शिंदखेडा तालुक्यातील वरूळ गावातील शेतकरी प्रकाश पीतांबर पाटील यांनी अनधिकृत बियाणे साठवणूक केल्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तसेच शेतकरी प्रकाश पाटील कॅन्सरग्रस्त आहे. सदर शेतकऱ्याने कोणासही माल विकलेला नसून स्वतःच्या शेतीसाठी बियाणे आणले होते. वास्तविक कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानावर गुन्हा न दाखल करण्याची गरज होती. मात्र गरीब शेतकऱ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करून शेतकरी कुटुंबावर अन्याय केला आहे. सदर शेतकऱ्यास उच्च न्यायालयापर्यंत जाऊन दाद मागून जामीन घ्यावा लागला आहे. शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणेबाबत कोणताही शासनाचा नियम नसताना चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषदेच्या सभेत हा विषय चर्चेला घेतलेला असताना अद्याप गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. सदरील गुन्हा १४ ऑगस्टअखेर मागे न घेतल्यास गावातील व तालुक्यातील शेतकऱ्यांसह १५ ऑगस्ट रोजी जि.प. प्रांगणात मोर्चा काढून उपोषणास बसणार, असा इशारा जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी दिला आहे.
कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST