खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. मात्र तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे खरीपातील पिके तग धरून उभी होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल होऊन वरुण राजाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहात होता. परंतु या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झालेला दिसून येत आहे.
परिसरात गेल्या एक महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पिकांची कोळपणी, निंदणी, कीटकनाशकाची फवारणीआदी आंतर मशागतीची कामे पूर्ण झालेली होती.
कीटकनाशके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
परिसरात सुरु असलेले ढगाळ व दमट हवामानामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झालेली दिसून येत आहे.