शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

स्कोअर काय झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:17 IST

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल.

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल. 'स्कोअर काय झाला?, या प्रश्नानं लोकांच्या भुवया उंचावतील, ते हसतील, चिडतील, कचाकचा भांडतील, सोशल मीडियात कमेण्ट, मीम्सचा पाऊस पडेल, आशा-निराशेचा खेळ श्वास कंठाशी आणेल तरीही त्यापलीकडे असेल रसरसून जगण्याचा एक आनंद! रोजच्या जगण्यातल्या विवंचनांनी छळलेल्या आणि जगण्याचे कुठलेच आनंद निरलस, सहज आणि नितळ उरलेले नसताना 'क्रिकेट' नावाचा एक जादूगर खेळ सगळ्या ताणतणावांच्या जखमांवर औषध म्हणून फुंकर मारेल. ते पुरेसं नसेलही; पण काही क्षण तरी 'बरं वाटल्याचा' आनंद मिळेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात-पात, पंथ, धर्म, राजकीय विचारधारांनी पोखरून पुरते विकल आणि विफल केलेल्या दुफळी माजलेल्या समाजात किमान दीड महिना तरी एकच ओळख घेऊन बहुतांश माणसं जगतील. 'भारतीय ही ओळख सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याची जादू पुन्हा एकदा क्रिकेट करूनही दाखवेल. 

अर्थात हारजीतीचे प्रश्न असतील. गेल्या १० वर्षात भारतीय संघाने एकही आयसीसी किताब जिंकलेला नाही. आयपीएलमध्ये उदंड पैसा कमावणाऱ्या भारतीय संघात आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या पोटातही जिंकण्याची आग उरलेली नाही, असे आरोप तर सर्रास होतात. त्याचे कारण म्हणजे मागचा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला त्याला आता तप उलटून गेलेलं आहे. त्या संघात खेळलेले फक्त दोन खेळाडू यावेळच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत आहेत. संघनिवड आणि संघभावनेसह कप्तानाचे उत्तम नेतृत्व याविषयीही शंका, संशयाचे मळभ विश्वचषक स्पर्धा सुरू होतानाही हटलेले नाही. या स्पर्धेत तरी भारतीय संघाने 'करू या मरू' सामन्यात हाराकिरी न करता आपल्या क्षमतेला न्याय देत खेळावं आणि घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी अपेक्षा आहेच. परंपरेनुसार (गेल्या टी ट्रेण्टी विश्वचषकात ती परंपराही मोडलीच म्हणा) केवळ पाकिस्तान संघाला विश्वचषकात हरवणे आणि त्या आनंदाचं विद्रूप प्रदर्शन करणं, सामन्यांना वैर आणि युद्धाचं रूप देणं हे सारं या स्पर्धेत तरी मागे पडावं, अशी अपेक्षा आहे. अर्थात तसं होणार नाही. आक्रमक मार्केटिंगच्या या काळात नकारात्मकता जास्त विकली जात असताना सकारात्मकतेचे दिवे मिणमिणतच उजळणार हे वास्तव आहे; पण ते दिवे किमान तेवते राहतील आणि सभ्य माणसांचा खेळ म्हणून क्रिकेट आपली पत राखेल, असं वाटावं इतपत कस अजूनही क्रिकेटने टिकवून ठेवला आहे.

एकीकडे क्रिकेटची बाजारपेठ मोठी होते आहे, प्रक्षेपणाचे हक्क आणि स्पॉन्सर्स यांच्याभोवती फिरणारा पैसा काही कोटी रुपयांच्या अव्याढव्य उलाढाली होत फिरतो. क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर त्यानं मनोरंजनाची जागाही कधीच घेतली. धनसत्तेपुढे सर्वत्रच लोटांगणं घातली जात असताना क्रिकेटही त्यापासून दूर नाही; पण अजूनही एकदा सामना सुरू झाला की क्रिकेट पुन्हा पुन्हा आपल्या ग्लोरियस अनसर्टन्टी'ची झलक दाखवते. मैदानात पडलेला प्रत्येक चेंडू आपली कहाणी घेऊन येतो. तिथे भाइभतिजा राजकारण चालत नाही, अमक्यातमक्याचा मुलगा म्हणून भारतीय संघात वट कमावता येत नाही. क्रिकेटभोवती भारतीय उपखंडातलं राजकारण फिरू शकतं, आशिया चषकाच्यावेळी ते जाहीर दिसलंही. खेळाच्या मैदानावर एकच गोष्ट खरी ठरते ती म्हणजे गुणवत्ता आणि मेहनत. क्रिकेटने खऱ्या अर्थाने देशातल्या लोकशाहीकरणाला वेग दिला. एकेकाळी क्रिकेट हा राजारजवाड्यांचा खेळ होता, नंतर तो केवळ मोठ्या शहरात रुजला, वाढला. मात्र, जागतिकीकरणाची दारं देशानं उघडली, दूरचित्रवाणी देशभर पोहोचली, तसतसे क्रिकेट छोट्या शहरात पाझरू लागले आणि मूळही धरू लागले. रांचीचा धोनी भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार झाला आणि आजच्या संघात देशाच्या लहान शहरातले खेळाडू दिसतात. त्यांनी क्रिकेटला बेधडक आणि बिनधास्त रंगरूप दिले. आपली गुणवत्ता हीच आपली ताकद आणि तीच आपली ओळख हे त्यांनी सिद्ध केलं आहे. गुणवत्ता असली तर आपण मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि मेहनतीची तयारी असेल तर ती साकारूही शकतो, यावर विश्वास ठेवण्याची ताकद आजच्या भारतीय तारुण्याला देण्याचं काम क्रिकेट करतं आहे. पुढचा दीड महिना क्रिकेटचा हा जलसा चांगुलपणावरचा विश्वास वाढवेल, अशी आशा आहेच. सोबतच भारतीय संघाने नव्हे, 'भारताने ' चषक जिंकावा, ही सव्वाशे कोटी भारतीयांची इच्छाही फलद्रूप होवो!