हे तर बिहारच्या नव्वद टक्के भागात दारुबंदी लागू केली जाणार असून उर्वरित दहा टक्क््यांमध्ये राज्यातील ४५ महापालिका आणि काही नगरपालिका क्षेत्रे येतात. तिथे दुसऱ्या टप्प्यात नवे धोरण लागू केले जाणार आहे. याचा अर्थ महापालिका क्षेत्र ओले तर त्याच्या बाहेरचे मात्र कोरडे. जर बाहेरचे दूध आत येऊ शकेल तर मग आतले द्रव्य बाहेर नाही जाऊ शकणार?
दारुला पर्याय दूध
By admin | Updated: December 22, 2015 02:20 IST