दोन दिवसात तीन बसेस ६०० कि.मी.धावल्या,उत्पन्न नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST2021-04-12T04:34:09+5:302021-04-12T04:34:09+5:30

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही साखळी तोडण्यासाठी अखेर राज्य शासनाने दोन दिवसांचा वीकेंड लॅाकडाऊन लावला. ...

In two days, three buses ran 600 km, the income was negligible | दोन दिवसात तीन बसेस ६०० कि.मी.धावल्या,उत्पन्न नगण्य

दोन दिवसात तीन बसेस ६०० कि.मी.धावल्या,उत्पन्न नगण्य

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही साखळी तोडण्यासाठी अखेर राज्य शासनाने दोन दिवसांचा वीकेंड लॅाकडाऊन लावला. त्यामुळे उद्योग, व्यापार, बाजारपेठ सर्वकाही बंद होते. वाहतूक करण्यास परवानगी असली तरी प्रवासीच नसल्याने, त्याचा फटका एस.टी. महामंडळालाही बसला आहे.

धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी या आगाराच्या दररोज जवळपास ९९ फेऱ्यांच्या माध्यमातून ३५ ते ३६ हजार किलोमीटर अंतरापर्यंत बसेस धावत होत्या. त्यातून या आगाराला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर तसे फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे उत्पन्नही कमी झाले.मात्र वीकेंड लॅाकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. शनिवारी धुळे आगारातून नाशिकसाठी एक तर चोपडा मार्गावर दोन अशा तीनच बसेस सोडण्यात आल्या. या एका दिवसात जवळपास ६०० किलोमीटर बसेस धावल्या. त्यातून अगदी नगण्य उत्पन्न मिळाले. तर रविवारी एकही बस धुळे आगारातून सुटली नसल्याची माहिती देण्यात आली.

ोन दिवसात लाखोंचा फटका

धुळे हे तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले शहर आहे. या ठिकाणाहून राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी धुळे आगाराच्या दररोज विविध मार्गावर ९९ फेऱ्या होत होत्या.

या फेऱ्यांच्या माध्यमातून धुळे आगाराला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र जसजसा कोराेनाचा प्रादुर्भाव वाढला, तसतसे प्रवासी कमी झाले, गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्या. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. आता गेल्या दोन दिवसात तर केवळ तीनच बसेस दोन मार्गावर धावल्या आहेत.

गेल्या दोन दिवसात लाखांत मिळणारे उत्पन्न हजारावर आल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

ज्याची ड्युटी तोच कामावर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारी कामावर बोलविण्यात आले आहेत.

मात्र एस.टी. महामंडळात ५० टक्के धोरण नाही. ज्याची ड्युटी लावण्यात आलेली आहे, तेच कर्मचारी कामावर येत असल्याचे सांगण्यात आले.

संकट निवारण्याचीच प्रतीक्षा

गेल्यावर्षी लॅाकडाऊनमुळे तब्बल तीन महिने एस.टी.बससेवा बंद होती. त्यात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र दिवाळीपासून एस.टी.ला सुगीचे दिवस आले होते. प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु आता पुन्हा कोरोनाचे संकट वाढले. हे संकट निवारल्यानंतरच एस.टी.चे उत्पन्न वाढू शकेल.

Web Title: In two days, three buses ran 600 km, the income was negligible